Top Post Ad

मंगळसूत्र, मुस्लिम, पाकिस्तान, धर्मांधता, जातीयता आणि प्रांतवाद


  आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्प करीत या संविधानाच्या आधारे वाटचाल करीत होतो. ते संविधान आज धोक्यात आले आहे.  संविधानाची मोडतोड करण्याचे काम २०१४ पासून सुरू झाले तर २०१९ पासून हे भारतीय संविधान उद्ध्वस्त करण्याच्या कामाला वेग आलेला आहे. राक्षसी बहुमत त्यासाठी त्यांना हवे आहे. त्यांचे नेते उघडपणे संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. आता संविधान बदलामुळे केवळ आरक्षण किंवा इतर गोष्टी धोक्यात येतील असे नाही तर याचा परिणाम संपूर्ण देशावर होणार असून इथला प्रत्येक नागरिकाला याची झळ सोसावी लागणार आहे. म्हणूनच आज सिटिझन फॉर कॉन्स्टीट्यूशनच्या माध्यमातून अनेक संस्था एकत्र येऊन याबाबत जनजागृती अभियान राबवत आहेत. त्याचाच एक भाग आजची पत्रकार परिषद असल्याचे रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी सांगितले.  सिटिझन फॉर कॉन्स्टीट्यूशनच्या  वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.   यावेळी  तिस्टा सेटलवाड, तुषार गांधी,  रिपाई नेते शामदादा गायकवाड, पोलिस समन्वय समितीचे डोल्फी डिसुझा, समाजसेवक शरद कदम, फिरोज मिठीबोरवाला, इरफान इंजिनिअर, आदी अनेक मान्यवरांनी  आपले विचार व्यक्त केले. 

लोकशाहीच्या बाजूने उभे राहण्याऐवजी इथला भांडवलदारी मीडिया सरकारच्या कच्छपी लागला आहे. न्यायपालिकेने डोळ्यावर पट्टी ओढून घेतली आहे. केंद्र सरकार सुप्रीम कोर्टावर दबाव आणत आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला अनुकूल भूमिका बजावत आहे. राज्यपाल सत्ताधारी पक्षासाठी काम करीत आहेत. इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सरकारी संस्था सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्त्या प्रमाणे काम करीत आहेत. विरोधकांना नामशेष करण्यासाठी आणि नागरिकांना वेठीस धरण्याकरीता या संस्थाचा उपयोग केला जात आहे. लोकांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. लोकांच्या प्रश्नावर, महागाई, रोजगार, शिक्षण, विकासाच्या प्रश्नावर निवडणुका लढविण्या ऐवजी मंगळसूत्र, मुस्लिम, पाकिस्तान या विषयावर लोकांचे लक्ष वळविण्यात येत आहे. धर्मांधता, जातीयता आणि प्रांतवादावर भर दिला जात आहे. मुंबईत मराठी माणसाने नोकरी साठी अर्ज करू नये अशी जाहिरात असेल किंवा आमच्या सोसायटीत मराठी माणसाने घर घेऊ नये किंवा प्रचाराला येऊ नये असा भाषिकवाद जोपासला जात आहे.

निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत अजून 2 टप्पे बाकी आहेत.या देशातील नागरिकांनी संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी आता उघडपणे पुढे आले पाहिजे. येत्या 20 तारखेला मुंबईत आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी निवडणूक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदानाला उतरले पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत देण्याची विनंती करीत आहोत. धर्म, जात, भाषा, प्रांत या आधारे माणसांमाणसा मध्ये भेद करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण एकजुटीने उभे राहूया. हा देश बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या आधारे चालला पाहिजे असे स्पष्ट मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले. 

मणिपूरच्या अंदाधुंद कारभाराला आज वर्ष झाले. तरीही तेथील लोकांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. आजही मणिपूर कुठे ना कुठे जळत आहे. मात्र आमचे प्रधानमंत्री त्याच कालखंडात अनेक देशाचे दौरे करण्यात मशगुल होते. त्यांना मणिपूर मध्ये जाण्याकरिता आजही वेळ नाही. त्यांना रेपिस्टच्या प्रचाराला जाण्यासाठी वेळ आहे. बेटी बचाव म्हणणारे लोक बेटीवर अत्याचार करणाऱ्यांनाच तिकीट देतात. जे खेळाडूंच्या जीवनाशी खेळत होते त्याच लोकांना आज भाजपने तिकीट देऊन त्याचा गौरव केला आहे. म्हणून २०२४ ची निवडणूक ही संविधान आणि लोकशाही तसेच लोकशाही मधील अधिकार वाचवण्याची निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहणार की हुकूमशाही राजवट येणार याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे असे तिस्टा सटेलवाड म्हणाल्या.

लोकशाहीच्या बाजूने उभे राहण्या ऐवजी इथला काही भांडवलदारी मीडिया सरकारच्या नादाला लागलाआहे. काही प्रकरणात  केंद्र सरकार सुप्रीम कोर्टावर दबाव आणत आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला अनुकूल भूमिका बजावत आहे. राज्यपाल सत्ताधारी पक्षासाठी काम करीत आहेत. इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सरकारी संस्था सत्ताधान्यांच्या कार्यकर्त्या प्रमाणे काम करीत आहेत. विरोधकांना नामशेष करण्यासाठी आणि नागरिकांना वेठीस धरण्याकरीता या संस्थाचा उपयोग केला जात आहे.असे डोल्फी डिसुझा म्हणाले.

ही लढाई संविधानिक जनता विरोधी फॅसिझम असल्याचे स्पष्ट मत शामदादा गायकवाड मांडले. संविधान हे या फॅसिझमवाल्या मंडळींना कधीच मान्य नव्हते. त्याचे गुरू गोलवलकर यांनी लिहिलेल्या थॉट्स बंच प्रमाणेच हा देश चालला पाहिजे असे आरएसएसला वाटत आहे. मागील दहा वर्षापासून त्यांनी त्याच आधारे देश चालवण्याचा प्रयत्न केला आहे. मुसोलिनी आणि हिटरलच्याही पुढची आवृत्ती म्हणजे मोदी असल्याचे मत गायकवाड यांनी मांडले. त्यामुळे ही मंडळी जर पुन्हा सत्तेवर आली तर देशाचे अनेक तुकडे होतील. त्यामुळे आज आपली लढाई केवळ संविधान विरोधी लोकांच्यासोबत आहे. आपआपसातील मतभेद हे नंतरही मिटवता येतील परंतु आज प्रत्येकाने या लढाईत उतरून फॅसिझमला हरवणे गरजेचे आहे असे गायकवाड म्हणाले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com