कोरोना महामारीतील लॉक डाऊन काळात राज्यातील नागरिकांचे
वीज बिल माफ करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारतीय मराठा संघाचे निवेदन
ठाणे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या लॉक डाऊन काळात अनेक नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय बंद पडलेले आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाचा अतोनात सामना करावा लागत असल्याने नागरिकांच्या जवळचे पैसे देखील शिल्लक राहीलेले नाही. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, टोरंट पावर कंपनी तसेच इतर विद्युत कंपन्यांनी लाईट बिले अतिशय भरमसाठ प्रमाणात नागरिकांना पाठवले आहे. यामुळे गोरगरीब जनता विवंचनेत सापडली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाल्याने राज्यातील नागरिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भारतीय मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उदरनिर्वाह करण्याची साधने बंद असल्याने पैसा मिळत नाही अशा परिस्थितीत नागरिक कुठून लाईट बिल भरतील, यामुळे आपण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेला मोठा दिलासा देऊन मार्च एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 2020 पर्यंत वीजबिल नागरिकांचे सरसकट माफ करण्याचे अद्यादेश विद्युत कंपन्यांना द्यावेत आणि नागरीकांना संकटाच्या काळात मोठा दिलासा देण्यात यावा. आपण महाराष्ट्राची जबाबदारी घेतल्या पासून राज्यातील गोरगरीब जनतेला वेगवेगळ्या आरोग्य योजनांतून चांगल्या प्रकारे लाभ मिळत आहे. यामुळे आपण नागरिकांच्या हिताकरीता एक मोठा निर्णय घेऊन राज्यातील नागरिकांचे वीजबिल माफ करावे आणि ज्यांनी उधार पैसे घेऊन बिले भरले आहे, त्यांचे पुढे येणारे लाईट बिलामधून ती भरलेली बिलाची रक्कम वजा करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या