Top Post Ad

बाळासाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पहिला मेळावा


 चळवळीतील विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करायचे. रिपाइंच्या दुफळित न गुरफटता नव्याने संघटनेची बांधणी करण्याचे लक्ष ठरवून आपल्या वकीली व्यवसायातून वेळ काढून मा बाळासाहेब आंबेडकरांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली. सुरूवातीला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी समूहाला एकत्र आणण्यासाठी धम्म कार्य हाती घेतले.संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय मिराताई आंबेडकरांनी धम्म चळवळीचा मोर्चा खंबीरपणे सांभाळला.

तर मा बाळासाहेब आंबेडकरांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरुवात केली. अकोल्यात मे 1980 मध्ये मा बाळासाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पहिला मेळावा घेण्यात आला. तत्कालीन नगर परिषदेच्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बी आर शिरसाट आपले महाविद्यालयीन शिक्षण कॉमर्स कॉलेजमध्ये घेत होते. आचार्य दिनबंधू गुरूजी, लंकेश्वर गुरूजी यांनी विद्यार्थी मेळाव्याची जबाबदारी बी आर शिरसाट ह्यांच्याकडे दिली होती. तत्कालीन विद्यार्थी चळवळीतील बी आर शिरसाट, प्रभाताई खंडारे ( नंतर बी आर यांच्याशी विवाह)चंद्रमणी शिरसाट, देशकर सरदार, रमेश तायडे, प्रभू जंजाळ, अनिल सोनोने, मधु पाटील, राऊत, इंगळे ,चक्रनारायण व अन्य सहकाऱ्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
विशेष म्हणजे त्यावेळी अकोला जिल्ह्यात खासकरून अकोला शहरातील प्रत्येक महाविद्यालयात रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन हि संघटना अस्तित्वात होती. परंतु पुर्वंपार फुटीची किड लागलेल्या संघटनेला हात न लावता नवीन संघटना उभारण्याचे धोरण मा बाळासाहेबांनी ठरविल्याप्रमाणे अकोल्यात त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी फेडरेशन म्हणून विद्यार्थी संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
यावेळी कार्यक्रम संपल्यावर फोटोशूट करण्यात आले. कार्यक्रमाचे बँनर मी स्वतः पेंट केले होते. आतासारखे डिजिटल बँनर वा स्क्रीन पेंटिंग बँनरची विज्ञान अस्तित्वात नव्हते. कापड घेऊन त्यावर मजकूर पेंटिंग करण्याची पध्दत होती. फोटोत मी सर्वांच्या मागे एका बाजूला बँनर धरून उभा होतो. त्याचे कारण असे होते की, भिंतीला एकाच बाजूला खिळा ठोकलेला होता. मी लहान असल्याने टेबलवर उभा राहू शकत होतो. त्यामुळे मला ऐनवेळी सांगितल्यावरून फोटोशुट होईपर्यंत हातात धरून उभा होतो.नुकतीच मी दहावीची बोर्डाची परिक्षा दिली होती. फोटो काढताना आपण फोटोत येऊ की नाही हेही माहीत नव्हते. आता मात्र हा फोटो इतिहासाची साक्षीदार ठरतो आहे याचा आनंद आहे.

----------------------


1980 ते 2023 या 43 वर्षांच्या काळात राजकीय व्यासपीठावर स्वाभिमानाने गतीमान नेतृत्व देवून दलित, आंबेडकरी समूह एससी एसटी ओबीसी मायक्रो ओबीसी आदिवासी मुस्लिम यांना स्वाभिमानाचे राजकीय धडे देवून राजकीय सत्ता हिच सर्व समस्यांची गुरूकिल्ली आहे असे कृतीतून सांगणाऱ्या गतीमान, नितिमान आणि बुध्दीमान नेतृत्वचा म्हणजेच अॅडो प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचा आज 10 मे रोजी 69 वा वाढदिवस साजरा होत आहे.
गटा तटात विखुरलेल्या रिपाइंच्या नेत्यांनी आपला स्वाभिमान कॉंग्रेसच्या पायावर गहाण ठेवून आंबेडकरी जनतेला वाऱ्यावर सोडले होते. या सौदेबाज नेत्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष, त्यांचा फोटो झेंडा म्हणजे चलनी नोटा होत्या.एकप्रकारे कमाईचे साधन होते. "सिट ओर नॉट सिट वोट फॉर कॉंग्रेस" या धोरणाप्रमाणे गटातटातल्या नेत्यांनी रिपाइं ,चळवळ कॉंग्रेसच्या दावणीला बांधली होती.मात्र खऱ्या अर्थाने आंबेडकरी जनता हवालदिल झाली होती. नेतृत्वाची मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती.
दलित पँथरचा उदय, विवेकशील दुरदृष्टीच्या नेतृत्वाचा अभाव, नामांतराचा चिघळलेला प्रश्न, नामांतराचा प्रश्न हाताळण्यास असक्षम नेतृत्व, नामांतराच्या प्रश्नातून समाजाची झालेली हानी, यातून मेटाकुटीला आलेला ,हन्यास झालेला समाज, हताश आणि निराश झालेल्या समाजाला आपला कुणीच नाही अशी त्यावेळची परिस्थिती निर्माण झालेली असताना आपल्या वयाच्या 26 व्या वर्षी मा अॅडो बाळासाहेब आंबेडकरांचा 1980 ला झालेला सामाजिक, धार्मिक आणि राजकीय उदय म्हणजे आंबेडकरी चळवळीला मिळालेली एकप्रकारे संजीवनीच होय

सुरेश रा.शिरसाट, अकोला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com