पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या काळात पुलाखाली तुडूंब पाणी भरुन वाहत असल्याने तब्बल ४२ गावांचा संपर्कच तुटत आहे. मागील चार दिवस या भागात पावसाची संततधार राहिल्याने यावर्षी देखील वासिंदच्या ४२ गावांवर संपर्कविहिन होण्याची वेळ आली आहे. या गावांवर दरपावसाळ्यात संपर्कविहिन होण्याची वेळ येते. ही समस्या सुटावी म्हणून खासदर कपिल पाटील यांच्या पुढाकाराने वासिंदच्या पूर्व - पश्चिम भागांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते बांधकाम मंत्रालयाने एकूण २५२ मिटर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ३१.५० कोटी रुपये मंजूर करुन बांधकाम सुरु केले. परंतू हे काम यंदाच्या पावसाळ्यातही रखडल्याने अखेर वासिंदच्या ४२ गावांची संपर्कविहिनता काही संपूष्टात येऊ शकलेली नाही. सध्याच्या पाणीवाहक लहान पुलाखालून इतरवेळी दुचाकी आणि चारचाकी
लहान वाहने प्रवास करीत असतात. संपर्कविहिनतेच्या समस्येचा सामना करणाऱ्या ४२ गावांपैकी शहापूर तालुक्यातील भातसई, शेई, शेरे, अंबर्जे, मढ, हाल, बावघर, मासवणे, आंबिवली तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील वेहळे, काकडपाडा, पळसोळी, गेरसे, कोसले, फळेगांव, उशिद, रुंदे आणि इतर गावपाड्यांचा यात समावेश आहे. केंद्र शासनाने रेल्वे मार्गावरील उड्डाणपुल मंजूर केले ; परंतू ते याहीवर्षीच्या पावसाळ्या आधी पूर्ण होऊ न शकल्याने वासिंदच्या ४२ गावांना अद्यापी रहदारीच्या त्याच नागरी समस्येत अडकून पडावे लागले आहे. परिणामी वासिंदकरांना अतिवृष्टीमुळे दरवर्षीच्या संपर्कविहिनतेची पुनरावृत्ती याहीवर्षी पहायला मिळाली.
केंद्र शासनाने वासिंदच्या पूर्व - पश्चिम भागाला जोडणाऱ्या २५२ मिटर इतक्या अंतराच्या उड्डाणपुलासाठी प्रत्यक्षात ३१.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी २२ कोटी रुपयांचा निधी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निश्चित करण्यात आला आहे. पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरु करण्यात आले आहे. हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असल्याने वासिंदच्या ४२ गावांची समस्या सध्याच्या पावसाळ्यात देखील कायम राहीली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत हा पुल पूर्णत्वास येण्याचे निर्धारीत करण्यात आले होते.
0 टिप्पण्या