Top Post Ad

पुन्हा एकदा रिपब्लिकन जनतेचा विश्वासघात


 नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेऊन पुन्हा एकदा रिपब्लिकन जनतेचा विश्वासघात करण्यात आला असल्याचा आरोप रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे यांनी केला आहे. याबाबत आज मुंबई पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितिन मोरे तसेच  शाम वाडकर, आनंद निरभवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 महाविकास आघाडी सरकारचे विद्यमान मुख्यमंत्री सत्तेवरून पायउतार होत असताना आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या अवघ्या काही तासाच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा शासन निर्णय जाहीर करून कोळी आगरी या बहुजन मागासवर्गीय ओ.बी.सी समाजाची सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न केला व त्याचप्रमाणे औरंगाबाद विमानतळाला छत्रपती राजे संभाजी महाराज विमानतळाचा नामांतर प्रश्न धसास लावण्याचाही ठराव मंजूर केला परंतु गेली अडीच वर्ष प्रलंबित असलेल्या नाशिक विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न मात्र जाणिवपूर्वक प्रलंबित ठेवला असल्याचे स्पष्ट मत ननावरे यांनी व्यक्त केले.

९ ऑगस्ट २०२१ रोजी नाशिक मुक्कामी नाशिक विमानतळ नामांतर कृती समितीच्या मोर्चाच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याचे मागणी पत्र सादर केले असता माननीय  सदर प्रस्तावास तत्वतः मान्यता देऊन शासन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. सततचा पाठपुरावा करीत असताना कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन परिस्थितीत शासन निर्णय होऊ शकलं नाही. परंतु नवी मुंबई विमानतळ व संभाजीनगर नामांतर प्रश्न तडीस लावले व नाशिकच्या विमानतळाच्या नामांतराच्या प्रश्नाला प्रलंबित ठेवले. यामुळे खेदाने म्हणावे लागते की,  शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा निव्वळ थोतांड आहे. 

शिवसेनेचा विरोधात आक्रमक असलेल्या भिमशक्तीला नेहमीच भुलविण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने शिवशक्ती भिमशक्तीच्या एकजुटीचा प्रयोग नामदेव ढसाळ, भाई संगारे यांनी देखील केला होता. परंतु शिवसेनेने संगारे व ढसाळांना बळ देण्याचा प्रयत्न केला नाही. भायखळा चिंचपोकळी (पूर्वीचा) नागपाडा विधानसभा मतदार संघातून नामदेव ढसाळ यांना उमेदवारी जाहीर करूनही ऐन वेळी ढसाळांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर दुसराच उमेदवार उभा करून ढसाळांना अवमानित केले. रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवावे अशी आग्रही मागणी केली असता ती फेटाळून अनिल देसाई यांना राज्यसभेमध्ये पाठविण्यात आले. अखेर नाइलाजास्तव रामदास आठवलें भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले. त्यामुळे आठवले भाजपाकडे कायमचे वळाले. त्यामुळे प्रस्थापित व्यवस्था रिपब्लिकन जनतेला कायम झुलवत ठेवण्याचे काम करीत आहे. रिपब्लिकन जनतेच्या अनेक मागण्यां कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. मात्र सरकार कोणाचेही असो त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याचा आरोप तानसेन ननावरे यांनी केला. 

नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचेच नाव का ?

  • परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या (अस्पृश्यांच्या उध्दाराच्या चळवळीतील) लढ्याचे दादासाहेब गायकवाड हे प्रमुख सेनानी होते. तसेच उजवे हात म्हणून त्यांना संबोधले व ओळखले जात आहे.
  • नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावासोबत इतर कुणाही महापुरुषांच्या नावाची सुचना अथवा चर्चा नाही.
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावास सर्व सामाजिक संघटना शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या संस्था व धार्मिक संघटना कुणाचाही विरोध नाही.
  • नाशिक ओझर (मिग) विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देणे न्यायाचे व संयुक्तीक आहे.
  • एच. ए. एल. मिग विमानाचा कारखाना नाशिक ओझर येथे आणण्यास दादासाहेब गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे व त्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न आहेत.
  • सदर कारखान्यासाठी दादासाहेब गायकवाड यांची आंबेगाव शिवारातील शेतजमीन शासनाकडे वर्ग केली.
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य फार मोठे व अतुलनीय आहे.
  • संसदेच्या दोन्ही सभागृहात दादासाहेब गायकवाडांचे कार्य संस्मरणीय आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या श्रध्दांजलीपर लोकसभेतील भाषणात देश एका संसदपटूला गमावून बसला आहे अशा शब्दात दादासाहेबांचा संसदीय कार्याचा गौरव केला होता.
  • १९४७ साली भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातील अस्पृश्य समाजाचे स्थलांतर करण्याच्या अत्यंत कठीण व अवघड कामाची जबाबदारी भारत सरकारने विशेष समाजकल्याण अधिकारी या पदावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची नियुक्ती केली होती व ती अत्यंत कौशल्याने दादासाहेबांनी निभावली.
  • नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचे नाव द्यावे असा महाराष्ट्र शासनाने ठराव मंजूर करुन केंद्र सरकारकडे सुपुर्द करावा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com