१८१ आमदारांचा निषेध म्हणून होणार 'थोबाडीत मारो आंदोलन'
सातारा
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषदेत असणारे मराठा समाजातील १८१ आमदार मराठा आरक्षणावर गप्प आहेत. ते 181 आमदार काही बोलायला तयार नाहीत. त्याचा निषेध म्हणून थोबाडीत मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचा ठराव कोडोली येथे मराठा समाजाच्या वतीने आयोजित गोलमेज परिषदेत मांडण्यात आला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजात असंतोष पसरला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. या गोलमेज परिषदेला सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक, सुधाकर माने, दिग्विजय मोहिते, अनिल वाघ, दिलीप सूर्यवंशी, रेश्मा पाटील इत्यादी उपस्थित होते.
गोलमेज परिषदेत सर्वांच्या विचाराने आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत पुढील आंदोलनाची दिशा लवकर ठरवण्यात येणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयातील याचिका दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जर यामध्ये पुढाकार घेतला, तर हा प्रश्न एका महिन्यात सुटेल, असा दावा मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत करण्यात आला. यासंदर्भात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देणार असल्याचे ठरविण्यात आले. तसेच केंद्राने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळावा. स्थगिती उठल्यावर तातडीने नोकरभरती करावी. शेतकऱ्यांना सरसकट वीजबिल माफ करावे. असे ठराव मांडण्यात आले. या परिषदेस सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांतील मराठा समाजाच्या सर्व संघटना व प्रतिनिधी सहभागी झाले होते.
तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठा महासंघाने आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू असा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती करू नये, सरकारचं धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलाचं मरण झालं आहे. मातोश्रीवर आक्रोश मोर्चा, मशाल मोर्चा आहे. आम्ही लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चा काढून जगाला आदर्श दिला असं त्यांनी सांगितले. तसेच सरकार कोणाचंही असो, या नेत्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्रालयातल्या फाईली जाळल्या आहेत, पुरावे नष्ट केले परंतु मराठा आरक्षणासाठी आता आम्ही सगळे मराठा तरूण अख्खं मंत्रालय जाळून टाकू. मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे हा आमचा इतिहास आहे असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या