Top Post Ad

कोरेगाव भीमा- पुस्तके मिळणार नाहीत सभा व प्रबोधन होणार नाही- शासकीय फतवा

 महाविकास आघाडीचे पेशवाईत रूपांतर होते आहे.  महाराष्ट्रातील करोडो बहुजन समाजाला  महाविकास आघाडी कडून अनेक अपेक्षा होत्या. दंगलीला कारणीभूत असणाऱ्या भिडेवर गुन्हा दाखल करणे दूरच राहिले. त्यामुळे मागील सरकारची विचार धारा झटक्याची आहे तर या सरकारची विचारधारा पाणी पाजून हलाल करण्याची आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात औरंगजेबाचे राज्य यायला पाहीजे होते , पेशवाई कशी आली ? या विषयाची जशी विरोधी पक्षाच्या छातीत जळजळ व्हायची तशीच आघाडीलाही आहे हे कालच्या कोरेगाव- भीमा कार्यक्रमावर घातलेल्या बंदीने दिसून येत आहे. या बंदीच्या निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार नाही असे वाटले होते परंतु ती सुद्धा...?


लोकांना अजून माहिती नाही की तुम्ही या कार्यक्रमावर लिखित बंदी घातली आहे...तुमची किंवा तुमच्या प्रशासनाची हिम्मत नाही बंदीचा जाहीर उच्चार करण्याची...कारण तुमच्या असंविधानिक बंदीला लोक फाट्यावर मारून 1 जानेवारीला येणार हे तुम्हाला माहीत आहे. फक्त प्रबोधन होऊ द्यायचे नाही... जागृती होऊ द्यायची नाही... प्रबोधन व जागृतीने महाविकास आघाडीच्या व खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आसपास वावरणाऱ्या ,प्रशासनात असणाऱ्या पेशव्यांच्या वंशजांच्या जीवाची घालमेल होते.मग ते लोक तुमच्या कानात मंतर मारतात , तुमचा मेंदू बधीर होतो आणि तुम्ही संविधानाच्या विरोधात निर्णय घेता...

शासनकर्ते कितीही डरकाळ्या फोडत असले ,  अनुसूचित जाती जमाती , ओबीसीं , अल्पसंख्याक समुदायाच्या कार्यकर्ते व नेत्यांना तुम्ही कितीही घाबरवत असले तरी पेशव्यांच्या वंशजांच्या समोर आतल्या खोलीत यांना मुजरेच करावे लागतात. आणि म्हणूनच 1 जानेवारीच्या अभिवादन कार्यक्रमावर बंदी घातली गेली   पुण्याच्या जिल्हाधिकारी 29 डिसेंबर 2022 च्या बंदी आदेशातील सुचनांची आंबेडकरी समाज चिरफाड करतो... 

 दिनांक 1 जानेवारी 2022 चा कार्यक्रम ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने लोकांनी एकत्र न येता आयोजित करायचा आहे...अशी सूचना क्रमांक 1 आहे, मग लोकांनी एकत्रित न येता अभिवादन कसे करायचे असते...? सूचना क्रमांक 4 असेही म्हणते की पेरणे येथे न येता जयस्तंभास घरी राहूनच अभिवादन करावे...तसेच सूचना क्रमांक 6 मध्ये भयंकर सूचना दिल्या आहेत....

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ व पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येऊ नयेत तसेच कोणत्याही प्रकारची सभा , धरणे , निदर्शने , आंदोलने व मोर्चे काढू नयेत. खाद्यपदार्थ मिळणार नाहीत , पुस्तके मिळणार नाहीत सभा व प्रबोधन होणार नाही म्हणजे तेथे काय होणार...?

भिडे एकबोटेच्या समर्थकांनी 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा परिसरात बंद पुकारून अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांना अन्न व पाणी मिळू दिले नव्हते...आघाडी सरकारच्या वतीने त्यांचाच अजेंडा राबविला जात आहे. अन्न पाणी मिळू नये म्हणून जो डाव खेळण्यात येत आहे तो सरकारच्या वतीने पाळण्यात येणारी अस्पृश्यता आहे. पुस्तकांचे स्टॉल लागणार नाहीत , सभा करू दिली जाणार नाही म्हणजे संविधानाने मूलभूत अधिकारात दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बलात्कार करण्यात येत आहे. 

भिडे - एकबोटेच्या चेल्या चपाट्यांचे म्हणणे होते की महारांनी 1818 ला मराठा साम्राज्य बुडवले ,  तसा तेथील स्थानिक मराठयांच्यात खोटा प्रचार करून तरुणांची माथी भडकवली व दंगल घडवून आणली.

जर मराठयांचे साम्राज्य महारांनी संपवले असेल तर मराठा माळवदकर/जामदार हे लोक महारांच्या बाजूने लढून मराठा साम्राज्याच्या विरोधात गद्दारी करत होते काय ?

वास्तविक पाहता महार , मातंग , मराठा , धनगर , माळी , रामोशी , मुस्लिम इत्यादी नागवंशी बहुजन समाजातील जातींनी एकत्र येऊन इंग्रजांच्या बाजूने लढून...ज्या पेशव्यांनी औरंगजेबाबरोबर गुप्त समझोता करून छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली , ज्या पेशव्यांनी अस्पृश्यता आणली त्या निर्दयी पेशव्यांचा सुपडा साफ केला. आम्ही - फुले - शाहू आंबेडकरी चळवळीतील लोक हेच तेथे जाऊन सांगत असतो...

बर... ओमीक्रॉन , कोरोना कोरेगाव भीमा येथे येतो मग परवा जेजुरीला साडेतीन लाख लोक आले होते तेथे कोरोना नव्हता ? रेल्वे , बस , शाळा , मॉल सुरु आहेत , लाखों लोकांचा संपर्क तेथे होत आहे मग तेथे कोरोना नाही का ? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कामशेत येथे 1 जानेवारी 2022 ला राष्ट्रवादी काँग्रेस प्रायोजित भव्य बैलगाडा शर्यत आहे , लाखो लोक तेथे येणार आहेत मग तेथे कोरोना नाही का ? तेथे खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी घातली आहे का ? तेथे सभेवर बंदी घातली आहे का ? तेथे लोकांनी घरीच बसून फक्त शर्यतीसाठी बैलांना पाठवावे असा आदेश काढला आहे का ?

आगामी नगरपालिका , महानगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीत आंबेडकरी चळवळीतील लोक तुम्हाला जाब विचारतील... आम्ही ही लोकांना आज विचारत आहोत की सरकारने आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या विरोधात घातलेल्या बंदी विरोधात आपण काय भूमिका घ्यायची ? ही बंदी झुगारून आपणाला लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी यावे लागेल तसेच हा बंदीचा आदेश गावागावात , चौकाचौकात जाळवा लागेल...!

सप्रेम जयभीम - जय शिवराय - जयमूलनिवासी.


बहुजन क्रांती मोर्चा,  पवई मुंबई

कुमार काळे  , ऍड. राहूल मखरे , बाळासाहेब पाटील , अनिल माने  , श्रीकांत ओहोळ , सचीन बनसोडे.

बुद्धभूषण प्रल्हाद मोरे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com