स्वदेशीच्या ब्रॅण्डिंगसाठी तरुणाईचा पुढाकार
मुंबई
करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी ‘स्वदेशी तुझे सलाम’ हा उपक्रम काही तरुण मंडळींनी सुरु केला असून त्याला मोठया प्रमाणात सोशलमीडियावर प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्राफिक्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आवाहन यावेळी जनतेला करण्यात येते.
साईली भाटकर, तिचे सहकारी सुजित विजयन, पुजा डांगे, अक्षय लुडबे, चैतन्य महाडिक, तन्मय देवघरकर, अपर्णा पवार, सिमरन दास, दिशांक टिंबले, विनय शिंदे या तरुण तरुणीनी एकत्र येऊन चळवळ वाढविण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत.
लोकांची नेहमी तक्रार असते की देश आपल्यासाठी काय करतो? पण आतापर्यंत आपण आपल्या देशासाठी काय केले? आणि काय करतो? हा सवाल ही मंडळी जनतेपुढे उपस्थित करत आहे.
‘स्वदेशी तुझे सलाम’ या फेसबुक आणि इस्टाग्राम पेजच्या माध्यमातून आम्ही जास्तील जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मोबाईल मार्केट आणि इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये आपण स्वदेशी उत्पादनांच्यामार्फत चीनला मागे टाकणे कठीण असले तरी अशक्य नाही, असा विश्वास सायली भाटकर हिने व्यक्त केला. रोजच्या वापरात स्वदेशी वस्तूंची खरेदी करून आपण छोटासा का होईना.पण आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खारीचा वाटा उचलू शकतो. सध्याच्या परिस्थितीत करोनामुळे घराबाहेर पडणे अशक्य आहे, परंतु घरात राहून जीवनावश्यक वस्तूंमार्फत आपण आपल्या देशासाठी नक्कीच एक पाऊल पुढे टाकू शकतो.रोजच्या दैनंदिन वापरात जास्तीत स्वदेशी उत्पादने वापरल्याने आपण अप्रत्यक्षरित्या आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतो, ही भावना जनसामान्यात रुजवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. त्यातून सरकारचे महसूल उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
स्वदेशी उत्पादने वापरल्याने ‘मागणी तसा पुरवठा’ या सुत्रानुसार देशातील उत्पादनांची मागणी वाढेल, परिणामी उत्पादन वाढेल आणि स्वदेशी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात काही वेळासाठी ठप्प झालेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा नव्याने चालना मिळेल, असा या उपक्रमामागील हेतू आहे. स्वदेशी वस्तूच खरेदी करा आणि आपल्या अर्थव्यस्थेला बळकट करा, असे आवाहन स्वदेशी तुझे सलाम च्या माध्यमातून केले जात आहे.
0 टिप्पण्या