Top Post Ad

आदिवासींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी शासन सर्वतोपरी सकारात्मक

   मुंबई -  संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसेभेने 1994 मध्ये ठराव संमत करून आदिवासी समुदायाचे हक्क आणि अधिकार अबाधित राहावेत यासाठी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जाईल असे घोषीत केले आहे. यानुसार विधानभवन येथे जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधान भवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासहनाधिष्ठीत पुतळ्यास तसेच आद्यक्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. 

या प्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.  माजी खासदार हुसेन दलवाई, विधानसभा सदस्य  धर्मरावबाबा आत्राम, विधानपरिषद सदस्य .विक्रम काळे, विधानपरिषदेच्या माजी सदस्या श्रीमती. हुस्नबानु खलिफे, आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.  यावेळी आदिवासी बांधवांच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.  क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिकृती भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, देश निर्माणासाठी आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग असून, त्यांनी स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीसाठी स्वावलंबी होणे गरजेचे आहे. त्यांच्या सर्वतोपरी प्रगतीसाठी केंद्र व राज्यशासन प्रयत्नशील आहेत. विकासापासून दूर राहिलेल्या समाज घटकांना आधुनिक शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून, त्या समाजाची संस्कृती आणि परंपरा जपणेही गरजेचे आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सकारात्मक आहे.

विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, देशातील पहिला आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्यात सुरू झाला. आदिवासींचे हक्क आणि अधिकार यांचे संरक्षण करण्यास शासन कटिबद्ध आहे. आदिवासी बांधवांच्या  विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. विविध विभागांचे धोरण, कार्यक्रम आणि योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ, रोजगार व स्वयं रोजगारच्या माध्यमातून सक्षम बनविले जात आहे. पेसा कायद्यानुसार गौण वन उपज गोळा करणे त्याच्यावर प्रक्रिया करणे व विक्री करण्याचा अधिकार प्राप्त आहे. याचबरोबर निसर्ग पर्यटनच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच आदिवासी भागात राज्य योजनेतून आणि जिल्हा योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास, वृक्ष व फळबाग लागवड याबाबतही कार्यवाही करण्यात येत असल्याचे उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

आदिवासी समाज कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. आदिवासी समाजाच्या आधुनिक शिक्षणावर अधिक भर देणे गरजेचे आहे. आदिवासी विकासासाठी दिले जाणारे अनुदान ९.३५ टक्के प्रमाणेच द्यावे याचबरोबर वनपट्ट्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना देण्यात यावा असेही  झिरवाळ यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, आदिवासी बांधवांचे योगदान समजुन घेणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रित येऊन आदिवासी बांधवांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आदिवासी दिन साजरा करणे गरजेचे आहे. दरवर्षी याप्रमाणे आदिवासी दिन साजरा करण्यासाठीचे प्रयत्न व्हावेत असेही त्या म्हणाल्या, नवीन समाज निर्माण होण्यासाठी परिवर्तन आणणे गरजेचे असल्याचेही उपसभापती डॉ. गो-हे यांनी यावेळी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com