Top Post Ad

'जेव्हा मी जात चोरली होती ' कथासंग्रहाची साठ वर्षे


   विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार म्हणून बाबुराव बागूल यांची साहित्यक्षेत्रात ओळख आहे. तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक,  प्रभावी व विद्रोहीभाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. दलित साहित्य मध्ये मोठे योगदान देणारे एक प्रतिभावंत लेखक साहित्यिक म्हणून बाबूराव बागूल यांना एक नवी ओळख मिळालेले आहेत त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबऱ्या या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं व वेदनांचं वर्णन करणारे आहेत. 

 'जेव्हा मी जात चोरली होती ' ह्या कथासंग्रहात बाबुराव बागूलांनी आपल्या समाज व्यवस्थेला जखडलेल्या अनेक गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे, जातीयता , स्त्री - असमानता , अंधश्रद्धा , वर्णभेद , निरक्षरता , या सर्वांची ओळख करून देणारा का कथासंग्रह आहे. यातील प्रत्येक कथेतील माणसे कुठल्या तरी टोकाला जाऊन पोहोचली आहेत. सुडाच्या, संतापाच्या, दु:खाच्या, दैन्याच्या अशा टोकावर जाऊन पोहोचलेली आहेत की कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार आहे हे कळत नाही. आशय आणि विषय यात बाबुराव बागुल यांची कथा वरचढ ठरते. वेदना विद्रोह आणि नकार तीन मुद्द्यांनी जगलेलं भोगलेलं तेच शब्दात मांडल अशा स्वरूपाच्या कथा बाबुराव बागुल यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी माणसांना नाविलाजाने कोणत्या थराला जावे लागते आणि शेवटी त्याच्या नशिबी दारुन दुःखच कसे येते याचे हृदयस्पर्शी वर्णन बाबूराव बागूल यांच्या कथेतून येते. 

त्यांच्या कथेतून आहे रे आणि नाही रे यांची दरी स्पष्ट होते. त्यांच्या कथेतील माणसं भंगलेली, दुभंगलेले, रजलेली गांजलेले जरी असली तरी त्यांच्या मनातील आश्वासकता की उद्याच्या सूर्याचा विचार करून आयुष्याला ऊब आनणारी आहेत. यामुळे त्यांनी उभारलेल्या साहित्याला आणि साहित्यातल्या माणसाला क्रांती आणि त्यातून निर्माण होणारे उद्याचे आयुष्य हे प्रखरपणे जाणवते. जिवंत भाषाशैली, आश्वासक विचार, बंडखोर शब्दयोजना आणि शेवटी व्यवस्थेसमोर माना न टाकता येणारे शब्द यामुळे वाचकाच्या मनात एक प्रकारचे हृदयद्रावक चित्र निर्माण होते. बाबुराव बागुल यांचे नायक व नायिका जरी सामान्य असले तरी त्यांच्या वागण्यातला असामान्यपणा बाबूराव बागूल यांनी मोठ्या खुबीने रेखाटला आहे. आज या कथासंग्रहाला साठ वर्षे झाली असली तरी त्यातील जग हे आजही तसेच आहे. २१व्या शतकात आम्ही वैज्ञानिक युगात प्रवेश केला असला तरी दुसरीकडे जात व्यवस्था अधिक घट्ट होत आहे. हे पदोपदी दिसून येत आहे. गावखेड्यात आजही जातीच्या नावावर अन्याय अत्याचार होतच आहेत. इथल्या प्रस्थापितांना ह्या जातीव्यवस्थेशिवाय आपली सत्ता अबाधित ठेवता येणार नाही. म्हणून जातीव्यवस्था अधिक दृढ कशी होईल यावर त्यांचा कटाक्ष आहे. आणि त्याला इथला सर्वसामान्य बहुजन वर्ग बळी पडत आहे. 


शनिवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी ठाण्यात बाबुराव बागूल साहित्य विचार परिषद
 'जेव्हा मी जात चोरली होती' या कथा- संग्रहाला यावर्षी साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमिताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने बाबुराव बागूल साहित्य विचार परिषद् शनिवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १0.30 वा. सुरु होणाऱ्या  या परिषदेचे उद्घाटन शे.का.प.चे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी शिवा इंगोले असणार आहेत या उद्घाटन सत्रात सुभाष लोमटे, कॉ. किशारे ढमाले, मधू मोहिते, त्रिशिला कांबळे आणि रवी मोरे हे प्रमुख पाहून म्हणून सहभागी होणार आहेत.  दुसऱ्या सत्रात बाबुराव बागूल यांचा समग्र साहित्य विचार या विषयावरील चर्चासत्रात  राम दुतोंडे, डॉ. प्रकाश मोगले, प्रा. वंदना महाजन, डॉ. बी. रंगराव, डॉ. अनंत राऊत सहभागी होणार आहेत तर  अध्यक्षस्थानी प्रा. प्रकाश शिरसाठ हे असणार आहेत.  दुपारी ४ ते ६ या सत्रात बाबुराव बागूल यांची समकालिन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टि या विषयावरील चर्चेत कॉ. विश्वास उटगी, अॅड. एम. ए. पाटील, डॉ. संजय रामराजे, अरविंद सुरवाडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. तर अध्यक्षस्थानी शामदादा गायकवाड असणार आहेत. या साहित्य जागर परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी केले असून सर्व संबंधितांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती आयोजक संस्थेचे सचिव अॅड नाना आहिरे यांनी केली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com