नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावचे पुनर्वसन साठी
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे.
उरण
उरण तालुक्यातील मुळ शेवा व कोळीवाडा ही दोन्ही गावे जे.एन.पी.टी. बंदराच्या प्रकल्पासाठी १९८६ साली विस्थापित केली असून महाराष्ट्र शासनाने कोकण आयुक्त व जिल्हाअधिकारी रायगड यांच्या मार्फत दोन्ही गावांचे पुनर्वसन केले. नवीन शेवा गावाचे पुनर्वसन बोकडविरा गावाजवळ केले व हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन बोरी-पाखाडी या ठिकाणी केले. आजपर्यंत ३४ वर्षात सतत जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त, जे.एन.पी.टी. चेअरमन यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार, आंदोलने-उपोषणे केलेले आहेत. तरी सुद्धा या दोन्ही गावांचा पुनर्वसानाचा प्रश्न सुटला नाही.वर्षानुवर्षे ही महत्वाची समस्या प्रलंबितच आहे. याबाबत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी महाराष्ट्र राज्याचे मान.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , व मान.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व संबधित खात्यांचे मंत्री व अधिकारी यांच्याकडे सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्राद्वारे साकडे घातले आहे.त्यामुळे लवकरच मंत्रालयात या प्रश्नावर बैठक बोलाविण्यात येईल असे संबधित विभागाकडून कळविण्यात आले आहे.
मुळ शेवा व कोळीवाडा ही दोन्ही गावे जे.एन.पी.टी. बंदराच्या प्रकल्पासाठी १९८६ साली विस्थापित केली असून महाराष्ट्र शासनाने कोकण आयुक्त व जिल्हाअधिकारी रायगड यांच्या मार्फत दोन्ही गावांचे पुनर्वसन केले. नवीन शेवा गावाचे पुनर्वसन बोकडविरा गावाजवळ सर्व्हे नं. ११२ या ठिकाणी केले व हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन बोरी-पाखाडी या ठिकाणी केले. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्तींचे पुनर्स्थापन कायदा१९७६ नुसार प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक शेतकरी कुटुंबाला ३७२ स्के.मी. चा भूखंड व बिगर शेतकरी कुटुंबाला १८६ स्के.मी. चा भूखंड देण्याचे मान्य केले. तसेच शेतकरी कुटुंबामध्ये ५ सदस्यांपेक्षा जास्त सदस्य असतील त्यांना ५५७ स्के.मी. चा भूखंड देण्याचे मान्य केले व विगर शेतकरी कुटुंबामध्ये ५ सदस्यांपेक्षा जास्त सदस्य असतील त्यांना २८९ स्के.मी. चा भूखंड देण्याचे मान्य केले.
त्याचप्रमाणे दोन्ही गावांच्या सार्वजनिक कामासाठी लागणारा भूखंडही देण्याचे मान्य केले. नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनासाठी बोकडविरा येथील सर्व्हे नं. ११२ मधील ३३.६४ हेक्टर जमिन संपादित केली व हनुमान कोळीवाडा गावासाठी बोरी पाखाडी येथील १७.१८ हेक्टर जमिन संपादित केली. या दोन्ही गावांना पुनर्वसन कायद्याप्रमाणे जमिन संपादित करूनसुद्धा पुनर्वसित कुटुंबाना फक्त मूळ गावातील जोत्या खालचा क्षेत्रफळ देऊन संक्रमण शिबिरासारखे स्थलांतर करण्यात आले. नवीन शेवा गावाचे पुनर्वसन १०.५० हेक्टर जागेमध्ये केले व उर्वरित २३ हेक्टर जमिन ही अजूनही पुनर्वसित कुटुंबाला देण्यात आलेली नाही. नवीन शेवा गावच्या ग्रामस्थांनी १९८६ पासून ते आजपर्यंत ३४ वर्षात सतत जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त, जे.एन.पी.टी. चेअरमन यांच्याकडे अनेकवेळा आंदोलने-उपोषणे केलेले आहेत. तरी सुद्धा पुनर्वसित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना राज्यसरकारकडून अजूनही न्याय मिळालेला नाही.
हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन फक्त २ हेक्टर भूखंडामध्ये केले असून उर्वरित १५ हेक्टर भूखंड अजूनही देण्यात आलेला नाही. हनुमान कोळीवाडा गाव हे आजमितीस १००% वाळवीग्रस्त झालेले असून त्या गावाचे पुनर-पुनर्वसन होणे गरजेचे आहे. शासनाच्या माध्यमातून कोकण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गावाचा पूर्ण सर्व्ह झालेला असून या गावाचे पुनर्-पुनर्वसन होणे गरजेचे आहे असे घोषित केलेले आहे. दोन्ही गावांचे पुनर्वसन हे जे.एन.पी.टी. बंदरासाठी झालेले असून, पूनर्वसणासाठी लागणारा सर्व खर्च जे.एन.पी.टी. ने महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून दोन्ही गावांसाठी संपादित केलेली जमिन ही आजमितिस सिडकोच्या ताब्यात आहे.
ही जमिन पुनर्वसित ग्रामस्थांना सिडको देण्यास नकार देत आहे. मी २०१५ पासून उरण विधानसभेचा आमदार म्हणून विधीमंडळाच्या विनंती अर्ज समिती समोर हा विषय घेतला होता. विनंती अर्ज समितीने अनेक हेअरिंग झाल्यानंतर नवीन शेवा गावाचा शिल्लक असलेला २३ हेक्टर भूखंड हा ग्रामस्थांना देण्यात यावा असा निर्णयही दिलेला आहे. तरीसुद्धा सदर भूखंड देण्यास सिडको नकार देत आहे. हनुमान कोळीवाडा हा गाव वाळवीग्रस्त झाल्यामुळे त्या गावाचे नव्याने पुनर-पुनर्वसन करण्यात यावे व पुनर्वसनासाठी लागणारी १७ हेक्टर जमिन व ग्रामस्थांच्या घरांचा बांधकामाचा खर्च तसेच सार्वजनिक बांधकामाचा खर्च जे.एन.पी.टी. ने देण्यात यावा असा निर्णयही दिला होता. तरीसुद्धा पुनर्वसित दोन्ही गावांतील ग्रामस्थांना अजूनही न्याय मिळालेला नाही. मी स्वत: पुनर्वसित नवीन शेवा गावाचा ग्रामस्थ आहे, गेल्या ३४ वर्षामध्ये आम्ही दोन्ही गावाचे पुनर्वसित ग्रामस्थ अनेकवेळा सरकार दरबारी आमच्या हक्कासाठी/न्यायासाठी वेगवेगळ्या आयुध्दांच्या माध्यमातून प्रयत्न केले असताना सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही. . तरी आम्हाला आपणाकडून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. आमदार मनोहर भोईर यांनी केलेल्या पत्रव्यवहारमुळे आता हा प्रश्न सुटेल अशी आशा नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या