Top Post Ad

जनसंघर्षाचा पक्षपाती तत्त्वज्ञ

 मानवाधिकार कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत  आनंद तेलतुंबडे हे देशद्रोहाच्या आरोपाखाली गेले दीड वर्ष तुरुंगात आहेत. आज डॉ. आनंद तेलतुंबडे  सरांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने तेलतुंबडे कोण आहेत? त्यांना तुरुंगात का टाकले आहे? याबद्दल चर्चा करणारा लेख !


डॉ. आनंद तेलतुंबडे : जनसंघर्षाचा पक्षपाती तत्त्वज्ञ

 डॉ.आनंद तेलतुंबडे देशद्रोहाच्या आरोपाखाली गेले दीड वर्ष तुरुंगात आहेत. दरम्यानच्या काळात आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेचा अनेकांनी निषेध केला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, लेखक, विचारवंतांपासून ते आंतरराष्ट्रीय विचारवंतांपर्यंत निषेधाचा सूर उमटला. संयुक्त राष्ट्र संघातही हा निषेधाचा सूर उमटला आहे .त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपाबाबत त्यांना अटक करण्यापूर्वीच अनेकांना शंका होती. गेले वर्षभर तुरुंगात असताना त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चिकित्सा झाली आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावे म्हणून न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे कशी त्यांच्या संगणकात प्लान्ट केली गेली आहेत, याबाबतचा 'आर्सेनिक'चा रिपोर्ट जगभरातल्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध  झाला आहे. तरीही न्यायालय त्यांना अजून जामीन द्यायला तयार नाही. आणि हे सर्व लोकशाही आणि न्यायिक प्रक्रियेचे नाव घेऊन सुरू आहे!

या दरम्यान आनंदला अटक करण्याचा, त्याच्याभोवती खोट्या आरोपांचा फास आवळण्याचा प्रयत्न का होतो आहे ? यावर मी बराच विचार करत होतो. आनंदवरील कारवाईसंदर्भात विचार करत असताना मला अनेक गोष्टी,घटना तुकड्या–तुकड्यांत आठवतात.त्या इथं सांगणं महत्त्वाचं आहेच.त्याआधी आनंदवरच्या कारवाईची काही मुळं भूतकाळात गाडलेली दिसतात,त्याबद्दल सांगतो.

आनंद तेलतुंबडे माओवादी आहेत,ते आंबेडकरवादी असण्याचा आव आणून नक्षलसमर्थक म्हणूनच काम करतात,असा एक अपप्रचार केला जातो आहे. मीडियातून,सोशल मीडियातून हा अपप्रचार आता दिसत असला,तरी भाजपच्या आयटी सेलआधीच चार वर्षांपूर्वी  आर.एस.एसचं मुखपत्र असलेल्या ‘पान्चजन्य’मधून करण्यात आला आहे. पान्चजन्यच्या एप्रिल २०१५ च्या अंकात रमेश पतंगे यांनी एक लेख लिहिला आहे.  पतंगे हे हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी या अंकात ‘मायावी आंबेडकरभक्त’ नावाचा एक लेख लिहिला आहे. या लेखात ते आनंद तेलतुंबडे, अरुंधती रॉय आणि गेल ऑम्वेट या तिघांना मायावी आंबेडकरभक्त म्हणतात.

जातीनिर्मूलन आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष याबाबत आनंदनं जी मतं मांडली आहेत,त्या मतांबद्दल पतंगेंनी (अर्थात आरएसएसने) त्यांच्या सोयीचा,त्यांना उमगणारा जो अर्थ लावला आहे,त्यातून आनंदविषयी भाष्य करतात, ते आनंदविषयी म्हणतात,   “डॉ.आनंद तेलतुंबडे इस प्रकार की उत्तेजक भाषा का प्रयोग क्यों करते है? उनको दलितों से मार खाने का भय नहीं है क्योंकी वे खुद दलित है. दलितेतर विद्वान इनकी बातो को उठा नहीं सकता क्योंकी वो मार खाएगा. इनके पीछे जो उद्देश्य छिपा हुआ है, उसे समझना पडेगा.” (पान्चजन्य’मधील लेख)

आनंद तेलतुंबडे यांना दलितांपासून मार खाण्याचं भय नाही,असं पतंगे म्हणतात.त्यांना काय अपेक्षित आहे यातून? दलितेतर विद्वान इनकी बातों को उठा नहीं सकता क्योंकी वो मार खाएगा. यातून पतंगेंना काय सुचवायचं आहे?

