Top Post Ad

ठाणे काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन मुरलीधर शिंदे यांचे अल्पशः आजाराने निधन

 



 
ठाणे शहर काँगे्रस प्रवक्ते सचिन मुरलीधर शिंदे यांचे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 56 वर्षाचे होते. ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभुमीत त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात करण्यात आले. यावेळी ठाणे शहरातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, बहिण व भाचा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ठाणे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सचिन शिंदे हे दिवंगत काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांचे सहकारी होते. त्यांच्या निधनानंतर ठाण्यात काँग्रेस पक्ष रुजविण्यासाठी शिंदे यांनी कसोशिने मेहनत घेतली. ठाणे महानगरपालिकेत परिवहन सेवा सदस्य व माळी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांच्या उत्कर्षासाठी कार्य केले. ठाण्यातील महागिरी परिसरात ते वास्तव्यास होते. गेले दोन आठवडे ते दिर्घ आजाराने रुग्णलयात उपचार घेत होते. मात्र मंंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ठाणे शहरात पोहोचताच सर्व स्तरातून त्यांच्या अंत्यविधीच्या दर्शनासाठी ठाणेकरांनी महागिरी येथे भेट देवून अंत्यदर्शन घेतले तर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभुमीत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आम. संजय केळकर, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, प्रदीप शिंदे, मनोहर डुंबरे, मोहन तिवारी, शैलेश शिंदे, सुभाष कानडे, सुहास देसाई, नारायण पवार, संजय वाघुले, केदार दिघे यांच्यासह ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
.........................................
 

ठाणे शहरातील माळी समाज मंडळ,ठाणे माजी अध्यक्ष, ठाणे काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन मुरलीधर शिंदे यांचे मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले. सचिन शिंदे यांच्या रुपाने ठाणे शहरातील एक समाजप्रिय, दिलदार व्यक्तीमत्व हरपलं. ठाणे शहर काँग्रेसचे  माजी अध्यक्ष दिवंगत बाळकृष्ण पूर्णेकर यांचे सहकारी आणि अनेक सामाजिक चळवळींतून परिचित होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना बे्रम हॅमरेज झाल्याची माहिती पत्रकार मित्राने दिली होती. त्यावेळी ऐकून धक्काच बसला. ते आयसीयुमध्ये उपचारासाठी दाखल होता. दोन आठवडे त्यानं मृत्यूशी झुंज दिली. मात्र काळापुढं सर्वांनाच शरण जावं लागतं. अखेर 18 जून 2024 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची वार्ता ठाणे जिल्ह्यात वार्‍यासारखी पसरली आणि सर्वत्र हळहळ सुरू झाली. 

सचिन मुरलीधर शिंदे हे महागिरी कोळीवाडा परिसरात वास्तव्यास असलेले समाजसेवी व्यक्तीमत्व. लहानपणापासूनच समाजकारणाची आवड असल्याने विद्यार्थी दशेतच ठाणे शहर काँग्रेसमध्ये कार्यरत राहून त्यांनी अनेक आंदोलने, सामाजिक चळवळ, कामगार, विद्यार्थी, युवक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला. ठाणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या खांद्याला खांदा लावून विविध आंदोलनात रस्त्यावरची लढाई लढलेला सचिन शिंदे या ठाण्यानं पाहिलाय. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहु महाराज, क्रांतीसुर्य जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा, त्यांची प्रेरणा घेत सचिन शिंदे यांनी आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत तळमळीने सामाजिक कार्य केले. माळी समाज मंडळ, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष असताना माळी समाजाच्या उत्कर्षासाठी सचिन शिंदे यांनी शासन स्तरावर अनेक प्रश्न सोडविण्यासाठी लढा दिला. महागाई, बेरोजगारी, शैक्षणिक अशा विविध प्रश्नांवर त्यांनी शासन स्तरावर आंदोलने करीत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्तेपदी त्यांनी ठाण्यातील विविध प्रश्नांवर विरोधकांना जशास तसे उत्तर दिले. अभ्यासू, वैचारिक बैठकीतील आणि समाजाचे बारकावे जाणून घेणारा सचिन शिंदे तितकाच संवेदनशीलही होता. समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, या भुमिकेने कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता कार्य केले. ठाण्यातील महागिरी कोळीवाडा, खारटन रोड, खारकर आळी, चेंदणी कोळीवाडा या परिसरात हिंदु, दलित, मुस्लीम, मेहतर हर तर्‍हेचे, जाती वर्णाचे लोक एकत्र राहतात. या समाजातील प्रत्येक नागरिकांच्या सुख, दुःखात सचिन शिंदे यांचा सहभाग असायचा. शालेय परिक्षेत गुण मिळविलेला विद्यार्थी असो  की एमपीएससी, आयपीएस झालेला तरुण असो त्यांचा जाहीर सत्कार करण्यासाठी तसेच आपल्या विभागातील गरीब, मागास विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप करण्यासाठी सचिन शिंदे नेहमीच अग्रेसर असायचे.   

