अर्थपूर्ण पद सोडण्यास अधिकाऱ्यांची नकारघंटा, बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ
ठाणे
ठाण्यातील वर्तकनगर प्रभाग समितीमधील एका प्रभारी अधिकाऱ्याची कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बदली झाली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याला बढती मिळाली आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्याने पदभार सोडून नव्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्नही केला नाही. या अधिकाऱ्याने यापूर्वी तीनवेळा झालेल्या बदल्या रद्द केल्या आहेत. ठाण्यातील बड्या नेत्यांच्या दरबारी जाऊन दबावतंत्र वापरण्यासाठी हा अधिकारी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करीत असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे. बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार देण्यामागे अर्थपूर्ण कारण असू शकेल अशी चर्चा ठाणेकर करत आहेत. मात्र एकाचवेळी पाच पदांची जबाबदारी घेऊन हे अधिकारी जबाबदारी सोडण्यास तयार होत नसल्याने नव्याने नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याचा खोळंबा झाला आहे.
ठाण्यातील बदल्यांवरून झालेल्या वादानंतरही प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील पदे न सोडण्याचे प्रमाण वाढत आहेत. वर्षानुवर्षे एकाच विभागात चिकटून राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. सातत्याने तक्रारी केल्यानंतरही पदे सोडली जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सातत्याने राजकारण होत असून अधिकारी आणि कर्मचारी बदल्या झाल्यानंतरही मूळ पदांवर ठाण मांडून बसत असल्याची बाब अनेकवेळा निदर्शनास आली आहे. नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर जुने पद सोडत नसल्याने नव्या अधिकाऱ्याची कोंडी होऊ लागली आहे.
ठाणे महापालिकेमध्ये बदल्यांचे राजकारण नवे नसून गतवर्षी तत्कालीन आयुक्तांनी केलेल्या उपायुक्तांच्या बदल्यांवरून बरेच राजकारण झाले. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पदांवर बदली करून घेण्याइतके वातावरण बिघडले होते. परंतु त्यानंतर आता नव्या व्यवस्थेतही तोच प्रकार घडत असल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये बदली झालेल्या एका अधिकाऱ्याने चक्क कार्यालयातील संगणक आणि फायली पळवल्याची तक्रार महापालिकेकडून दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थपूर्ण असलेल्या एकाच पदावर कायमस्वरूपी राहण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनही विशेष प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मनसेच्या वर्तकनगर शाखा अध्यक्ष संतोष निकम यांनी केला आहे.
0 टिप्पण्या