Top Post Ad

पानिपत युद्ध म्हणजे पराभव पेशव्यांचा आणि कत्तल मराठयांची! -डॉ.श्रीमंत कोकाटे


 14 जानेवारी 1761 रोजी पेशव्यांचा अब्दाली कडून दारुण पराभव झाला. अब्दालीचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असताना देखील पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले, हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे. महाराष्ट्राची एक पिढी गारद झाली. पण हा दारुण पराभव का झाला, याची कारणे काय आहेत? त्याचा परामर्श घेणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून बोध घेऊन वर्तमानकाळावरती मात करून भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी इतिहास असतो.

 पेशव्याच्या सैन्याचे नेतृत्व सदाशिवभाऊ आणि विश्वास पेशवे करत होते, त्यांच्या सैन्यात मराठा (कुणबी, माळी, धनगर, कायस्थ, रामोशी मातंग, महार, आग्री इत्यादी होते. मराठा हा शब्द जातीवाचक नसून समूहवाचक आहे.) हे बहुसंख्येने होते, पेशवे हे कुटुंबकबिल्यासह बाजारबुणगे घेऊन लढाईसाठी गेले होते. सुमारे पाच सहा महिन्यांचा प्रवास करून पेशवे दिल्लीच्या उत्तरेला सुमारे शंभर किलोमीटर अंतरावरील कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत याठिकाणी स्थिरावले. 1760 च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी कुंजपुरा जिंकले, त्यानंतर लगेच चाल करणे अपेक्षित असताना देखील सुमारे दोन महिने ते रेंगाळत राहिले. सदाशिवभाऊने खूप कालहरण केला. त्याचा खूप मोठा फटका पेशव्यांना बसला.              

  जानेवारी 1760 ला यमुना नदीच्या काठावरील बुरांडी घाटावर वर्मी घाव लागल्याने दत्ताजी शिंदे खाली कोसळले. कुतूबखान जवळ गेला आणि म्हणाला " क्यू पाटील और भी लढेंगे?" तेंव्हा मृत्यशय्येवर पडलेले दत्ताजी शिंदे म्हणाले " हां, बचेंगे तो और भी लढेंगे" याला म्हणतात बाणेदारपणा! दत्ताजी शिंदे यांनी शत्रूबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. दत्ताजी शिंदे यांच्या शौर्याला, त्यागाला, स्वाभिमानाला तोड नाही "बचेंगे तो और भी लढेंगे" या दत्ताजी शिंदे यांच्या बलिदानाची किंमत पेशव्यांना करता आली नाही.

 ज्यावेळेस अब्दाली यमुनेच्या पलीकडे युद्धाचे नियोजन करत होता, त्यावेळेस पेशवे हे कुरुक्षेत्र या ठिकाणी होमहवन, यज्ञ,जपतप इत्यादी कर्मकांडात मग्न होते. अब्दालीकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती, तर पेशव्याकडे यज्ञासाठी पळी पात्र आणि पंचांग होते. पेशव्यांच्या उत्तरेकडील राजकीय धोरणामुळे राजपूत, जाट, रोहिले इत्यादी दुखावले गेले होते. त्यांना आपलंसं करण्यात अब्दाली यशस्वी झाला होता. पेशवे- अब्दाली यांची लढाई हिंदू-मुस्लीम लढाई असती, तर सुरजमल जाट हा पेशव्यांच्या मदतीला आला असता, इब्राहिम गारदी हा पेशव्यांचा तोफखाना प्रमुख होता. ती लढाई सत्ता संघर्षाची लढाई होती, धार्मिक लढाई नव्हती, हे स्पष्ट होते.

 अब्दालीच्या सैन्यात जी सुसूत्रता, गुप्तहेर यंत्रणा, रसद पुरवठा होता, तो पेशव्यांच्या सैन्यात नव्हता. पेशवे हे प्रचंड प्रमाणात भेदभाव पाळत होते. जगदाळे, घोरपडे, शिंदे, निंबाळकर, शिरोळे, भोसले, शितोळे, जाधवराव, पवार, होळकर, माने इत्यादी मराठा सरदारांना देखील पेशवे पंगतीला घेत नव्हते, तसा भेदभाव अब्दालीकडे नव्हता. मुस्लिमांमध्ये असणारे सहभोजन आणि पेशव्यांकडे असणारा भेदभाव हे देखील पेशव्यांच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण आहे. याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण इतिहास अभ्यासक त्र्यंबक शेजवलकर यांनी "पानिपत 1761" या ग्रंथात केलेले आहे.

अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तर पेशवे भविष्य, मुहूर्त पाहण्यात व्यस्त होते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात उत्तर भारतात प्रचंड थंडी असते. या थंडीची सवय पेशव्यांना नसल्यामुळे सैनिकांचे प्रचंड हाल झाले. अब्दालीचे सैन्य उत्तरेकडूनच आल्यामुळे त्यांच्याकडे थंडीपासून बचाव करणारी उबदार कपडे होती की जी पेशव्यांकडे नव्हती. पेशव्यांच्या एक लाख सैन्यापैकी सुमारे पन्नास हजार हे बाजारबुनगे होते. पेशव्यांकडे  युद्धाचे कोणतेही नियोजन नव्हते. महादजी शिंदे, मल्हारराव होळकर यांचा सल्ला पेशव्यांनी ऐकला असता तर एक लाख सैन्य वाचले असते.

 महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हे उत्तर भारतातील राजकारणाचे मोठे जानकार होते. तेथील राजकीय, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती त्यांना उत्तम प्रकारे ज्ञात होती. त्यांच्याशी पेशव्यांचा सुसंवाद नव्हता. त्यांचा सल्ला सदाशिवभाऊने ऐकला असता तर पुढील मोठा अनर्थ टळला असता. शिंदे-होळकर या महापराक्रमी, मुत्सद्दी सरदारांना पेशव्यांनी सतत डावलले. शिवाजीराजांचा समतावादी, विज्ञानवादी, प्रगल्भ दृष्टीकोन पेशव्यांकडे नसल्यामुळे पेशवे अपयशी झाले. पेशवे हे कर्मकांडांमध्ये आकंठ बुडालेले होते. महिलांचा, शेतकऱ्यांचा, सन्मान करणे, ही पेशव्यांची संस्कृती नव्हती, त्यामुळे स्वकीय सैन्य प्रचंड दुखावलेले होते.

 आहाराचा संबंध धर्माशी जोडल्यामुळे प्रचंड कर्मठपणा आलेला होता, अब्दालीच्या सैन्यात तो कर्मठपणा नव्हता. शरीराची झीज भरून काढून ऊर्जा देणारा महत्त्वाचा स्त्रोत हा प्रथिनांचा (प्रोटीन) असतो आणि उत्तम दर्जाची प्रथिने ही मांसाहारातून मिळत असतात, अब्दालीचे सैन्य हे मटन, चिकन, फिश, अंडी बिर्याणीवर ताव मारत होते, तर पेशवे हे भगर, उकडीचे मोदक, आळूचं फदफदं पसंत करत होते. शेवटी सर्व अन्न संपल्यावर पेशव्यांवर झाडांचा पाला आणि मेल्याली जनावरं खाण्याची पाळी आली. उपास, तापास, चतुर्थी इत्यादी कर्मकांडात पेशवे बुडाले. पेशव्यांनी अब्दालीबरोब्बर 1760 च्या ऑक्टोबरमध्येच लढाई करायला पाहिजे होती, ती 1761 च्या जानेवारीमध्ये पुढे गेल्यामुळे सैन्याचे प्रचंड हाल झाले. खर्च वाढला. रसद संपली.  जानेवारीमध्ये हरयाणात प्रचंड थंडी असते. तापमान 3 ते 4 डिग्री सेल्सिअसवर आलेले असते. अशा जीवघेण्या थंडीत लढाई झाल्याचा खूप मोठा फटका पेशव्यांना बसला. 

