Top Post Ad

पावसाने तोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड

मुंबईला पावसाने झोडपले, ४६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला, 
मंत्रालयासमोर आयुष्यात पहिल्यांदाच एवढे पाणी पाहतोय- शरद पवार
आता अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन १० हजारांची मदत जाहीर करण्याची भाजपची मागणी



मुंबई :


पावसाने आज ६ ऑगस्ट रोजी मागील ४६ वर्षांच्या नंतर रेकॉर्ड तोडला आहे. कुलाब्यामध्ये 12 तासांत 294 मिमी पाऊस झाला. तर दक्षिण मुंबईतही रस्त्यांवर पाणी आले होते. ऑगस्टमध्ये कुलाब्यात 1974 मध्ये मुसळधार पाऊस झाला होता. हे रेकॉर्ड 262 मिमी होते.बुधवारी मुंबईत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. उंच लाटा आणि पावसामुळे मुंबईतील मंत्रालयाबाहेर कधी नव्हे ते पाणी साचले. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रालयासमोर आयुष्यात पहिल्यांदाच एवढे पाणी पाहतोय, अशी प्रतिक्रिया दिली.


खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार वाय बी चव्हाण सेंटरमधून जात असताना त्यांनी रस्त्यावरील पाणी पाहून फेसबूक लाईव्ह केले. यावेळी सुळे यांनी मंत्रालयासमोरील पाणी म्हणजे समुद्र झालाय, असे म्हटले. यानंतर एवढ्या पावसात कधी एवढे पाणी तुंबले नव्हते, असे म्हणताच शरद पवारांनी पहिल्यांदा आयुष्यात या भागात एवढे पाणी पाहतोय अशी प्रतिक्रिया दिली.


पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील पावसाळी परिस्थितीची पाहणी केली. मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर आदित्य ठाकरेंनी आज काही ठिकाणांना भेटी देत पाहणी केली आहे. तसेच यापूर्वी असा पाऊस मुंबईत कधीच पाहिला नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.


मुसळधार सरी, सोसाटय़ाचा वारा आणि त्यामुळे समुद्राला आलेले उधाण असे तिहेरी संकट एकाच वेळी आल्याने अवघे शहर जलमय झाले. लॉकडाउनमधून मुक्त झाल्याच्या दिवशीच पावसाने मुंबईकरांना जखडून ठेवले. नदी, नाल्यांना आलेला पूर पाहून मुंबईकरांच्या मनातील ‘२६ जुलै’च्या भीतीदायक आठवणी ताज्या झाल्या. जून आणि जुलैमध्ये लपंडाव खेळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासून मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. मात्र, बुधवारी त्याचा नूरच वेगळा होता. पहाटेपासूनच वादळीवारे घोंघावू लागले आणि त्यासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई काही वेळेतच जलमय झाली. कधी नव्हे ते दक्षिण मुंबईमधील नरिमन पॉइंट, चर्चगेट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव आदी ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यावर रौद्ररूपी लाटा धडकू लागल्या. कधी नव्हे ते गिरगाव चौपाटीलगतच्या सुभाषचंद्र बोस मार्गावर प्रचंड पाणी साचले. ग्रॅन्ट रोड, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई सेंट्रल, सातरस्ता, लालबाग, परळ, हिंदमाता, दादर, माहीम, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, चुनाभाट्टी, मानखुर्द यांसह विविध परिसर जलमय झाले. उपनगरांतील नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले. नाल्याच्या काठावर उभ्या असलेल्या झोपडय़ांमधील रहिवाशांचा पावसाचा रुद्रावतार पाहून थरकाप उडाला. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आणि मोठे नुकसान झाले. जलमय झालेल्या रस्त्यांवरील उभ्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. चर्चगेट, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह यांसह ठिकठिकाणचे मोठे वृक्ष उन्मळून पडले.


बुधवारी सकाळी मुंबईत बऱ्यापैकी पाऊस बरसत होता. दुपारी मात्र पावसाने उघडीप घेतली.  दुपारी ३ वाजता मुंबईत वेगाने वारे वाहू लागले. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे, जोरदार मारा करणा या जलधारांनी मुंबईकरांना झोडपून काढले.  वा याच्या वेगाने दाखल झालेल्या पावसाने तब्बल रात्री ७ वाजेपर्यंत मुंबईला पावसाने तुफान झोडपून काढले. या काळात मुंबईत सर्वत्र ताशी ९० किमी वेगाने वारे वाहिले. त्यामुळे विशेषत: दक्षिण मुंबई परिसरात झाडे मुळासकट उन्मळून कोसळल्याची घटना घडल्या. पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली, अशी माहिती महापलिकेने दिली.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यासोबतच समुद्रातील पाणीही काही भागांमध्ये शिरले आहे. अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले आहे. यामुळे आता अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 10 हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com