काना मागून आला आणि तिखट झाला - जयंत पाटील
मुंबई
राष्ट्रवादीच 11 दिग्गज नेत्यांसह पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसें यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी म्हणाले की, भाजमध्ये खडसेंनी मोठे योगदान दिले आहे. मात्र काना मागून आला आणि तिखट झाला असा टोला नाव न घेता फडणवीसांना पाटील यांनी लगावला. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी गुरुवारी दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांचीही उपस्थिती होती.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही मंत्र्याचे पद जाणार नाही. मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. जे जिथे काम करत आहेत, ते तिथेच राहतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. खडसे हे राष्ट्रवादीमध्ये येणार हे निश्चित होताच त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका मंत्र्याला पद सोडावे लागणार, अशी चर्चा होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नावे घेतली जात होती. शरद पवार यांनी या सगळ्या गोष्टींवर खुलासा केला.
ते म्हणाले, पक्ष प्रवेशाच्या आधी खडसे यांची पक्षातील अनेक नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर माझ्याशीही चर्चा झाली. यातील कुठल्याही चर्चेत त्यांनी एका शब्दानेही कशाचीही अपेक्षा केली नाही. माध्यमांनी मात्र अनेक प्रकारच्या बातम्या दिल्या. त्याला काहीही अर्थ नाही. जे जिथे काम करत आहेत, तिथेच राहतील, असे सांगत, मंत्रिमंडळात कुठलेही बदल होणार नाहीत, असे पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. पवारांच्या या वक्तव्यामुळे खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके काय मिळणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
जयेंद्र पाटील पुढे म्हणाले की, 'पक्षामध्ये एकनाथ खडसे यांच्यावर खूप अन्याय झालेला आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत पक्ष वाढवण्याचे काम केले आहे. पक्षाच्या कठीण काळात त्यांनी काम केले. एकनाथ खडसेंना त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत न्याय करेल असे वाटले होते. मात्र, तसे झालेले नाही. यामुळे त्याच्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंसह पक्ष वाढवला आहे.' असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. एकनाथ खडसेंनी विधीमंडळाचा सदस्य काय करु शकतो हे दाखवले आहे. तसेच ते एक चांगले विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची ताकद आम्ही पाहिलेली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कटप्पाने बाहुबली को क्यु मारा असा प्रश्न मी विचारला, पण आजही त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. आजही ते टीव्ही पाहात असतील. आज त्यांना कळाले असेल की टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है हे आता त्यांना कळेल.
एकनाथ खडसे म्हणाले की, मला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दलम मी शरद पवारांचा मनापासून आभारी आहे. भारतीय जनता पक्षाने मला अडगळीत टाकले होते. मला आता नव्या संधींची अपेक्षा नव्हती. पण मला छळण्यात आले. पक्षासाठी चाळीस वर्षे संघर्ष केला. पण पक्षाने माझ्या मागे अँटी करप्शन लावले. इनकम टॅक्स लावले आहे. मी भारतीय जनता पक्षाचे काम जेवढ्या निष्ठेने केले तेवढेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कामही निष्ठेने करणार आहे. भारतीय जनता पक्ष जसा वाढवला त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढू असा विश्वास त्यांनी शरद पवारांना दिला आहे.
0 टिप्पण्या