पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे वीज बिलाचा विषय मांडणार- आमदार प्रताप सरनाईक
ठाणे
लॉकडाऊनमुळे मागील चार महिन्यापासून सर्वच काम-धंदे ठप्प आहेत. मात्र वीज कंपन्यांनी भरमसाट बिले पाठवून ग्राहकांना शॉकच दिला आहे. अदानी, टाटा, महावितरण या कंपन्यांकडून आलेल्या भरमसाठी वीजबिलांमुळे सामन्य नागरिक हैराण झाले आहेत. चार महिन्यात कोणत्याही वीज कंपनीचा प्रतिनिधी मीटर रीडिंग घ्यायला आले नाही, मग बिल कोणत्या आधारे पाठवले आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वीज कंपन्यांनी पाठवलेल्या भरमसाट बिलांमुळे सामान्य जनतेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. सामान्य जनतेला वीज बिलात दिलासा मिळावा यासाठी ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे वीज बिलाचा विषय मांडणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. याबाबत सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्रही दिले आहे.
वाढीव बिलाबाबत अनेक राजकीय पक्षांनी लॉकडाऊन काळात आंदोलने देखील केली. परंतु, अद्याप वीज कंपन्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. या संदर्भात राज्य सरकारकडून ग्राहकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. वीज बिलाबाबतच्या तक्रारींचे शंभर टक्के निरसन करावे. यासाठी राज्य सरकारने वीज कंपन्यांना निर्देश द्यावेत, मार्च ते जून या महिन्यांच्या वीज बिलांची चौकशी करून वीज ग्राहकांना दिलासा मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सुचनेद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधणार असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
0 टिप्पण्या