मराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची घोषणा
मुंबई
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस विभागातील भरतीमध्ये मराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची घोषणा केली. यासोबतच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, 'मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पोलिस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढल्या जातील. यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी करुन मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पोलिस भरतीच्या निर्णयावर संभाजीराजे म्हणाले, राज्यातील पोलिस विभागात 12 हजार 528 पदांसाठी पोलिस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण, या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?' असा प्रश्न करत आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलिस भरती करू नका, 'हा निर्णय ऐकून मला दु:ख झाले आहे. पोलिस भरती करण्यासारखे सध्या वातावरण नाही. बहुजन समाजाने 58 मोर्चे काढले, ते यशस्वीही झाले. पण, आज मराठा समाज दुखी आहे. आपल्याला आरक्षण पुन्हा कसे मिळणार याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. नोकरभरती पुढच्या टप्प्यात करा, याची घाई करण्याची गरज नाही. इतर समाजाचे लोक समजून घेतील,' असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाला स्थगितीच्या निर्णयावर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान फडणवीस म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटलेला नाही. 'आरक्षणाबद्दल मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. काही लोकं फक्त राजकीय स्वार्थासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे खापर केंद्रावर फोडत आहेत. राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा संबंध नाही, मराठा समाजाला माहित आहे की, त्यांच्यासाठी मी कीती केले आहे.'
भाजप आमदार नितेश राणे यांनीही पोलिस भरतीवर टीका केली आहे. मराठा आरक्षण पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती करुन सरकार आगीत तेल टाकत असल्याचं ते म्हणाले. याबाबत त्यांनी ट्वीट केले की, "राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती..मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ? आगीत तेल टाकत आहात..जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का?
0 टिप्पण्या