मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकीय वाद पेटला आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरण कमालीचे तापले असून रात्री उशिरा राज्यात मोठी घडामोड घडली आहे, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे, असे मलिक यांनी म्हटले. त्यानंतर भाजप नेत्यांनी मलिक आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर मलिक यांनी आक्रमक होत गुजरातमधील सर्व कंपन्यांचा माल जप्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई सुरू झाली.
दमनच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे भाजपाचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी तातडीने मुंबई पोलीस उपाआयुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेत जाब विचारला. या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली नव्हती तर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, असे उपाआयुक्तांनी सांगितल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे ब्रुक फार्मा कंपनीत दमनला गेले होते. महाराष्ट्राला रेमडेसीवीर द्या अशी विनंती केली होती. यावर कंपनीने सांगितलेले की, आम्हाला परवानगी दिली तरं आम्ही आमच्याकडील साठा महाराष्ट्राला देण्यास तयार आहोत. यानुसार केंद्राला आम्ही विनंती केली की परवानगी द्यावी लागेल. यावर त्यांच्याशी टायअप करून देतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या लायसनवर परवानगी मिळेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आहे. असे असताना ग्रुप फार्मा कंपनीकडे सुमारे २० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याचे समजते. हा साठा महाराष्ट्रात विकण्यासाठी राज्य सरकारने या कंपनीला तातडीने परवानगी दिली आहे. तरीही इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत असे चित्र आहे. अशात गुजरात सरकारने इतर राज्यात रेमडेसिवीर निर्यात करण्यावर बंदी घातली. त्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा राजकीय वाद भडकला होता. प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी काही दिवसांपूर्वी ग्रुप फार्मा या कंपनीला भेट दिली होती. ही कंपनी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होती. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि लाड यांनी ही इंजेक्शन आपण महाराष्ट्र सरकारला देऊ, असे जाहीरही केले होते. या विषयी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत काही बैठकाही झाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व्यवस्थित सुरू होईल अशी शक्यता व्यक्त होऊ लागली होती.
0 टिप्पण्या