
पावसाने आपली दमदार हजेरी लावत आज ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे ठाणे महापालिकेच्या नालेसफाईचं पितळ उघडं पडले असून आज शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल ४७ ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे रहिवासी आणि व्यापारी वर्गाचं नुकसान झालं. ठाण्यात राम मारूती रस्ता, गजानन महाराज मठ, वंदना सिनेमा, तीन पेट्रोल पंप, लोकमान्यनगर, वृंदावन, घाऊक बाजारपेठ, दादोजी कोंडदेव स्टेडियम, विटावा पूल अशा नेहमी प्रत्येक वर्षी पाणी साचणाऱ्या भागांमध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं.

ठाण्यात पहाटेपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाची सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासात ६७ मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे. हवामान खात्यानं कालच जोरदार पावसाचा इशारा दिला होता. काही ठिकाणी चाळींमध्ये असलेल्या घरांमध्येही पाणी गेल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. अनेक ठिकाणी संरक्षक भिंत तसंच झाडे पडून वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. ठाण्यात पूर्व द्रूतगती मार्गावर सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. सकाळच्या म्हणजे ११.३० ते १२.३० या वेळात ६१ मिलीमीटर तर दुपारी साडेतीन पर्यंत एकूण ११६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर आत्तापर्यंत ४५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्यावर्षी आजपर्यंत ९० मिलीमीटर पाऊस झाला होता. या पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकातही पाणी साचलं होतं. यामुळं काही काळ रेल्वे सेवाही ठप्प झाली होती.
0 टिप्पण्या