आनंद तेलतुंबडेंना मारण्याचा विचार ज्यांच्या डोक्यात येऊ शकतो, ते कोण लोक आहेत आणि ते का तेलतुंबडेंना मारण्याचा विचार करतील? या ठिकाणी सबंध लेखात आनंद तेलतुंबडेंबद्दल दलित- बहुजनांच्या मनात किंतु-परंतु,पूर्वग्रह निर्माण होतील, किंबहुना व्हावेत, यासाठीच पतंगेंनी सबंध लेखात त्यांच्याबद्दल वस्तुस्थितीची मोडतोड करून त्यांना ‘मायावी’ ठरवलं आहे. ज्या दलित-बहुजनांच्या उत्थानासाठी आनंद काम करतो, संघर्ष करतो, वैचारिक योगदान देतो, त्यांच्यातच वाद, एकमेकांबद्दल अढी, पूर्वग्रह निर्माण करण्याचा हा कुटील डाव आहे. 

या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात पतंगे काय लिहितात पाहा,“इस लेख में मैंने अत्यंत संक्षेप में मायावी आंबेडकरभक्तों की सोच के कुछ उदाहरण रखने का प्रयास किया है. मायावी आंबेडकरभक्त अनेक कारणों से खतरनाक होते है.पहला कारण ऐसा की,उनका सार्वजनिक चेहरा दलित,शोषित के उत्थान का होता है और असली चेहरा हिंदू समाज में आग का बवंडर खडा करनेवाला होता है.गत कुछ सालों से देशभर में लिंगायत, मराठा, रैदासी आदी अनेक समाजों में इस प्रकार के आंदोलन चल रहे है की हम हिंदू नहीं है, हमारी अलग पहचान है.लिंगायत अलग धर्म है,मराठों का शिवधर्म है, चर्मकारों का रैदासी धर्म है, इसकी जड में जो अनेक लोग है, उनमें गेल ऑम्वेट का नाम अग्र पंक्ति में आता है. इसी कारण इन मायावी लोगों के जाल को ध्वस्त करना राष्ट्रीय कर्तव्य़ बनता है. हमारे इतिहास, पुराणों में रामायण, महाभारत में ऐसे मायावी भक्तों के कई उदाहरण आते है और उनसे कैसे निपटना चाहिए,वह कथा यह भी बताती है. यह बौद्धिक लडाई है.उसे ध्यान मे रखकर हमे भी बौद्धिक योद्धा बनकर जंग के मैदान में उतरना चाहिए.”  

या परिच्छेदात पतंगेंनी मायावी शब्द वापरला आहे. पुराणांमध्ये आपल्याला मायावी हा शब्द राक्षसांसाठी वापरलेला दिसतो. इसी कारण इन मायावी लोगो के जाल को ध्वस्त करना राष्ट्रीय कर्तव्य़ बनता है.हमारे इतिहास,पुराणो मे रामायण,महाभारत मे ऐसे मायावी भक्तो के कई उदाहरण आते है और उनसे कैसे निपटना चाहिए,वह कथा यह भी बताती है. या वाक्यातून पतंगेंना काय सुचवायचं आहे ?पुराणांमध्ये मायावी राक्षसांचा कशा प्रकारे नि:पात केलेेला आहे.   तशा प्रकारे तेलतुंबडेंना ध्वस्त करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?पुढे ते चतुराईनं,यह बौद्धिक लडाई है, उसे ध्यान में रखकर हमे भी बौद्धिक योद्धा बनकर जंग के मैदान में उतरना चाहिए.” असं म्हणतात. म्हणजे तेलतुंबडे हे शत्रू आहेत.  मायावी आंबेडकरभक्त आहेत आणि त्यांना आपण ध्वस्त केलं पाहिजे.ही जंग म्हणजेच युद्ध आहे,असं पतंगे सुचवतात.

