शहापूर तालुक्यातील मौजे आसनगाव येथे राहणारी तसेच सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी वर्षा गजानन वालकोळी या शहापूर तालुक्याच्या कन्येची आसाम रायफल रेजिमेंटसाठी निवड झाली असून ही शहापूर तालुक्याची पहिली महिला रायफल रेजिमेंट मध्ये जाणार आहे. शाररिक चाचणी आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी वर्षाला एक महिना आसाम मध्ये राहावं लागणार आहे. परंतु दोन महिन्यांपूर्वी कोरोना काळात तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे तिची आर्थिक परिस्थती हालाकीची झाली आहे. वर्षाची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. त्यामुळे पुढील नियोजन कसे करावे हा मोठा प्रश्न तिच्या समोर होता
परंतु कुमारी वर्षाचे सैन्यात जाण्याची जिद्द पाहून रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेतर्फे कुमारी वर्षाचा स्वातंत्र्य दिनी रविवारी सत्कार करून तिला आर्थिक मदत करण्यात आली तसेच भारतीय सैन्य दलात भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतची सर्व जबाबदारी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी स्वीकारली आहे. या प्रसंगी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी कुमारी वर्षा वालकोळी तसेच रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांचे कौतुक केले व पुढील देशसेवेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी सिने कलाकार सुमेध जाधव, सत्यकाम पवार, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश घुमरे, कार्याध्यक्ष सुरेंद्र साळवी, सचिव प्रदीप पितळे आदी उपस्थित होते
"कोरोना काळात वडीलांचा मृत्यू झाला आर्थिक परिस्थिती नसतांना मला सैन्यात जाण्यासाठी ताईंनी मदत केली. नक्कीच ताईंची मदत वाया जाऊ देणार नाही."- ( कुमारी वर्षा गजानन वालकोळी, रा.आसनगाव)
"वर्षाला आर्थिक मदत केली, ती नगण्य असून वर्षा ज्यादिवशी आर्मीतून तिच्या वर्दीवर येणार त्या दिवशी माझा रुबाब जास्त असणार, माझी एक कन्या देशासाठी काम करणार त्याचा अभिमान मला असणार."-( ज्योती भगवान गायकवाड, संस्थापक अध्यक्षा, रमाबाई ब्रिगेड महिला संघटना)
0 टिप्पण्या