शिवाजीराजांच्या काळात हा कर्मठपणा महाराजांनी बाळगला नव्हता. शिवाजीराजांनी कधीही अंधश्रद्धा बाळगली नाही. त्यांच्या अनेक लढाया अमावस्येच्या रात्री होत्या. मुलगा पालथा जन्मला तेव्हा शिवाजी राजे म्हणाले "हा दिल्लीची पातशाही पालथी घालेल" म्हणजे शिवरायांचा शुभाशुभ या खुळचट कल्पनावर विश्वास नव्हता. पेशवे मात्र पदोपदी शुभाशुभ पाहण्यात व्यस्त होते. कर्मठपणा हे तर पेशव्यांचे खास वैशिष्टय! शिवाजीराजांनी आपल्या सैन्यात कधी भेदभाव केला नाही. पेशव्यांनी मराठा सरदारांना नेहमी तुच्छ लेखले. शिवाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचाही आदर सन्मान केला. पेशव्यांनी स्वकीय महिलावरच प्रचंड अन्याय-अत्याचार केले.

अब्दालीकडे जी शिस्त आणि नियोजन होते ते पेशव्यांकडे नव्हते. पेशव्यांच्या सैन्यांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद अब्दालीने तोडली. स्थानिकांना आपलंसं करण्यात पेशवे अपयशी ठरले, कारण उत्तर भारताच्या राजकारणात पेशव्यांची विश्वासार्हता संपलेली होती . पेशव्यांच्या मनातच पराभव झालेला होता, त्यामुळे फक्त रणात पराभव होणे बाकी राहिले होते.  14 जानेवारी 1761 रोजी प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. स्वकीय तोफेसमोर बरेचसे स्वकीय सैन्य गारद झाले. सदाशिवभाऊ आणि विश्वास पेशवे यांना युद्धाचा अनुभव नव्हता. विश्वास पेशवा ज्याला पायगुंता म्हटले जाते, तो कोसळताच सैन्य सैरभैर धावू लागले. युद्धभूमीवर  शिस्त, हिम्मत, निर्भीडपणा लागतो, तो पेशव्यांकडे नव्हता. त्यामुळे अवघ्या पाच ते सहा तासात अब्दालीने पेशव्यांचे लाखो सैन्य कापून टाकले. पेशव्यांनी  अक्षरशः लाखो सैन्य अब्दालीपुढे नेऊन बळी दिले. तिसरे पानिपत युद्ध म्हणजे पराभव पेशव्यांचा आणि कत्तल मराठयांची!

रसद, साधनं नसताना, प्रतिकूल परिस्थिती असताना आपले सैन्य थंडीत कुडकुडत लढले या त्यांच्या शौर्याला सलामच केला पाहिजे. पानिपत येथे झालेला मराठ्यांचा पराभव नसून पेशव्यांचा पराभव होता, कारण नेतृत्व आणि नियोजन पेशवे करत होते. अटकेपार झेंडा मराठयांनी लावला आणि पानिपतचे युद्ध पेशव्यांमुळे हारले, हा खरा इतिहास आहे.  जिवाच्या आकांताने पानिपत येथे सैन्य लढत होते. त्यांना रसद पाठवायची सोडून नानासाहेब पेशवे इकडे पुण्यात ऐशआराम करण्यात दंग होता. दिल्लीवरून आलेली रसद सदाशिवभाऊ यांच्या फौजेत पोचण्याऐवजी ती अब्दालीच्या फौजेला मिळत होती, इतकी पेशव्यांची ढिसाळ यंत्रणा होती. त्यांची गुप्तचर यंत्रणा कोसळली होती.

  युद्धात जखमी झालेले, वाचलेले शूरवीर कांही दक्षिणेकडे आले तर कांही उत्तरेकडे गेले. त्यांचे वंशज आजही इंदौर, ग्वाल्हेर, पानिपत, सोनिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र, कुंजपुरा, निळोखेडी (हरयाणा) येथे आहेत. ते राजकीय, कृषी, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहेत.   मराठे पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढले, तर पराभूत झाले आणि मराठे जेव्हा शिवरायांच्या नेतृत्वाखाली लढले तेव्हा विजयी होऊन इतिहास घडविला. आपण आता ठरवायला हवं नवपेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढायचं की संविधानिक लोकशाही मानणार्‍या  नेतृत्वाखाली लढायचे, ढोंगी पुरोगाम्यांसोबत जायचे की सच्चा पुरोगाम्यांसोबत राहायचे?. ढोंगी पुरोगामी हे देखील आजचे छुपे नवपेशवेच आहेत.

-डॉ.श्रीमंत कोकाटे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com