वैचारिक योगदान देणे, अभ्यासपूर्ण लेखन करणे, विचारसरणींची चिकित्सा करणे,अध्यापन करणे या आनंदच्या कृती त्याला मायावी ठरवण्याइतक्या वाईट आहेत? हे आपलं (पतंगे आणि त्यांचे समविचारी) आनंद तेलतुंडबे आणि त्याच्यासारख्या विचारवंतांशी चाललेलं युद्ध आहे,असं पतंगेंना का वाटतं ?भारतीय लोकशाही राज्यात आनंदच्या विचारमांडणीवर टीका करणं,त्याचा प्रतिवाद करणं यापासून पतंगेंना किंवा आणखी कुणाला कुणी रोखलं आहे का ? नसता २०१५मध्ये हा लेख लिहिल्यानंतर मागील चार वर्षांत आनंदच्या मांडणीचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद किती आणि कोणत्या उजव्या विचारसरणीच्या अभ्यासक-विचारवंतांनी किंवा रमेश पतंगे यांनी केला ? केवळ उजव्या - हिंदुत्ववादी विचारवंतांनी आनंदच्या मांडणीची मोडतोड करण्याचा प्रयत्न केलेला नाही,तर तो स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या काही तथाकथित लेखक - विचारवंतांनीही केला आहे.

आनंद तेलतुंबडेच्या मांडणीची अशी मोडतोड का केली जाते,हे समजून घेण्यासाठी त्यानं काय लिहून ठेवलं आहे, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. डॉ. आंबेडकर : प्रतीक, वास्तव व नवा अन्वयार्थ, Anti - Imperialism and Annihiliation of Caste, Hindu and Dalit : Perspective for understanding communal practice, Khairlanji, Ambedkar on Muslims

आर्थिक सुधार आणि दलित, जागतिकीकरण आणि कष्टकरी दलित बहुजन इत्यादी महत्त्वाच्या ग्रंथलेखनातून आणि हजारो परिषदांतील भाषणांतून त्यानं दलित अत्याचाराचा आणि जातिअंताचा प्रश्न मुख्य प्रवाहात चर्चेत आणला.याशिवाय महत्त्वाची मांडणी म्हणजे दलितांचं शोषण केवळ जातीय शोषण नाही तर ते वर्गीय शोषणही आहे. राखीव जागांच्या संदर्भात,आरक्षणाच्या संदर्भात व्यापक अर्थानं त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचंही अवलोकन केलं पाहिजे.  या त्याच्या मांडणीमुळे आरक्षणाच्या लाभाने दलितांमध्ये जो एक नवमध्यमवर्ग उदयाला आला आहे, त्या वर्गाच्या मानसिकतेमुळे नवउदारमतवादी, साम्राज्यवादी विचार- धोरणांना कशा प्रकारे अधिष्ठान लाभतं आणि मूळ शोषणप्रक्रियेच्या आकलनात बाधा येतात या विचारांकडे पुढे सरकता येतं.  तर बाबासाहेबांचे आर्थिक विचार यामध्ये त्यानं जातीचं वास्तव आणि त्याचा 'राज्य', अर्थनीती,वैश्विक भांडवलशाही,या घटकांचा संबंध दलितांच्या शोषणामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.दलितशोषण हे फक्त सामाजिक नाही तर राजकीयसुद्धा कशाप्रकारे आहे, हे त्याच्या लेखनातून दिसते. बाबासाहेबांचा मूळ उद्देश हाच होता.

