मुंबई
मुंबईसह ठाणे, पुणे आदी शहरांमध्ये विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील म्हाडासाठी राखीव असलेली 20 % घरे अनेक ठिकाणी वर्ग करण्यात आलेली नाहीत. ही घरे तत्काळ म्हाडाकडे वर्ग करावित ; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येतील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. झोपडपट्टी पुनःर्वसन योजनेत बाधीत झालेल्यांना आपले घर ताबा मिळाल्यानंतर दहा वर्षे विकता येत नव्हते. मागील सरकारने ही मुदत पाच वर्षांवर आणली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला 5 ते 10 वर्ष लागतात. त्यामुळे झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
डाॅ. आव्हाड म्हणाले की, एसआरएमधील विकलेल्या घरांप्रकरणी नोटीस पाठवल्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमली आहे. त्यात नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब, अस्लम शेख आहेत . बिल्डिंग बांधल्यानंतर ५ वर्षात घर विकता येत नाही. त्याऐवजी त्यांची झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी विकता येणार असा नियम बनवायला पाहिजे. तसा विचार आम्ही करतोय, समिती त्याबाबत चर्चा करून लवकर निर्णय घेण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहे. बुधवार पार्क इथे 32 एकर झोपडपट्टी आहे. 16 एकरमध्ये 300 चौरस फूटाचे घर झोपडपट्टीवासीयांना दिलेआणि इतर जागेवर म्हाडा घरे बांधेल आणि विकेल. त्यातून म्हाडाला उत्पन्न मिळेल . अशा ठिकाणी एसआरए आणि म्हाडा संयुक्तपणे एकत्र घर बांधतील. त्यातून लँड बँक तर निर्माण होईलच, शिवाय निधीची उभारणी करणेदेखील शक्य होणार आहे, असं ते म्हणाले. या घरांमध्ये दहा टक्के पोलीस, दहा टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
,बीडीडी चाळीच्या पुनर्विकास शुभारंभ या महिन्यात होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन वरळीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे. तीन ते चार वर्षात बीडीडी चाळ उभी राहणार असल्याचं ते म्हणाले.
0 टिप्पण्या