Top Post Ad

दिव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांचे लोकार्पण


 बुधवारी दिव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांचे लोकार्पण

तर भाजपाच्या वतीने बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिवा-ठाणे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भुमीपूजन करण्यात येणार आहे. बुधवार 7 जून रोजी ,सायं.5.30 वाजता, धर्मवीर नगर, दिवा आगासन रोड पुर्व येथे शिंदे यांच्या हस्ते दिव्यातील नवीन मुख्य जलवाहीनी लोकार्पण करणे, दिवा-आगासन मुख्य रस्ता,मातोश्री नगर येथील आरोग्य केंद्र,दातिवली गाव येथील व्यायाम शाळा,दातिवली गाव येथील खुला रंगमंच,पँकेज नंबर 214,साबेगाव येथील शाळा.क्रं.80 यांचे लोकार्पण होणार आहे.तर आगासन देसाई खाडीपुल, आगरी कोळी वारकरी भवन, धर्मवीर नगर येथे सामाजिक भवन, पँकेज नं.351,दातीवली येथील तलावाचे सुशोभिकरण,दिवा-शिळरोड बांधणी,पुरातत्व खिडकाळेश्वर शिवमंदिर परिसर सुशोभिकरण,देसाई गाव तलावाचे सुशोभिकरण आदी विविध विकास कामांचा भुमिपुजन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला दिव्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रमाकांत मढवी, शैलेश पाटील आदींनी केले आहे.

दरम्यान भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शहर बकाल होण्यास शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत पुराव्यांसह तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यावेळी बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन भरवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे दिव्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्रित सत्तेवर असले तरी दिवासह एकंदरीतच ठाण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये फारसे पटत नसल्याचे चित्र आहे. या नेत्यांमध्ये असलेले विळा-भोपळय़ाचे नाते पुन्हा समोर आले आहे.
 दिवा शहर बकाल होण्यास शिवसेना (शिंदे गट) दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला. 

दिवा शहरात पाण्याचा मोठा प्रश्न असतानाही पिण्याचे पाणी बेकायदा बांधकामांना देण्यात येत आहे. आर्थिक लाभासाठी येथील प्रशासन व स्थानिक शिवसेना बेकायदा बांधकामाचा भस्मासूर उभा करत आहेत. एकीकडे क्लस्टर योजना होत असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकाम जोमाने वाढत असल्याने क्लस्टर योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. दिव्यातील नागरिकांना प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत. स्लॅबमागे ३ लाख रुपये घेऊन दिवा शहरात बेकायदा बांधकामे जोमाने सुरू आहेत. याला आयुक्त, पालिका अधिकारी प्रितम पाटील आणि दिव्यातील शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. यानिमित्ताने दिव्यातील शिवसेना (शिंदे गट )आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाटय़ावर आल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com