आनंद तेलतुंबडे च्या मूलभूत मांडणीमुळे नवीन अभ्यासकांना,कार्यकर्त्यांना या संबंध अकादमिक आणि बिगरअकादमिक समाजशास्त्रीय मांडणीसाठी एक तात्त्विक चौैकट, सायंटिफिक फ्रेमवर्क मिळतं आणि हेच हिंदुत्ववाद्यांना नको आहे.  हिंदुत्ववाद्यांना आनंदच्या मांडणीचं - डिस्कोर्सचं इतकं भय का वाटतं? याचा विचार केला असता लक्षात येतं की आनंद हिंदुत्ववाद्यांच्या हिंदूराष्ट्राच्या अजेंड्याला उद्ध्वस्त करणारे बाबासाहेब सांगतो. आनंद तेलतुंबडे काय पण ज्यांचा उल्लेख पतंगे मायावी म्हणून करतात,त्या अरुंधती रॉय आणि गेल ऑम्वेटदेखील हिंदूराष्ट्राच्या अजेंड्याला उद्ध्वस्त करणारे बाबासाहेब सांगतात,हे हिंदुत्ववाद्यांचं खरं दुखणं आहे. 'प्रपोगंडा ऑफ हिंदुत्व' या आनंदच्या पुस्तकात त्याने हिंदुत्व, हिंदुत्ववाद्यांच्या हिंदूराष्ट्र संकल्पनेची सखोल चिरफाड केली आहे.

आनंद तेलतुंबडे, बाबासाहेब समजून घेताना व त्याबद्दलची मांडणी करताना अस्मितावादी मांडणी करत नाही.आरएसएसला बाबासाहेबांचं अप्रोप्रिएशन करताना दलितांना उत्सवप्रिय मानसिकतेतच गुंतवून टाकायचं आहे. या अजेंड्याला आनंदची मांडणी छेद देते. दलित केवळ अस्मितावादी राजकारणात गुंतून पडले तर त्यांच्यापुढल्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल आणि हेच उजव्या विचारंवंतांना हिंदुत्ववाद्यांना हवं आहे. भीमा-कोरेगावच्या २०० व्या शौर्यदिनानिमित्त आनंदने ‘द वायर’मधे जो लेख लिहिला होता आणि त्या लेखाचंही ज्या प्रकारे हिंदुत्ववाद्यांनी अप्रोप्रिएशन केलं, त्यातून हेच दिसून येतं.

एकंदरीत दलित-बहुजन समाजातून जेव्हा एखादा विचारंवत पुढे येतो,तो सातत्याने समाजबदलाचे गतिनियम सांगण्याची भाषा करतो,आपल्या समूहाला प्रतीकांना अवास्तव महत्त्व देण्यातून बाहेर काढतो,तो समग्र समूहाच्या उत्थानाची बात करतो, तेव्हा प्रतिगाम्यांच्या उतरंडीयुक्त समाजाच्या चिरकालीन स्वप्नांना तडा जातो. ब्राह्मणी,भांडवली व्यवस्थांच्या धुरीणांना, नियंत्रकांना शोषित समाज स्वत:च्या मुक्ततेकडे प्रवास करू लागलाय, याचं भय वाटतं.आपल्या हातातल्या सर्व प्रकारच्या शोषणाभिमुख साधनांना गाडलं जाईल की काय, आणि त्यासाठीच हे विचारवंत अशा तत्त्वज्ञानाची पायाभरणी करतायत, याचं भय वाटतं आणि या तत्त्वज्ञानाला संपवण्यासाठी असे विचारवंत कोंडण्याचे प्रयत्न होतात. ही परंपरा कोपर्निकस ते गॅलिलिओपासून तुकारामापर्यंत चालत आलीय.

आनंद तेलतुंबडे आणि आता अटक केलेले इतर मानवाधिकार कार्यकर्ते, कवी यांच्या बाबतीत नेमकं बोलायचं झालं तर विचारवंतांना मायावी वगैरे ठरवणं,अर्बन नक्षलवादाच्या थियरी निर्माण करून तसा अपप्रचार करणं, या बाबी आता २०१८-१९ मध्ये अचानक उगवून आलेल्या नाहीत. २००६ मध्ये खैरलांजी घडलं तेव्हाही त्याविरोधात झालेल्या आंदोलनांमध्ये नक्षलवाद्यांचा हात आहे,असा अपप्रचार केला गेला होताच. २००९ मध्ये आरएसएसच्या विवेक अग्निहोत्रीनं अर्बन नक्षलवादावर दिल्लीत एक सेमिनार घेतला होता. इतकंच नाही तर काही महिन्यांपुर्वी सुधा भारद्वाज, वरवरा राव यांना अटक होण्यापूर्वीही अग्निहोत्रीनं ट्विटरवर एक अपील केलं होतं, त्यात तो म्हणाला होता, “तुमच्या पाहण्यातल्या, अकादमिक वर्तुळातल्या अर्बन नक्षल्सची नावं सुचवा. अर्बन नक्षल्सची एक यादी तयार करायची आहे,हे काम करण्यासाठी तुमच्यापैकी पुढाकार घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी मेसेज करा.” गंमत म्हणजे या ट्विटला रिप्लाय करताना अनेकांनी ज्येष्ठ वकील असलेल्या इंदिरा जयसिंग, प्रशांत भूषण ते प्रकाश करात आदींची नावं अर्बन नक्षल म्हणून सुचवली होती.आता अग्निहोत्रीला अशी यादी का तयार करायची आहे?अशी यादी तयार करून तो काय करणार आहे? त्याच्यावर गृहखात्याची जबाबदारी आहे का ? हे प्रश्न आपल्याला विचारावेच लागतील.

