Top Post Ad

नव्या राष्ट्रपतींचे अभिनंदन... लक्ष २०२४

 अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपप्रणीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली.  द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला नवीन राष्ट्रपती मिळाला.  द्रौपदी मुर्मू या ओरिसातील पहिला महिला नेत्या आहेत की, त्यांची राज्यपालपदावर नियुक्ती झाली. आता त्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. खरे तर नवे राष्ट्रपती म्हणून एनडीएकडून तीन महिलांच्या नावाचा विचार चालू होता. त्यात द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबर छत्तीसगढच्या राज्यपाल अनुसूया उइके आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या नावाचा समावेश होता. द्रौपदी मुर्मू या ओरिसामधील आदिवासी नेत्या आहेत. झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले आहे. 

ओरिसामधील रायरंगपूर मतदारसंघातून त्या विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या पहिल्या ओरिसाच्या नेत्या आहेत की, त्यांची राज्यपालपदावर नियुक्ती झाली. ओरिसात भाजप-बीजू जनता दल यांच्या युतीचे सरकार असताना त्या २००२ ते २००४ या काळात सरकारमध्ये मंत्रीही होत्या. लोकसभेतील ५४३ जागांपैकी ४७ जागा या अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव आहेत. साठहून अधिक लोकसभा मतदारसंघात आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ राज्यांत आदिवासी मतदार निर्णायक ठरू शकतात. एवढेच नव्हे तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जनमत कसे वळवता येईल या हेतूनेच एका आदिवासी महिलेला केंद्रातील सत्तेवर असलेला भाजपने देशातील सर्वोच्च पदावर बसवले आहे हे आता नव्याने सांगायची गरज नाही. अर्थात त्याचा लाभ येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निश्चितच या पक्षाला मिळू शकतो. 

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यात येत्या एक ते दीड वर्षांच्या कालावधीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिलेची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड करताना भाजपने जो चाणाक्षपणा दाखवला त्याची कोणी कल्पना करू शकले नाही. एक महिला आणि तीही आदिवासी तसेच प्रभावशाली अशी मोठी गुणवत्ता द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीमागे आहे. त्यामुळे विरोधी पक्षालाही भाजपने संभ्रमात टाकले. परिणामी द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला उघड विरोध म्हणजे एका समाजाला विरोध असे चित्र निर्माण करण्यात येणार हे निश्चित होते म्हणूनच ते धाडस कोणीही केले नाही.  मात्र आधीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अनुसूचित जातीचे होते त्यांच्या कार्यकाळात अनुसूचित जातीचा किती फायदा झाला तर आता आदीवासी राष्ट्रपती झाल्यामुळे आदीवासी जमातीचा होणार आहे अशी सोशल मिडीयावर चर्चाही सुरू झाली आहे. खरे तर स्वतंत्र भारतात राष्ट्रपती पदाची गरिमा एकाच व्यक्तीने राखली. ती म्हणजे के.आर.नारायणन् बाकीच्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे. असो राष्ट्रपती अखेर देशाची सर्वोच्च स्थानावर असलेली व्यक्ती आहे तीचा आदर करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. 

मात्र आज मिडीयामध्ये राष्ट्रपती पेक्षा आदीवासी या शब्दालाच जास्त महत्त्व देण्यात येत आहे. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल पदावर होत्या. त्या आता राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. परंतु मुर्मू यांचा वारंवार आदिवासी महिला असाच उल्लेख सर्व पक्ष आणि माध्यमे करीत असून त्यातून प्रस्थापित राजकीय पक्ष आदिवासी समूहाला भागीदारी देण्याऐवजी उपकार करीत असल्याचेच दाखवत आहे.  शिवाय द्रौपदी मूर्मू यांनी सुद्धा आदिवासी समाजहिताचा आजपर्यंत एकतरी ठोस निर्णय घेतलेला आहे किंवा त्याबाबत निर्णायक भूमिका घेतली आहे का हाही मोठा गहन प्रश्न आहे.  नाममात्र दलित, आदिवासी, मुस्लीम आमदार, खासदार, मंत्री किंवा राष्ट्रपती यामुळे भारतीय लोकशाहीचा देखावा निर्माण केला जातो, पण भारतीय समाजामध्ये रचनात्मक बदल आजपर्यंत तरी घडलेला दिसत नाही आणि भविष्यात घडेल असेही दिसत नाही. कारण नाममात्र प्रतिनिधित्वाने प्रस्थापित वर्ग व राजकीय पक्ष उपेक्षित समाज घटकांना राजकीय वेठीस धरून या समाजाची फसवणूक करीत आहे. अनसूचित जाती-जमातीसाठी घटनात्मक राजकीय आरक्षणामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मागील ७५ वर्षांत या समाजाचे आमदार, खासदार, मंत्री झाले. एससी प्रवर्गातून राष्ट्रपती झाले आणि आता एसटी प्रवर्गातून एक महिला राष्ट्रपतीपदी विराजमान झाली आहे. नाममात्र प्रतिनिधित्वाने आजपर्यंत ज्या-ज्या समाजातून अशी निवड करण्यात आली. त्या उपेक्षित समाजातील सामान्य माणसाच्या जीवनात शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन किती बदल घडवून आणला हे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत विचारण्याची वेळ आली आहे.  २०१७ मध्ये भाजप प्रणित मोदी सरकारने राष्ट्रपतीपदी एस.सी.मधून रामनाथ कोविंद यांना बसवले तर आता एस.टी.प्रवर्गातून द्रौपदी मुर्मू यांना उमदेवारी यामागचे राजकारण आता नवीन राहिले नाही.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासात फक्त एक अपवाद वगळता दरवेळी सत्ताधारी पक्षाचा किंवा सताधारी आघाडीचाच उमेदवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकला असल्याचे दिसून आले आहे. गेल्या ७० वर्षात विरोधी आघाडीच्या उमेदवाराला कधीच यश मिळालेले नाही. फक्त एकदाच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला चुरशीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या पक्षाविरुद्ध जाऊन त्यावेळचे स्वतंत्र उमेदवार व्ही व्ही गिरी यांना जिंकून देण्याचे अपील कॉंग्रेसच्या खासदार आमदारांना केले होते आणि त्यावेळी १९६९ मध्ये कॉंग्रेसने राष्टपती पदाचे उमेदवार म्हणून नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. पण त्यावेळी इंदिरा गांधी यांना सिंडीकेट कॉंग्रेसला धडा शिकवायाचा होता म्हणून त्यांनी ट्रेड युनियनचे नेते आणि स्वतंत्र उमेदवार व्ही व्ही गिरी यांना मते देण्याचे आवाहन आपल्या खासदार आमदारांना केले होते आणि त्यात व्ही व्ही गिरी विजयी झाले होते. ही लढत चुरशीची झाली होती पण त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक बहुतेक वेळा एकतर्फीच झाली आहे. १९५२ मध्ये सर्वप्रथम कॉंग्रेसचे डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपती निवडणुकीत होते तेव्हा त्यांच्याविषयी विरोधी पक्षात इतका आदर होता कि प्रसाद यांच्याविरोधात उमेदवार दिला गेला नाही पण डाव्या आघाडीने निवडणूक बिनविरोध नको म्हणून के टी शाह यांना उमेदवारी दिली होती. १९५७ मध्ये डॉ. राजेन्द्रप्रसाद पुन्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या विरोधात काही अपक्ष उमेदवार होते. १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यावर नीलम संजीव रेड्डी यांची राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड झाली.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओरिसातील मयूरभंज जिल्ह्यात झाला. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक शिक्षिका म्हणून केली. १९९७ मध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. तसेच एकदा त्या मंत्रीही होत्या. दि. ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ या काळात त्या वाणिज्य व परिवहन राज्यमंत्री होत्या. नंतर २००२ ते १६ मे २००४ या काळात मस्यपालन व पशुसंवर्धन विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. सन २००७ मध्ये ओरिसामधील सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून त्यांना नीलकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

