Top Post Ad

ईव्हीएम निवडणूक प्रक्रिया कोणाच्या फायद्याची

 


 आजघडीला ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना विरोध वाढतच चालला असून, देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ईव्हीएमवर संशय असल्यानेच, "मतदान-पत्रिका नाही; तर, निवडणूक नाही" या करीता नागरी संरक्षण दिनाचे औचित्य साधून  देशातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात, या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जनजागृती आंदोलन करण्यात आले  ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हटाव आंदोलनाचे आयोजन धर्मराज्य पक्षा'च्या वतीने करण्यात आले होते्. पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या नेत्या वंदनाताई शिंदे  उपस्थित होत्या.

 आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसेच, भविष्यातील आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मतदानाची प्रक्रिया ही, ईव्हीएमवर न घेता, ती मतपत्रिकेवर घेण्यात यावी त्याबाबत, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले.  याबाबतचे पत्र ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना देण्यात आले, तसेच केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनाही, सदर पत्र पाठविण्यात आले्

 यावेळी, राजन राजे म्हणाले की, "संविधानकारांनी पसंतीचे लोकप्रतिनिधी, सरकार निवडण्यासाठी आणि अपयशी राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी मतदानाचा अधिकार देऊन, भारतीय जनतेला सामर्थ्यवान बनवलं आहे. मात्र, राज्यकर्त्यांनी ईव्हीएमला मतदानाचा अधिकार निष्प्रभ करणारे हत्यार बनवलं आहे. ईव्हीएम म्हणजे, साधे मतदान यंत्र नसून, जनतेतील असंतोष आणि सरकारविरोधी जनमत उखडून फेकणारे जेसीबी मशीनच आहे. सरकारबद्दल तीव्र नाराजी असताना, सत्ताधारी पक्षाला विक्रमी बहुमत मिळण्याचा चमत्कार, केवळ ईव्हीएममुळेच घडून आलेला आहे. निवडणूक आयोग हे, मोदी-शहांचं बटिक तर आहेच; मात्र, त्याचबरोबर देशातील सर्व स्वायत्त संस्था मोदी-शहा या जोडगोळीने आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. जर्मनीचा हिटलर आणि इटलीचा मुसोलिनी यांचा अस्त झाल्यानंतर, त्या देशांतील हुकूमशाही संपली असली तरी, भारतावरील फार मोठा धोका आपल्याला वेळीच ओळखता आला पाहिजे. भविष्यात मोदी-शहांचा पाडाव झाला; तरी, कृपा करुन कोणीही भ्रमात राहू नये की, देशात तात्काळ लोकशाहीचा जागर सुरु होईल. याचं कारण असं की, भारतात धनदांडग्या भांडवलदारांची फार मोठी लॉबी कार्यरत आहे. आपल्याला हे वेळीच ओळखून, सावधपणे पाऊले टाकणे गरजेचे आहे!" असा जोरदार घणाघात केला. "जगातील १९४ देशांपैकी १२० देशांमध्ये, निवडणुका मतदान पत्रिकेद्वारेच होतात. इटली, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड आदी देशांनी ईव्हीएमपद्धती बंद करुन, मतदान पत्रिकेचा स्वीकार केलेला आहे. मग, भारतामध्येच ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेला बिलगून बसण्याचा हट्ट कशासाठी?" असा थेट सवाल राजन राजे यांनी यावेळी प्रशासनाला विचारला.

*दरम्यान,* ईव्हीएमद्वारे केल्या जाणाऱ्या मतदानाबाबतचा संशय दूर करण्यासाठी, व्हीव्हीपीटी स्लिप मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली असली तरी, निकाल वादग्रस्त ठरल्यास, त्या स्लिप मोजण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली नाही, याकडे लक्ष वेधून, राजन राजे पुढे म्हणाले, "निवडणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये हेराफेरी करणे सहज शक्य आहे. लोकशाही वाचवायची असेल तर, ईव्हीएम हद्दपार करावीच लागेल. ईव्हीएमच्या वापरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ मानके निश्चित करण्यात आलेली आहेत, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. एखाद्या उमेदवाराने आक्षेप नोंदविला तर, या प्रक्रियेत पुन्हा मतमोजणीची तरतूद नाही. या मशिनसंदर्भात, आक्षेप नोंदविला गेलेला होता, याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झालेली आहे. दरम्यानच्या काळात, न्यायालयाने केंद्र शासनाला या मशीनला पेपर ट्रेल बसविण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी निवडणूक आयोगाने ३० महिन्यांचा अवधी मागितला होता. 

मात्र, वर्ष-२०१९च्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर, ३० महिन्यांचा अवधी संपला. याच पार्श्वभूमीवर, उत्तरप्रदेशात ज्या ठिकाणी मतपत्रिकेवर निवडणुका पार पडल्या, त्या ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे. ईव्हीएम संशयाच्या भोवऱ्यात येण्याचे हेच महत्त्वाचे कारण आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ज्या जपानमध्ये ईव्हीएमच्या चीपची निर्मिती केली जाते, त्याच जपान देशात निवडणुकांसाठी मशीनचा वापर केला जात नाही, याचीही आठवण राजे यांनी आपल्या भाषणातून करुन दिली. "२०२४ हे निवडणुकांचे वर्ष म्हणून गणले जाणार आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने कसून, ईव्हीएम जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ईव्हीएमविरोधी आंदोलन ही, देशातील लोकशाही वाचविण्याची लढाई आहे. ईव्हीएमच्या जागी मतपत्रिका असल्याशिवाय, देशात सत्तांतर शक्य नाही. भाजपने २०१९च्या निवडणुकीत ३००च्या पुढे जागा जिंकण्याचा नारा दिला होता आणि ३०३ जागा जिंकून तो खरा करुन दाखवला. आता त्यांनी, ४०० पारचा नारा दिलाय. 

देशातील ८० टक्के जनतेत असंतोष खदखदत असताना, भाजप ठरवेल तितक्या जागा जिंकण्याचा आत्मविश्वास ईव्हीएमच्या माध्यमातूनच येत असून, कोणतेही बटण दाबले की, मत कमळाला जाते. त्यामुळे मतदानाची ही प्रक्रिया बोगस असून, गेली १० वर्षे मोदी सरकारने जनतेच्या मतांची चोरी केलीय. ईव्हीएमबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. निवडणुकीत ईव्हीएमचे प्रोग्रामिंग करता येत असल्याने, लोकशाही धोक्यात आलेली आहे. संतापजनक बाब म्हणजे, देशभरात १८ लाख ९४ हजार मशिन्स गायब असून, १७ लाख ६ हजार मशिन्स नादुरुस्त आहेत. या गायब आणि नादुरुस्त मशिन्सबाबत, निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही आणि इथेच, भाजपच्या अनैतिक विजयाची खरी गोम आहे. म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने सदर आंदोलन पुकारुन, ईव्हीएमविरोधातील हा लढा आता, संपूर्ण राज्यात उभारला जाईल" असा ठाम निर्धार करण्यात आला असल्याचे मत पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com