राष्ट्र, lराज्य,विकास याच्या हिंदुत्ववाद्यांच्या संकल्पनांशी जो जोडून घेत नाही व याउलट त्यातल्या विसंगती दाखवतो,तो अर्बन नक्षल ठरवला जातो. या पार्श्वभूमीवर एका बाजूला स्वत:ला आंबेडकरी विचारांचे पाईक म्हणवून घेणाऱ्यांनी आताही आनंद तेलतुंबडे हे कसे एलिट विचारवंत आहेत व त्यांचा जनचळवळींशी संबंध नसल्यानं त्यांच्या समर्थनार्थ आपण आपली ऊर्जा का खर्च करावी,असा प्रश्न उपस्थित केला.त्यांच्यासाठी मी माझ्या आनंदशी असलेल्या वैयक्तिक संबंधातल्या एखाददोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो.

बीडमध्ये सोना खोट्टा या गावात सवर्णांनी एका दलिताची हत्या केली होती. ही गोष्ट समजल्यानंतर आनंद तेलतुंबडेनी त्या गावातल्या दलित कुटुंबांना भेटण्यासाठी आले होते.त्या वेळी त्या गावात जाण्यासाठी चांगला रस्ता,वाहनाची सोय नव्हती. आनंद तेलतुंबडे वडवणी ते सोन्ना खोटा असं जवळपास पंधरा किलोमीटर चालून त्या गावातल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले,तेवढंच पंधरा किलोमीटर अंतर पुन्हा वडवणीपर्यंत चालत आले.त्या वेळी तो पेट्रोनेट इंडियाचा मॅनेजिंग डायरेक्टर होते.देशातल्या महत्त्वाच्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ असलेले, जगातल्या महत्त्वाच्या विचारवंतांपैकी एक असलेले, एका पीडित दलित कुटुंबाच्या भेटीसाठी ३० किलोमीटर पायी चालताना मी पहिल्यांदा बघितला.

आनंद तेलतुंबडे सोबत आपण का उभं राहिलं पाहिजे?याची काही महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे आनंद तेलतुंबडे पुरोगामी चळवळींची एक मोठी अॅसेट आहे.ते मुक्तीदायी चळवळींचा पक्षपाती तत्त्वज्ञ आहे. त्याचा पक्षपातीपणा वंचिंतांच्या दु:खाशी - शोषणाशी नातं सांगणारा आहे. आनंद तेलतुंबडेनी कधीही भूमिका घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवलेलं नाही. त्याचं वैचारिक योगदान निश्चितपणे पुरोगामी चळवळीला दिशा देणारं आहे.

