Top Post Ad

हा तर  महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा डाव -  सचिन सावंत

हा तर  महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा डाव -  सचिन सावंत


मॉब लिंचिंगचे केंद्र असलेल्या युपीच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करणे हा शहाजोगपणा.


   मुंबई 
पालघर जिल्ह्यात जमावाने हल्ला करुन तिघांची हत्या करण्याचा प्रकार निंदनीय आहेच पण या दुर्दैवी घटनेला धार्मिक रंग देऊन त्यावरुन राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत असलेल्या भारतीय जनता पक्षाला लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.पालघरच्या घटनेवरुन भाजपाने सुरु केलेल्या राजकारणाचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना राज्यात वा देशात घडलेल्या अशा अनेक घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे.


गतवर्षी पालघर जिल्ह्यात दोन लिंचींगच्या घटना घडलेल्या आहेत. धुळ्यामध्येही अशाच त-हेची घटना घडली होती. पुण्यातही असेच घडले होतो त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा का दिला नाही? ज्या गावात ही दुर्दैवी घटना घडली ते गाव 'दिवशी गडचिंचले' ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपचा गड असून गेली १० वर्ष तिथे भाजपचा सरपंच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. अटक केलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपाचे आहेत.
चोरांच्या अफवेबरोबर एक अफवा होती की काही मुस्लिम पोलिसांच्या/डॉक्टरच्या वेशात येतात, मुले पळवून किडनी काढतात वा विहिरीत थुंकून करोना पसरवतात, अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचे कारस्थान देशात आजवर कोण करतय? साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही सावंत यांनी केली. याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सत्ताकेंद्र तेथील भाजपच्या नेत्यांनी या अफवा पसरू नये म्हणून काय केले? हिंसक जमावाला थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले.



महाविकास आघाडी सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन ११० लोकांना अटक करुन उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. परंतु मॉबलिंचिंगचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट शहाजोगपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन चिंता व्यक्त करतात, यावर सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले त्याचबरोबर वांद्रे येथे स्थलांतरीत मजूर जमा झाल्याच्या घटनेनंतर व आताही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करावा वाटतो. सुरतमध्ये जमाव जमल्यावर किंवा भाजपशासित राज्यात मॉब लिचिंग  घटना घडल्यावर मात्र अमित शाह यांनी कधी फोन केल्याचे दिसले नाही. यावरून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे आणि कोरोनाचे संकट सर्व देशभर असतानाही भाजपा इतक्या हीन पातळीवरती जाऊ शकतो याचे दु:ख वाटते असे सावंत म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com