खारटन रोडवरील लफाटा चाळीत राहणार्‍या ठामपाच्या कर्मचार्‍यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जगदीश खैरालिया सारख्या ज्येष्ठ सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन शिंदे यांनीही आपली कारकिर्द सुरु  ठेवली. मराठी, कोळी, आगरी, साळी, माळी, कुणबी अशा सर्व समाज घटकांच्या सामाजिक कार्यात सहभागी होणारे सचिन शिंदे ओबीसी आणि मराठा चळवळीतही अग्रेसर होते.  ठाणे शहर काँग्रेसच नव्हे तर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय अशा सर्वच पक्षांचे नेते आणि पदाधिकार्‍यांसमवेत सचिन शिंदे यांचे मैत्री, स्नेहबंध कायम होते. तसेच ठाण्यातील पत्रकार बंधुमध्ये सचिन शिंदे यांची वेगळी छाप होती. ठाणे महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय असो सर्वच ठिकाणी सचिन शिंदे यांचा वावर असायचा. अगदी हसतमुखाने सर्वांशी हस्तांदोलन करीत विनम्रपणे समोरचा कुणीही लहान-मोठा असला तरी आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे सचिन शिंदे हे समाजप्रिय व्यक्तीमत्व होते. त्यांच्या जाण्याने ठाण्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे. 

अजय जाधव.......

................................


"आपण बसलोय ते ठिकाण महापुरुषाचं नांव घेण्यासारखंही नाही आणि तुम्ही कसल्या चर्चा करताय महापुरुषांच्या. गप्प बसा. जेव्हा शुद्धीत असाल तेव्हा महापुरुषांच्या विचारांचा जागर घाला", असा दम देणारा आवाज आता कधीच ऐकू येणार नाही. एका ओल्या पार्टीत एका मित्राने जेव्हा महापुरुषांची चर्चा सुरू केली त्यावेळेस सचिननं हा दम दिला होता. लढणारे अनेक असतात पण युद्ध जगणारे जे काही मोजके लोक आहेत; त्यामध्ये सचिनचं नांव आवर्जून घेतलं जाईल. मुळचा काँग्रेसी किंवा फुले विचारधारेचा असलेला सचिन सुरुवातीच्या काळात एलआयसीमध्ये नोकरी करत होता. त्याचवेळी तो काँग्रेसमणध्येही सक्रीय होता. निवडणुकीच्या निमित्तानं त्याने एलआयसीची नोकरी सोडली. निवडणुकीत पराभुत झाल्यानंतर अनेकांनी त्याला पुन्हा नोकरी कर, एलआयसीत जा, असं सुचवलं. पण तत्वांशी बांधिल असल्याने त्याने पुन्हा नोकरीकडे ढुंकूनही पाहिले नाही. "मी माझं वजन वापरून पुन्हा नोकरी मिळविनही पण माझ्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर जो बेरोजगार नोकरी करतोय त्याची नोकरी हिरावून घेण्याचा मला काय अधिकार?" , हा त्याचा नेहमीचा प्रश्न असायचा. 

एक दिवस सामाजिक चळवळीचा विषय सुरू असताना त्याला मी म्हटलं, सचिन तु बर्‍यापैकी मोठा पुढारी आहेस... राजकारण करतोस, फुले, शाहु, आंबेडकरांचे नांव घेतोस पण तू ज्या समाजातून आला तो समाज राष्ट्रपिता जोतिराव फुलेंचा वारसदार आहे. या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न का नाही करत? सचिननं मला उत्तर दिलं नाही. पण साधारणतः पाच ते सहा महिन्यांनी त्याला फोन केला, 'संजा, तुला एका कार्यक्रमाला याचचं आहे'. मी गेलो आणि त्याच दिवशी त्यानं मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याने ठाण्यातल्या सर्व माळी समाजाला एकत्र करून संघटना स्थापन केली. सचिन काय होता? कोण होता? यापेक्षा सचिन हा जीवाला जीव देणारा मित्र होता, एवढं मात्र निश्चित. बाळकृष्ण पुर्णेकरांच्या जाण्यानंतर खचलेला सचिन आता कुठे उभारी घेत होता. त्याचं असं अचानक जाणं ठाण्यातल्या पुरोगामी विचारधारेला नक्कीच परवडणारं नाही!

संजय भालेराव 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com