मुंबई :
जागतिक महामारी दिवसेंदिवस वाढतच असून राज्यात दुसर्या टप्प्यातील कोरोना रुग्णांची संख्येतही वाढ होत आहे. परिणामी रुग्णालये अपूरी पडू लागली आहेत. यावर पर्याय म्हणून रेल्वे मंडळाने देशात साडेपाचशेहून अधिक, तर राज्यात १७६ आयसोलेशन कोच उपलब्ध असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर करता येईल. गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशानमधून दरवाजा, प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचे रूपांतर बाथरूममध्ये करण्याची संरचना तयार केली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मध्य रेल्वेकडून ४८२ आयसोलेशन कक्ष तयार केले होते. मात्र राज्य सरकारकडून आयसोलेशन कक्षाची मागणी न केल्याने कोच पडून होते. दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाला श्रमिक रेल्वे, इतर मेल, एक्स्प्रेससाठी कोच कमी पडू लागले. त्यामुळे रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार श्रमिक विशेष गाड्या वाढविण्यासाठी आयसोलेशन कोचचे रूपांतर पुन्हा नियमित प्रवासी डब्यात केले.त्यामुळे आता मध्य रेल्वेकडे केवळ ४८ कोच उपलब्ध असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
पश्चिम रेल्वेचा विचार केल्यास सद्य:स्थितीत पश्चिम रेल्वेकडे मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कोच आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर विभागात ४८ आयसोलेडान कोच आहेत. मुंबई विभागात १२८ आयसोलेडान कक्ष तयार आहेत. एका डब्यात २४ खाटा आहेत. राज्य सरकारने आयसोलेशन कक्षाची मागणी केल्यास त्यांना ते वापरण्यासाठी देण्यात येतील. असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल म्हणाले.
0 टिप्पण्या