२२ जूनला त्या ओरिसातील मयुरभंज जिल्ह्यातील माहूलडिहा गावी त्यांच्या घरी होत्या. घरी त्यांची मुलगी इतिश्री बरोबर होती. इतिश्री सांगते – सायंकाळी घरी फोन आला, तो फोन द्रौपदी यांच्या आईने घेतला. फोनवरील बोलणे ऐकून आई एकदम शांत झाली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. काही काळ ती बोलू शकली नाही. ती केवळ धन्यवाद एवढेच त्यांना म्हणाली. तो फोन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा होता. तो निरोप मिळाल्यावर द्रौपदी म्हणाल्या, माझ्यासाठी, आदिवासी आणि महिलांसाठी हा क्षण ऐतिहासिक होता. झोपडीपासून ते देशाच्या सर्वोच्च पदाचे दावेदार म्हणूनच हा प्रवास लक्षणीय व अद्भुत आहे. एका मुलाखतीत द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे, त्या संथाल या आदिवासी समाजातून आल्या आहेत. त्यांचा परिवार खूप गरीब होता. घर चालविण्यासाठी एक छोटी नोकरी करावी एवढीच त्यांची इच्छा होती. त्यांना नोकरी मिळालीही. पण सासरच्या लोकांनी सांगितल्यावरून त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी मुलांना विनामूल्य शिकवायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या समाजसेवेला सुरुवात झाली. 

१९९७ मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीची त्यांनी निवडणूक लढवली. नगर परिषद जिंकली व त्या नगरसेविका झाल्या. सन २००० मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली व जिंकली. आमदार व मंत्री झाल्या. दरम्यान त्यांच्या एका मुलाचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला व त्यातून त्यांना नैराश्य आले. २०१३ मध्ये दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. पाठोपाठ कुटुंबात दु:खाचे डोंगर कोसळत असताना त्याही खचून गेल्या होत्या. पण काही काळाने त्यांनी पुन्हा समाजसेवेत स्वत:ला गुंतवून घेतले. आणि आज त्या भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या.


नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतानाचा फोटो फेसबूक ,ट्विटर वर टाकून आपले लोक त्याचं
अभिनंदन
करत आहेत. असे प्रकार मी सुद्धा काही वर्षापूर्वी करत होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा विरोधामध्ये असलेले लोक सुद्धा अभिवादन करता. पण याचा अर्थ असा नाही की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला म्हणतील . द्रौपदी मुर्मू बीजेपी आणि RSS यांच्या कुशीमध्ये वाढलेली आहे. या अगोदरचे राष्ट्रपती सुद्धा रामनाथ गोविंद हे RSS या संघटनेचे कार्यकर्ते होते. रामनाथ गोविंद ला काशीच्या हिंदूमंदिरांमध्ये सुद्धा येऊ दिला नव्हत. परंतु त्यावर त्यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही. असे लाचार लोक बीजेपी वाले देशाचे राष्ट्रपती बनवत आहेत. वरून सांगत आहेत. आम्ही या समाजाला न्याय देण्याचे काम करत आहोत. लोकशाहीचा गळा चिरून बीजेपी वाले कोणत्याही थराला जात आहेत. या राष्ट्रपती फक्त बीजेपी जे सांगतील तेच करणार. पण कधी सरकारला खडे बोल सुनावणार नाही त . त्यांचा फक्त रबरी स्टॅम्प होणार.
- स्वप्निल कदम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com