Top Post Ad

भाषिक पत्रकारांनी संघटीत होऊन लढण्याची खरी गरज : रविंद्र सिन्हा

भाषीक पत्रकारितेची नाळ ही जमिनीशी जोडलेली आहे. भाषीक पत्रकारांना त्यांची ओळख आहे. त्यांची तुलना इंग्रजीशी होऊ शकत नाही. इंग्रजीपेक्षा सर्व भाषिक वाचकांचा ग्राफ हा वाढत आहे. त्यामुळे भाषिक पत्रकारिता टिकविण्यासाठी सर्व भाषिक पत्रकारांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य तथा ‘हिंदुस्थान समाचार’ वृत्तसंस्थेचे माजी चेअरमन श्री. रविंद्र सिन्हा यांनी मंगळवारी केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतातील भाषिक पत्रकारिता : वर्तमान आणि भविष्य’ या विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी रवींद्र सिन्हा, ज्येष्ठ पत्रकार राममोहन पाठक व भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना रविंद्र सिन्हा म्हणाले की, पत्रकारिता व्यवसाय हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नाही तर त्याच्याबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. भाषिक पत्रकारितेची ताकद ही मोठी असून, तिची क्षमता ओळखण्याची आज गरज आहे. भाषिक पत्रकारितेची नाळ ही जमिनीशी जोडलेली असल्याने तिची ओळख भाषिक पत्रकारांना आहे. त्यामुळे तिची तुलना इंग्रजीशी होऊ शकत नाही. इंग्रजी पत्रकारितेविषयी बोलताना ते म्हणाले की, इंग्रजी वाचकांची संख्या ही प्रत्येक वर्षी कमी कमी होत आहे. सध्या ती पाच टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आली आहे. मात्र प्रत्येक भाषिक वाचकांचा ग्राफ हा वाढतच आहे. मराठीचा ग्राफ हा सहा टक्क्यांवरून १० टक्क्यांवर पोहचला आहे. इंग्रजीपेक्षा तिप्पटीने हा ग्राफ वाढला आहे. तमीळ, बंगला, कन्नड, तेलगू आदी सर्व भाषांचा यात समावेश आहे. तर हिंदी भाषेचा ग्राफ हा १२ टक्क्यांवर पोहचला आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.
ऊर्दूचा वाचकवर्ग हा मर्यादीत आहे. कोणत्याही ठिकाणचा ऊर्दू वाचक हा ऊर्दू वृत्तपत्राबरोबरच आणखी एक भाषिक वृत्तपत्र घेत असतो. महाराष्ट्रात ऊर्दू वाचक हा एक तरी मराठी वृत्तपत्र नक्कीच वाचतो, हे एका सर्व्हेतून स्पष्ट झाल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. ९७ टक्के महसूल हा इंग्रजी वृत्तपत्राला जात असतो. तर ३ टक्के भाषिक वृत्तपत्रांना मिळतो. त्यामुळे यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर सर्व भाषिक वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी एकजूट करून संघटीत व्हावे लागेल असे सिन्हा यांनी सांगितले. डिजिटल मिडीया विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, वृत्तपत्राची एक विश्वासार्हता आहे. त्यामुळे वृत्तपत्राकडे वाचकांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. वृत्तपत्रांचे वितरण वाढविण्याचे मोठं कठीण काम आहे. त्यामुळे प्रिंट मिडीया बरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्म फायदेशीर ठरू शकतो असेही ते म्हणाले.

यावेळी सिन्हा यांनी स्वातंत्र्यानंतर मालकधार्जिणे वृत्तपत्रे सुरू होत असतानाच त्याचवेळी १९४८ मध्ये कोणत्याही मालकाची भागिदारी नसणारी हिंदुस्थान समाचार एजन्सी सुरू झाल्याचे सांगत १४ ते १५ भाषात बातम्या देण्याचे काम या वृत्तसंस्थेने केल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1