Top Post Ad

ऋषी कपूर यांच्या निधनाने  चित्रपटसृष्टीतील एक सदाबहार तारा निखळला - बाळासाहेब थोरात







ऋषी कपूर यांच्या निधनाने  चित्रपटसृष्टीतील एक सदाबहार तारा निखळला !: बाळासाहेब थोरात
 
मुंबई 



भारतीय चित्रपटसृष्टीला अमुल्य योगदान दिलेल्या कपूर घराण्याचा समृद्ध वारसा लाभलेला एक सदाबहार तारा आज निखळला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या धक्क्यातून चित्रपटसृष्टी सावरण्याआधीच ऋषी कपूर यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयातून वेगळी छाप सोडली होती. ऋषी कपूर यांनी ७० च्या दशकात बॉबी चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. दामिनी, सरगम, अमर अकबर अँथोनी, कर्ज, अशा जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी दमदार अभिनय साकारला. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर कर्करोगावरावरील उपचार घेऊन भारतात परतले पण काल अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि आज त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कपूर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


 


 


बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीत संसर्ग, श्वास घेण्यात त्रास आणि सौम्य ताप यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु त्यांनी गुरुवारी पहाटे 3 वाजता उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले होते. पहाटे 5.30 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. जेव्हा त्यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी नीतू आणि मुलगा रणबीर होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची कोविड 19 ची चाचणीही करण्यात येणार होती.


अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी ट्विट करुन ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी दिली. बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या बातमीतून लोक सावरलेही नव्हते की अभिनेते ऋषी कपूर यांनी या जगातून एक्झिट घेतली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवर याविषयी माहिती देताना ट्विट केले आहे, 'तो गेलाय... ऋषी कपूर गेलाय... मी उद्धवस्त झालोय!'


महाराष्ट्र शासनाने विशेष पास दिला होता-  गेल्या गुरुवारपासून त्यांची तब्येत खराब असल्याचे वृ्त्त आहे. त्यांना गेल्या आठवड्यातही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु चार तासांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने रुग्णालयाला भेट देण्यासाठी त्यांना खास पासही दिला होता. त्यांचे वैद्यकीय अहवालही बीएमसी आणि आरोग्य विभागाला पाठविण्यात आले होते.


2 वर्षांपूर्वी कॅन्सरचे झाले होते निदान -  ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू होत्या. तर मुलगा रणबीर त्यांना अनेक वेळा भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता. काही दिवसांपूर्वी ऋषी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, "आता मला बरे वाटत आहे. आणि कोणतेही काम करू शकतो. पुन्हा अभिनय कधी सुरू करण्याचा विचार करतोय. पण लोकांना आता माझे काम आवडेल की नाही हे माहित नाही. न्यूयॉर्कमध्ये मला बर्‍याचदा रक्त चढवण्यात आले. तेव्हा मी मी नीतूला म्हटले होते की - मला आशा आहे की नवीन रक्त असूनही मी अभिनय विसरणार नाही."


चाहते न्यूयॉर्कमध्ये भेटीसाठी पोहोचले होते - जेव्हा ऋषी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते, तेव्हा त्यांचे मित्र आणि प्रियजन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तेथे आले होते. यामध्ये प्रियांका चोप्रा, आलिया भट, अनुपम खेर, आमिर खान, शाहरुख खान, दीपिका पादुकोण, करण जोहर आणि मलायका अरोरा यांचा समावेश होता. ऋषी शेवटचे मरान हाश्मीसोबत स्क्रीनवर दिसले होते.


फेब्रुवारीमध्ये दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते -  ऋषी कपूर यांना फेब्रुवारीमध्ये दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकदा जेव्हा ते दिल्लीतील एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, ऋषी यांनी स्वतः सांगितले होते की, त्यांना संसर्ग झाला होता. मुंबईत परतल्यानंतर, पुन्हा व्हायरल तापामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तब्येत सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


महिन्याभरापासून सोशल मीडियापासून दूर - सोशल मीडियावर आपल्या लॉजिकल आणि अग्रेसिव्ह कमेंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी यांनी 2 एप्रिलनंतर ट्विटर अकाऊंटवर काहीही पोस्ट केले नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार असल्याची घोषणा केली होती. यात दीपिका पदुकोण त्यांच्यासोबत काम करणार होती.


पृथ्वीराज कपूर यांचा नातू आणि राज कपूर यांचा मुलगा -  चिंटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईच्या चेंबूर येथे झाला होते. ते राज कपूर यांचा दुसरा मुलगा आणि पृथ्वीराज कपूर यांचे नातू होते. त्यांनी आपल्या भावांबरोबर मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि अजमेरमधील मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. रणधीर कपूर हा त्यांचा मोठा भाऊ आणि राजीव कपूर हा त्यांचा धाकटा भाऊ आहे. ऋषी आणि नीतू यांना रणबीर कपूर हा मुलगा आणि रिदिमा कपूर ही मुलगी आहे.


ऋषी कपूर यांचा चित्रपट प्रवास - 1970षी कपूर यांनी 1970 मध्ये वडील राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात ऋषींनी त्यांच्या वडिलांच्या बालपणीची भूमिका वठवली होती. 1973 मध्ये आलेल्या 'बॉबी' या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या कारकीर्दीत, त्यांनी 1973-2000 पर्यंत सुमारे 92 चित्रपटांमध्ये रोमँटिक हीरो म्हणून काम केले. सोलो लीड अभिनेता म्हणून त्यांनी 51 चित्रपटांमध्ये काम केले. ऋषी त्यांच्या काळातील चॉकलेट हीरोंपैकी एक होते. त्यांनी बॉलिवूडला अनेक रोमँटिक हिट्स दिले. आपल्या पत्नीसह त्यांनी एकुण 12 चित्रपटांत काम केले. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.


ऋषी यांनी दिग्दर्शनातही हात आजमावला होता. त्यांनी 1998 मध्ये अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत ‘अब अब लौट चले’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.











 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com