शहापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यांना आळा बसावा या उद्देशाने वासिंद पोलीसांनी वाहतूक नियमांचे पालन करा, वाहन सावकाश चालवा, वाहन चालवताना मागे वळून पाहू नका, असे आवाहन केले आहे. वाहन चालविताना नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी वासिंद शहरातील बाजारपेठ येथे वाहन चालकांना जनजागृतीपर पत्रके वाटून आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
वासिंद पोलीस ठाण्याच्या हद्यीत लॉकडाऊननंतर अपघातांचे प्रमाण वाढले असून बेपर्वाईने वाहन चालविल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहीजण जखमी देखील झाले आहेत. या अपघातांना आळा बसावा हा उद्देश समोर ठेऊन पोलीसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणारी तसेच वाहने चालविताना घ्यावयाची जबाबदारी याबाबतची माहिती पत्रके वाटून वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. या पत्रकात वाहन सावकाश चालवा, हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, वाहन चालवताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर असावे, सिग्नल तोडू नये, वाहन चालवताना मागे वळून पाहू नका, हायवेवर निष्काळजीपणे रस्ता ओलांडू नका आदी नियमांचा समावेश होता.
0 टिप्पण्या