त्याची ज्ञाननिर्मितीशी असलेली कमिटमेंट वादातीत आहे. सद्य परिस्थितीतल्या प्रश्नांना कसं सामोरं जावं, याची व्हिजन त्याच्याकडे आहे.aमागील १५वर्षांतील लेखनाने एक नवा दृष्टिकोन आनंदने दिला आहे. समताधारित समाजनिर्मितीच्या लढ्यातील सर्व प्रवाहांतील कार्यकर्त्यांना तो मार्गदर्शक ठरला आहे.यामुळेच विषमतेच्या पाठिराख्यांना आनंद तेल तुंबडे जेलमध्ये हवा आहे. असं असतानाही त्यांचावरील कारवाई,आरोप यातला घटनाक्रम पाहिला तर त्यातला फोलपणा लक्षात येतो. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन एक वर्ष झालं,तरी वर्षभरात एकदाही त्याला साधं चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं नाही. वर्षभरात पोलिसांनी असा काय तपास केला,की त्याच्या विरोधातले काही सकृद्दर्शनी पुरावे सरकार बंद लिफाफ्यातून न्यायालयात देतं? सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांचं संरक्षण दिलेलं असतानाही पुणे पोलीस त्या आधीच त्यांना अटक करतात! यावरून सरकारला तेलतुंबडे या मुक्तीदायी चळवळींच्या पक्षपाती तत्त्वज्ञाला आपल्याला गजाआड जाऊ देण्याचा मॅकार्थीझम इरा नको असेल तर सर्वच पुरोगाम्यांनी आनंद तेलटुंबडे यांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे.

पुरोगामित्व ही केवळ मिरवण्याची गोष्ट नसून तर वेळ पडली तर आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून रस्त्यावर येण्याची, भूमिका घेण्याची गोष्ट आहे, अन् ती वेळ कधीच आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. केवळ सभा, संमेलनं, व्याखानं, निषेधाच्या सभा यापुरतं पुरोगामित्व मर्यादित राहिलं तर अर्बन नक्षलवाद ते मॅकार्थीझम हे आव्हान मोडून काढणं अवघड आहे. प्रश्न केवळ आनंद तेलतुंबडेचा नाही तर तो काही बोलू पाहणाऱ्या,प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाचा आहे. मानवाधिकारांची भाषा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे.प्रश्न समग्र शोषित वंचित समूहाच्या उत्थानाकडे होणाऱ्या वाटचालीचा,त्यासाठी आवश्यक त्या संघर्षाचा, ज्ञाननिर्मितीचा, तत्त्वज्ञानाच्या निर्मितीचा आहे.  एका बाजूला चळवळीचं भांडवल वापरून बडेजाव करणारे लोक आपल्याकडं भरपूर आहेत, पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांमुळे ही चळवळ उभी राहिली आणि टिकली त्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना समाजाने सुनियोजितपणे जरी नसलं तरी सोयीस्करपणे बाजूला केले आहे!

चळवळीमुळे निर्माण झालेल्या सांस्कृतिक-राजकीय भांडवलाचा उपयोग करून व त्याचं 'मार्केट' इथल्या सधन नोकरदार दलित मध्यमवर्गाने पुढाकार घेऊन बनवले.भावनात्मक आव्हाने करून आपली नवी सांस्कृतिक मिरासदारी रुजवण्याचा प्रयत्न झाला. पण दुसऱ्या बाजूला चळवळ उभी करणाऱ्या आणि टिकवणाऱ्या मनुष्यबळाची आबाळ केली.आताच तेलतुंबडे यांचे महत्त्व लोकांना कळणार नाही. कदाचित येत्या दहा - वीस वर्षांत आपल्याला याचे विनाशकारी परिणाम कळतील,जेव्हा आपण फॅसिझमच्या चिखलात पूर्ण रुतून गेलेलो असू. आंबेडकरी चळवळ जेव्हा राजकारण बाजूला सारून सांस्कृतिक प्रतीकांवरच अधिक लक्ष देते तेव्हाच ती त्या अस्मितेच्या आणि भांडवलशाहीच्या सापळ्यात अडकून जाते. मग बुद्धमय भारत, मूलनिवासी सिद्धांत, दलित अभ्यास (Dalit Studies) आणि साहित्य याचे उदात्तीकरण सुरू होते. 'मार्केट' एव्हाना तयार झालेलेच असते. मग इथल्या कार्यकर्त्यांचे मूल्यही ठरवले जाते व त्यांची या मार्केटमधली उपयुक्तता बघून त्यांची लायकी ठरवली जाते.मात्र त्या कार्यकर्त्यांमध्ये तेलतुंबडेसारखे लोक वेगळे पडून जातात,कारण ते या 'मार्केट'साठी कधीच नसतात. त्यांना एकतर गौरवीकरण किंवा बहिष्कार या तराजूमध्येच अडकवले गेलेले असते!

श्याम निलंगेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com