Top Post Ad

पुस्तकांमधून मिळणारे वैचारिक साहित्य दीर्घकाळ टिकणारे असते – मुख्य सचिव डॉ. नितीन करीर

 


 इंटरनेट हे जरी सर्वांसाठी खुले असले तरी त्याचा वापर हा क्षणिक असतो, मात्र वाचन हे क्षणिक नसते, पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारे वैचारिक साहित्य हे दीर्घकाळ टिकणारे असते. सामाजिक जीवनात वावरत असताना पुस्तके आणि वाचन हे खूप महत्वाचे आहे. पुस्तकांमधून आपण केवळ  शिकतो किंवा आपले मनोरंजन होतेच असे नाही तर आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि तो महत्वाचा असल्याचे मत राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले.

            ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित 'विचारमंथन' व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्ताने  आयोजित 'वाचन आणि मी' या विषयावरील  13 वे पुष्प बुधवारी (14 फेब्रुवारी) रोजी ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी गुंफले, यावेळी अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्य सचिव   डॉ. नितिन करीर हे होते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यवरांचे ग्रंथबुके व चित्रप्रतिमा देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे उपस्थित होते.

         पुस्तकाचे वाचन सैरभैर असायला हवे, ते एकांगी असू शकत नाही. अवांतर वाचनाचे महत्व हे सर्वांनी जाणून घ्यायला हवे. कुठल्याही कलेचा आनंद मग संगीत असो की वाचन ते अवांतर असायला हवे. पुस्तकांचे वेगवेगळे जॉनर आहेत, यापैकी कुठलेतरी एक जॉनर आपल्याशी बोलत असते.  कुठल्या प्रकारची पुस्तके आपल्याशी बोलतात आणि हा पुस्तकांचा प्रवासच इतका छान असतो आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुस्तके सतत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतात फक्त आपली ऐकण्याची तयारी असली पाहिजे असेही  डॉ. नितीन करीर यांनी नमूद केले.           यावेळी वाचन आणि मी यावर बोलताना ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, आटपाडीमध्ये मी शिकत असताना वाचनाला फार अनुकूल परिस्थ‍िती नव्हती, शाळेत वाचनालय नव्हते. मात्र घरामध्ये वाचनाचे वातावरण होते, कळत्या वयापासून मी महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्र वाचत आहे. तसेच माझ्या आजीला संध्याकाळी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचून दाखवायचो त्यामुळे वाचनाची सवय होती. पण खऱ्या अर्थाने ज्योत्स्ना प्रकाशनाच्या 'इट्टू पिट्टू' या सारख्या गोष्टीतून वाचनाला सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

            शाळेतील कथाकथन स्पर्धेसाठी जाताना आजीने सांगितलेली खुदीराम बोस यांची गोष्ट सांगितली आणि ती जेवढी गोष्ट ऐकली तेवढी शाळेत जावून सांगितली आणि त्याला मला पहिल्या क्रमाकांचे पारितोषिक मिळाले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने घरातून वाचनाला सुरूवात झाली. त्यावेळेस वर्तमानपत्राव्यतिरिक्त दुसरं काही वाचण्याचे साधन नव्हते, तेव्हा 15-20 दिवाळी अंक हे एकेकजण करुन वाचत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही काळानंतर आटपाडीमध्ये वाचनालय सुरू झाल्यानंतर वाचनाचा ओढा वाढला. सुरूवातीला जादूच्या गोष्टींची पुस्तके वाचल्यानंतर सुहास शिरवळकर, व.पु.ची पुस्तके वाचण्यास सुरूवात झाली. चोखंदळ वाचक जसा असतो तसा मी तेव्हाही नव्हतो आणि आताही नसल्याचे श्री. खांडेकर यांनी नमूद केले. माझे वाचन हे एका दिशेने कधीच नव्हते.. जशी दिशा मिळेल तसं वाचत आलो असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. शैलजा राजे, कुसुम अभ्यंकर, ज्योत्सना देवधर या लेखिकांची पुस्तके वाचण्यास सुरूवात केली. त्यानंतर सांगलीला महाविद्यालयात आल्यानंतर जी.ए ची पुस्तके वाचली. प्रत्येक टप्प्यावर जेव्हा मी जात होतो तेव्हा वाचनांचा परिणाम थेट जाणवत होता.

               पत्रकारितेत गेल्यानंतर पुस्तकं वाचनात अचानक खंड पडला. पण रंगनाथ पठारे यांची 'ताम्रपट' आणि अरुण साधू यांची 'शोधयात्रा' या कांदबऱ्यांनी वाचनाची परत सुरूवात झाली. जे हातात येईल ते आनंदाचा भाग म्हणून वाचत होतो. तसेच ललित साहित्याचे वाचनही केले. याच काळामध्ये सुरेश जाधव हे पुण्याच्या सकाळमध्ये ग्रंथपाल होते, त्यांचे फार उपकार आहेत, जेव्हा चांगली पुस्तके निकालात काढायचे तेव्हा सुरेश जाधव हे पुस्तके निवडून मला पाठवित असतं. त्यामुळे दुर्गाबाईंची पुस्तके, 'अर्वाचीन महाराष्ट्राचा इतिहास' अशी पुस्तके वाचत राहिलो. या सर्व प्रवासात इंग्रजीचे वाचन हे तितक्या प्रमाणात झाले नाही. पण ऑलवीन पॉप्युलरच्या पुस्तकांनी इंग्रजीतून वाचनाची सवय सुरू झाली. पॉप्युलरमुळे बदलत्या जगाची माहिती मिळत गेली व त्यामुळे  काय होवू शकतं याचा अंदाज आला.

               संदर्भ जोडणं हा आता कामाचा भाग  झाला असल्यामुळे संदर्भ शोधण्यासाठी वाचलेली पुस्तके आनंद देवून जात असल्याचेही श्री. खांडेकर यांनी नमूद केले. पत्रकारितेचा पेशा असल्यामुळे पुस्तकांबरोबर लेखकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यातून प्रत्यक्ष माणसांना भेटून त्यांना वाचण्याची जी संधी मिळाली ती अत्यंत अविस्मरणीय अशीच होती. पुस्तके वाचताना त्यातून जे मिळतं ते इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आनंद देणारे असते. योगातून आपल्याला जे मिळते तेच वाचनाच्या योगातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.             वाचण्यातून मिळणारा आनंद सगळ्याच्या पलीकडचा आहे. जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा प्रत्येक जण त्याबद्दल त्याची मते तयार करत असतो आणि ही क्षमता वाचनातून मिळते. शेवटच्या क्षणापर्यत आपल्याला वाचता येणं हे फार महत्वाचे आहे. जो पर्यत आपण वाचू शकतो तो पर्यत वाचत राहिले पाहिजे असेही  खांडेकर यांनी नमूद केले.    शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना मुक्तपणे पुस्तके हाताळण्यास संधी मिळावी यासाठी महापालिकेच्या शाळेत सुरू केलेला 'वाचन कोपरा' हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. शाळेच्या मुलांसाठी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर व ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com