अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करा
मुंबई:
आपल्या प्रत्ययकारी लेखनप्रतिभेने कथा, कादंबरी, पोवाडा, पटकथा, प्रवासवर्णन आदी विविधांगी साहित्याद्वारे शोषित-वंचित समाजघटकांची व्यथा, वेदना समर्थपणे मांडणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारकडे, राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेवून आदरणीय अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, अशी शिफारस या पत्रात विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
लोकशाहीर, साहित्यरत्न दिवंगत अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची १ ऑगस्ट २०२० रोजी सांगता होत आहे. मुंबईतील वास्तव्यात कामगार-श्रमिकांचे लढे तसेच भारतीय स्वातंत्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम यात अण्णा भाऊंनी सहभागी होत आपल्या शाहिरीव्दारे मोठी जनजागृती घडवली. 'फकिरा' या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीसह अन्य कथा, कादंबऱ्याही अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांना भारतरत्न' पुरस्काराव्दारे सन्मानित करण्यात यावे, अशी भावना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांच्यावतीने व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या