नवी दिल्ली:
पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशाला संबोधित केल्यानंतर संपूर्ण देशात लसीकरण सुरू झालं आहे. करोनावर लस दिल्यानंतर सुमारे ४४७ जणांना साइड इफेक्ट झाल्याचं नोंदवले गेले आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.. पण यापैकी फक्त तिघांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं. रविवार असल्याने केवळ सहा राज्यांनी करोना व्हायरस लसीकरण मोहीम हाती घेतली आणि ५५३ केंद्रांमध्ये एकूण १७,०७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
महाराष्ट्रातही या मोहिमेला सर्व जिल्ह्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला पण बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व सिल्लोड येथे लस घेतलेल्या एकूण ३१ जणांना ताप, थंडी, चक्कर येणे, डोकेदुखीच्या तक्रारी करण्यात आल्या. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीडमध्ये पहिल्याच दिवशी सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशील्ड लस दिली गेली. दरम्यान, लसीकरणानंतरच्या २४ तासांत बीड जिल्हा रुग्णालयात १५, गेवराई तालुक्यातील एक आणि आष्टी तालुक्यातील दोन आरोग्य कर्मचारी अशा एकूण १८ आरोग्य कर्मचाऱ्यांना किरकोळ स्वरूपाचा त्रास जाणवला. त्यांना मध्यरात्रीनंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले होते. आशा स्वयंसेविका, परिचारिका आणि एका तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा यात समावेश आहे. हलकासा ताप, थंडी, चक्कर येणे आणि डोकेदुखीच्या तक्रारी आहेत. सर्व तक्रारी किरकोळ स्वरूपाच्या असून कुणी गंभीर नाही असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
आैरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात सिल्लोडमध्ये चार जणांना त्रास झाला. त्यामध्ये खाज येणे थंडीताप आणि उलटी असा त्रास झाला. मात्र त्यामध्ये कोणालाही भरती करण्याची गरज पडली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे. वैजापूर शहरात लस घेतलेल्या ९ आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात तीन पुरुष व सहा महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मळमळ, ताप, उलटी यामुळे बेजार झालेल्या रुग्णांवर डॉ. रिजवान सय्यद यांनी प्राथमिक उपचार केले. वैजापूरचे उपजिल्हा रुग्णालयमार्फत शनिवारी मौलाना आझाद विद्यालयात राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. लसीकरणानंतर जिल्ह्यात काही जणांना त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी ही लस घ्यावी, त्यानंतर मी घेईन, असा पवित्रा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली होती. कोरोनाची लस आपण घेणार आहात का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आधी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतर मी लस घेईल’ तसेच औरंगाबादच्या नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता ”नामकरणावरून सुरू असलेल्या या वादाबाबत औरंगाबादेतील जनतेचे मतदान घ्यावे. त्यानंतर निर्णय घ्यावा” असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या