Top Post Ad

संविधान बचाओ, डरो मत... संवाद करो…!!


  राजे महाराजे, भांडवलदार, सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनतेमधून जनप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता असे घटनाकारांनी सांगितले होते. आजची परिस्थिती पाहता देशावर नागरिक प्रजेची सत्ता आहे असे वरकरणी तरी दिसते का?  26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र बौद्धिक मेहनत करून लिहिलेल्या, देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्य कारभार सुरु झाला. 25 नोव्हेंबर 1949 ती सादर करण्यात आली तर त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरु झाली. त्यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. हा दिन कोणामुळे सुरु झाला?. भारतीय संविधानामुळे. भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे.  प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्याला दिलाच पाहिजे.

म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा-कॉलेज आणि संस्था-संघटनांनी संविधानाच्या शिल्पकाराला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे.  ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे. संपूर्ण देशाने त्यांना वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. कारण हा देश जातीय मानसिकतेतून बाहेर पडण्यास तयारच नाही. जाता नाही जात ती जात असे उगीचच म्हटल्या जात नाही. याच जाती-जातीत सातत्याने भांडणे लावून सत्तेच्या चाव्या नेहमीच आपल्या ताब्यात ठेवण्याचे षडयंत्र मनुवादी मानसिकतेने केले आहे. आज देश पुन्हा एकदा भांडवलशाहींच्या गुलामीकडे वाटचाल करीत आहे. तर स्वतला उच्चवर्णिय समजणारे तथाकथित दिवसेंदिवंस इथल्या मुळनिवासी बहुजन वर्गाला गुलामगिरीकडे ढकलत आहेत.  

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे केले जातात. 15 ऑगस्ट 1947 रोजी वसाहतवादी साम्राज्य नष्ट होऊन या देशातील सत्ता स्वजनांच्या हाती आली. आणि राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले. भावी काळात देशातील राज्यकारभाराची व्यवस्था कशा प्रकारची असावी या संदर्भात मग विचार मंथन सुरु झाले. स्वातंत्र्यप्राप्ती होण्याअगोदर पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही सत्ता खरीखुरी या देशातील जनतेच्या हाती असायला हवी असी मागणी केली होती. परंपरेनुसार जातीवर्चस्व स्वतकडे ठेवणाऱया समुहाकडे ती सत्ता जाता कामा नये. पिळवणूक करणाऱया एका सत्तेतून सुटका करुन घेत असतांना स्वजन जरी असले तरी वेगळ्याप्रकारे पिळवणूकच करणाऱया हितसंबंधी लोकांकडे ती सत्ता जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. असे ते निक्षून सांगत आले. मात्र इथल्या तथाकथित वर्चस्ववाद्यांनी सत्तेची सर्व केंद्रे आपल्या ताब्यात ठेवली. जेव्हा ती बहुजन वर्गाकडे जाऊ लागली तेव्हा लगेच इव्हीएमद्वारे सत्ता हातात घेऊन बहुजनवर्गाला कायमचे गुलाम करण्याचे षडयंत्र सुरु केले आहे. ज्यात सर्व प्रथम इथली शिक्षण व्यवस्थेचेच तीन तेरा वाजवण्यात आले. मागील 10 ते 15 वर्षापासून प्राध्यापकांची भरती न करता कंत्राटदारी शिक्षण व्यवस्था सुरु करण्यात आली. इतकेच नव्हे तर शैक्षणिक पाठ्यपुस्तकातून महापुरुषांच्या जीवनचरित्रांना वगळण्यात आले.आणि धार्मिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला. 

इंग्रजांची सत्ता 150 वर्षे होती पण पोर्तूगीजांची सत्ता तर 451 वर्षे होती. तरीही त्यांच्याविरूध्द उठाव का झाले नाही? याचे कारण म्हणजे पार्तूगिजांनी फक्त व्यापार केला. त्यांनी कधीच धर्मावर बोट ठेवले नाही. याउलट इंग्रजांनी धर्माला विरोध केल्याने बामणांचे वर्चस्व कमी होईल अशी भिती होती. म्हणून फक्त इंग्रजांविरूध्दच उठाव झाल्याचे आपणास दिसते.  झाशीच्या राणीने कधीच इंग्रजांविरूध्द बंड केले नाही .पण जेव्हा तिच्या मुलाचा दत्तकवारसा हक्क इंग्रजांनी नाकारला तेव्हाच ती उठावात सामील झाली. तरी तिच्या उठावाच्या कहाण्या खूप सांगितल्या जातात. बाबासाहेबांनी फक्त इथल्या दलितांसाठी कार्य केले असे कायमच भासवले जाते. जर बाबासाहेब फक्त दलितींसाठीच झटले तर मग राज्यघटनेतील पहिली आरक्षणाची कलम ध्ँण्साठी का लिहीली? बाबासाहेबांनी सर्व बहुजन भारतीयांसाठी कार्य केले. मात्र या सर्व गोष्टी तमाम भारतीयांपर्यंत पोहोचवण्यात पुरोगामी चळवळीतील मंडळी कमी पडली. आणि आज भारताला पुन्हा एकदा संविधान सांगण्याची गरज भासू लागली. मागील काही वर्षात संविधानाबद्दल कधीच कुठे प्रचार आणि प्रसार करण्यात येत नव्हता. 26 जानेवारी म्हणजे सत्यनारायणाची महापूजेचा दिवस असाच एक प्रघात निर्माण करून ठेवण्यात आला होता. आजही काही प्रतिगामी मंडळी त्यासाठी आग्रही आहेत.  

