मुंबई:
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह पुढील संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती अर्णब गोस्वामी याने एका अर्जाद्वारे केली आहे तसेच अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय ) वर्ग करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती दुसऱ्या अर्जाद्वारे केली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब व अन्य दोन जणांवर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ आणि ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास वर्ग करावा, अशी अर्णब गोस्वामी याने कोर्टाला विनंती केली आहे.
अलिबाग येथील प्रसिद्ध वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी व अन्य दोन जणांना रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. या कारवाईवरून बरंच वादळ उठलं होतं. अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने या तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, अर्णब गोस्वामी कोठडीत मोबाइल वापरत असल्याचे आढळल्याने तातडीने त्याची रवानगी अलिबाग येथून तळोजा कारागृहात करण्यात आली होती. दुसरीकडे त्याची जामिनासाठी धडपड सुरू होती.
अलिबाग कोर्टात तातडीने सुनावणीस नकार मिळाल्याने त्याने लगेचच मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तिथेही जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर थेट सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. तिथे सुनावणी होऊन जामीन मंजूर झाला आणि त्याचदिवशी तळोजा कारागृहातून अर्णब आणि त्याच्या साथीदारांना मुक्तही करण्यात आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याने ३ नोव्हेंबर रोजी दोन महत्त्वाचे अर्ज मुंबई हायकोर्टात सादर केले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने हा खटला सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा अशी विनंती त्याने कोर्टाला केली आहे.
0 टिप्पण्या