महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस २५ तारखेपासून सुरु करणार
ठाणे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योगधंदेसह शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली होती. त्यानंतर हळू हळू अनलॉक मध्ये दारूची दुकाने, बार, जिमखाने, ग्रंथालय, इतर सर्व गोष्टी सुरु झाल्या. परंतु शैक्षणिक क्षेत्राबद्दल शासनाकडे कोणतीही नीती, नियमावली व आराखडा नाही. ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यासारख्या महामानवांनी जगाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्या महाराष्ट्रात शिक्षणाचे असे हाल होत असतील तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. तसेच गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, क्लास संचालकास मोठ्या आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.
मुळात सरकार याबाबतीत उदासीन असल्याचेच दिसते. त्यामुळे आज कोचिंग क्लासेस संघटनेची राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या २३ तारखेला शाळा सुरु झाल्यानंतर २५ तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरु करणार असल्याचा ठराव करण्यात आला. तसेच, क्लासेस सुरु झाल्यानंतर जर कोणत्याही क्लासेसवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई, क्लासेस बंद करण्याच्या सूचना किंवा दंड आकारणी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोचिंग क्लासेसच्या वतीने महाराष्ट्रभर ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. काही दिवसापूर्वीच २३ नोव्हेंबर पासून ९वी ते १२ वर्ग सुरु करण्याचे शासनाने सांगितले. परंतु खासगी क्लासेसबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. संघटनेच्या बुधवारच्या बैठकीत २५ तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरु करणार असल्याचे ठराव करण्यात आला. तसेच, क्लासेस सुरु झाल्यानंतर जर कोणत्याही क्लासेसवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली तर महाराष्ट्रभर ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा ठराव देखील सादर बैठकीत करण्यात आला.
0 टिप्पण्या