भारतात दोन विचारधारा क्रांती व प्रतिक्रांतीच्या पथदर्शक आहेत. पुरोगामी चळवळ क्रांतीच्या मार्गावर चालणारी  तर आरएसएसची प्रतिक्रांतीच्या  दिशेने सातत्यपूर्ण मार्गक्रमण करणारी. आरएसएसला इथली संविधानिक लोकशाहीची, स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाची  व्यवस्था उध्वस्त करायची आहे  व त्या दिशेने ते पाऊले टाकत आहेत. तर दुसरीकडे पुरोगामी चळवळीला स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाचे संवर्धन, पालनपोषण व संरक्षण करणारी  संविधानिक लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. मात्र सत्तेच्या चाव्या आणि त्यामुळे आर्थिक सत्ता केंद्र हाती असल्याने आरएसएसच्या शाखा वाढत आहेत. वाढणाऱ़या शाखांमध्ये तरूणाईचा भरणा होत आहे.  तरूणांना आकर्षित करून आरएसएसने पुढच्या प्रतिक्रांतीच्या 50-60 वर्षाची तजविज आजच करून ठेवली आहे. ज्याचे परिणाम आज इथला बहुजन वर्ग भोगत आहे. बेरोजगारीच्या गर्तेत अडकलेला तरुण चार पैशासाठी सहजपणे या प्रतिक्रांतीच्या जाळ्यात अडकत आहे. परिणामी संविधानीक व्यवस्था उध्वस्त करण्यास तोच बेरोजगार युवक कारणीभूत ठरत आहे. आपले संविधानिक हक्क तोच पायदळी तुडवत आहे. आणि दुसऱयांसमोर हात पसरत आहे. याचा फायदा घेऊन इथला नवा संरजामदार वर्ग त्याच्या समोर तुकडे फेकत आहे. त्याचा हवा तसा वापर करून घेत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी इथल्या प्रत्येकाला आपले हक्क मिळवण्याची संधी दिली होती. मात्र आज इव्हीएमच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेने ती आपल्या हातात घेतली आहे. आणि भारतीय व्यवस्था पुन्हा नव्या गुलामगिरीकडे वाटचाल करीत आहे. 

आजची देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती अतिशय विदारक आहे. सर्वच क्षेत्रात अराजक माजले आहे. आपण सूज्ञ व जागृत असाल तर याची दाहकता निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचलेली असणार. आजच्या विद्वेषी, उन्मादी, जात-धर्मवादी, वर्चस्ववादी व दडपशाहीच्या वातावरणात सामान्य माणसाला दैनंदिन जगणे आणि  दुनियादारी निभावणे अतिशय कठीण व अवघड होऊन बसले आहे. आज सत्तेत असलेल्या बहुसंख्यांकवादी धर्मवाद्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन, दलित आणि बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनावर चहुबाजुंनी आक्रमण केले आहे. हे सर्व अपघाताने वा तत्कालिक कारणांनी मुळीच घडत नाही. त्यामागे संवैधानिक प्रजासत्ताकाऐवजी, धर्मसत्ताक राज्यव्यवस्था आणण्याचे मोठे व पद्धतशीर षडयंत्र आखण्यात आले आहे. आणि या प्रकारचे षडयंत्र एवढ्याच संपणारे नाही. सर्वधर्मसमभाव या तत्वावर आधारित राष्ट्राऐवजी, हिंदूराष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय साध्य होईपर्यंत या धर्मवादी शक्तींच्या विद्वेषी आणि हिंसक कारवाया सुरूच राहील, हे संविधानप्रेमी नागरिकांनी ध्यानात ठेवले पाहिजे. परिणामी, शांतताप्रिय नागरिकांना नजिकच्या काळात आजच्या पेक्षाही अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.अशा कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत सर्व बहुजन समाजाला, अशा विभाजनकारी शक्तींविरोधात मोठा वैचारिक व कृतिशील लढा उभारावा लागणार आहे. इथल्या मातीतील दिव्य परंपरा असलेल्या प्राचीन 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच मिलीजुली गंगा-जमुनी' संस्कृतीमुळेच, आजवर आपण सारे भारतीय नागरिक प्रेम, सौहार्द आणि बंधुभावाने बांधले गेलो आहोत. 

