नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे ते पनवेल अशी मानवी साखळी तयार केली जाणार आहे. तसेच सिडकोने केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी आणि ‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त 24 जून रोजी हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सिडको भवनाला घेराव घालतील, असा निर्णय लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने घेतला आहे, याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली. मात्र हे आंदोलन होण्यापूर्वीच शिवसेना आक्रमक झाली असून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता विमानतळाच्या नामकरणावरुन प्रकल्पग्रस्त विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली. या विरोधात आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यापर्यंत भूमिपूत्रांचा आवाज पोहचवण्याकरिता १० जूनला मानवी साखळी केली जाणार आहे.
विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी मागील काही वर्षांपासून आग्रही असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत. त्यांच्या वतीने तब्बल १०० किलोमीटरची ही मानवी साखळी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून केली जाणार आहे. उरणपासून सुरू होणारी साखळी जसाई येथे दि. बा पाटील यांच्या कतारपर्यंत असणार आहे . पनवेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणारी ही साखळी कोपरा खारघरपर्यंत असणार आहे . मुंबई, पालघर, वसई, कल्याण, डोंबिवली भागातही मानवी साखळी करण्यात येणार आहे. ठाणे शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जेल, पोलिस लाइन, कळवा पूल, शिवाजी चौक, विटावा अशी मानवी साखळी करणार आहेत.
नामांतर आंदोलनाचा हा पहिला टप्पा असेल त्यानंतर २४ जून रोजी सिडकोला घेराव आणि त्यानंतर मुंबईत मंत्रालयाला घेराव अशा पद्धतीने भूमीपुत्रांनी आंदोलनाची आखणी केली आहे. या वेळी राज्य कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य आमदार रमेश पाटील, नवी मुंबई पालिका क्षेत्र समन्वय समितीचे समन्वयक मनोहर पाटील, डॉ राजेश पाटील, दशरथ भगत, दिपक पाटील, निलेश पाटील, साईनाथबुवा पाटील, शैलेश घाग, सुनील पाटील, मनोज मेहेर, जयेंद्र सुतार, ठाकूर भोईर,अविनाश सुतार, पंढरीनाथ पाटील, प्रभाकर ठाकूर, सुरेश वास्कर उपस्थित होते
१० जूनला सकाळी १० वाजता शांततेत मानवी साखळी आंदोलन सुरु होणार आहे.
वैलापूर ते दिघा अंतर २१.५ किलोमीटर
एकूण २९ गावे व १२ पाडे आंदोलनात होणार सहभागी .
प्रत्येक गावासाठी ८०० मीटरची मर्यादा
२१ टप्पे, व ठिकाणे निशचित.
प्रत्येक गावासाठी समन्वयकांची नियुक्ती
मराठी, हिंदी व इंग्रजीत जनजागृतीपर साहित्य वाटण्यात येणार .
प्रत्येक आंदोलकाकडून व गावाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
आंदोलन संपल्यावर परिसर स्वच्छ करण्यात येणार .
पारंपरिक वेशभूपेसह आंदोलनात सहभाग . देखावाही उभारला जाणार .
दरम्यान या प्रकल्पाकरिता ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्यांना अद्यापही नुकसान भरपाई अथवा पर्यायी जमिनी देण्यात आलेल्या नाहीत. किंवा त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रश्न अद्यापही सिडको प्रशासनाने सोडवला नाही. या करिता कोणताही पक्ष आंदोलन करीत नाही. कोणताही लोकप्रतिनिधी याबाबत काहीही बोलत नाही. मात्र केवळ नामांतराच्या प्रश्नावरून स्थानिक लोकांमध्ये दुही माजवण्याचे काम पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी करीत आहेत. असा आरोप येथील स्थानिक प्रकल्पग्रस्थांनी केला आहे. इतकेच नव्हे तर सदर विमानतळ निर्माण होण्यापूर्वीच त्याचा ७० हून अधिक टक्के मालकी हक्क अदानी समूहाकडे देण्यात आलेला आहे. याबाबतही कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नाही. सर्व खाजगीकरण करण्याचा डाव प्रस्थापित शासन व्यवस्था करत असून येथील स्थानिकांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही याबाबत लवकरच सिडकोवर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
0 टिप्पण्या