मात्र आपल्या देशातील हा उदात्त आणि 'विश्वात्मक' सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा सर्वंकष प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. भारतीय मातीतच वाढलेल्या एका विशिष्ट समाजाविरूद्ध द्वेष व हिंसा भडकवून, या महत्त्वाच्या समाजघटकाला उध्वस्त करणाची ही प्रक्रिया 'बाबरी मस्जिद' उध्वस्त करण्यापासून सुरू झालेली आहे. यानंतर या प्रतिगामी शक्ती सातत्याने मुस्लिम समाजजीवनावर हल्ला व आघात करीत आहेत. गुजरातमधील नरसंहार, विविध बॉम्बस्फोट प्रकरणात मुस्लिम समाजाला दहशतवादी व देशद्रोही म्हणून लक्ष्य करून निरपराध नागरिकांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगवासात डांबणे, काश्मीरबाबत लागू असलेले राज्यघटनेतील 370 वे कलम, राष्ट्रपती राजवटीत दडपशाही करून रद्द करणे, समान नगरी कायदा व सीएए व एनआरसी सारखे धार्मिक भेदावर आधारित अन्यायकारक कायदे मंजूर करण्याची धिसडघाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे धर्मांतर बंदी, तीन तलाकबंदी, बुरखाबंदी, आदी भीतीदायक कायदे करण्याचा केंद्र सरकारने चंग बांधला आहे.  या सर्व बाबी कमी म्हणून की काय लव जिहाद, लँड जिहाद, आर्थिक बहिष्कार, गोमास बंदी, मॉब लिंचिंग, धार्मिक दंगली घडवून आणण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. इस्लाम धर्मीयांच्या दृष्टीने सामाजिक व ऐतिहासिकदृष्ट्या आदर्श असलेल्या व्यक्ती, घटना व परंपरांची राजरोस बदनामी करण्याची तसेच त्यांचे विकृतीकरण करून मुस्लिम समाजाच्या विरोधात द्वेष व घृणा पसरवण्याची आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याची मोहीम ही धर्मवादी मंडळी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून राबवित आहेत. महान स्वातंत्र्य सेनानी बहादूरशाह जफर, टिपू सुलतान, आदी प्रेरणादायक ऐतिहासिक व्यक्तींनाही देशद्रोही ठरवण्याचे उद्योग सर्रास सुरू आहेत.  अशा असत्य, खोट्या, विकृत व जीवघेण्या गोष्टी आणि घटनांच्या विरोधात जरासुद्धा प्रतिवाद किंवा प्रतिकार केल्यास त्यांना देशद्रोही, गद्दार, मुघलांची अवलाद ठरून त्यांची घरेदारे, मालमत्ता बुलडोझरने उध्वस्त केली जात आहे. 

या प्रकारे, सध्याच्या राज्यकर्त्यांनी अत्यंत भयावह अशी गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. केंद्र व राज्य सरकार या सर्व दुष्प्रचाराला खतपाणी घालत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशा प्रकारे, समाजांचे ध्रुवीकरण करून, आपली राजकीय सत्तेची पोळी भाजून घेणे आणि देशभरात स्वतच्या पक्षाचे व त्यांच्या संघटनांचे वर्चस्व निर्माण करण्याचाच हा प्रकार पूर्णपणे लोकशाही व संविधानविरोधी आहे.दुर्दैवाने, आजच्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी देखील आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे. संसद असो वा जाहीर सभेतील भाषणांमधून अशोभनीय आणि द्वेषमूलक अशी हिंसक भाषा उघडपणे वापरली जात असून, त्यामुळे समाजामध्ये विविध जातीय व धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचाच हेतू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अशा विखारी भाषणांना वा वक्तव्यांना अमाप प्रसिद्धी देऊन स्वतचा टीआरपी वाढवण्यासाठी गोदी मीडिया फारच सक्रीय बनली असून, त्यामुळे समाजामध्ये गंभीर परिणाम उमटत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. 

ही  सर्व परिस्थिती लक्षात घेता आता सुज्ञ आणि संवेदनशील नागरिकांनी जागे होणे आणि निराशावादी विचार सोडून देऊन संघटितपणे विचार व कृती करणे आता अनिवार्य बनले आहे. त्यादृष्टीने आपण आपल्या कुटुंबियांना, युवापिढीला जागृत केले पाहिजे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्राया राज्यकर्त्यांपासून दूर राहून, आपले शेजारपाजारी राहत असलेले लोक, नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळी यांच्याशी जाणीवपूर्वक संवाद करणे गरजेचे बनले आहे. सद्यपरिस्थितीत, प्रत्येक भारतीयांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आणि परस्परांमधील सदभाव, प्रेम व सहकार्याची भावना बळकट करणे क्रमप्राप्त बनले आहे.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानातील उदात्त व चिरकालीन मूल्यांचे नव्या पिढीवर संस्कार करण्याच्या स्वच्छ व पवित्र विचाराने प्रेरित होऊन, सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ भारत देशाची उभारणीकरिता पुन्हा एकदा प्रयत्न करणे गरजेचे आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com