दादोजी कोंडदेव स्टेडीयममधील गाळ्यांवर स्थावर मालमत्ता विभागाची कारवाई
ठाणे
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील भाडेतत्वावरील व्यावसायिक गाळे भाडे न भरल्यामुळे आज स्थावर मालमत्ता विभागाच्यावतीने सील करून ताब्यात घेण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे. स्टेडीयम येथील व्यावसायिक गाळे भाडे तत्वावर देण्यात आले आहेत. या गाळ्यांचे भाडे मोठ्या प्रमाणात थकले असुन महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने त्याबाबत वेळोवेळी नोटीस देवून देखील भाडे देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज सर्व गाळे सील करून ताब्यात घेण्यात आले आहेत.
यामध्ये मधुकर मुळूक यांची रु .६ , ९ ४,५७७, मधुकर मुळूक रु .८,१०,७७ ९, प्रमोद इंगळे रु .४,३७,३ ९ ३, मनोहर इंगळे रु .३ , ९ ७,१५४, प्रकाश दळवी रु ३,८ ९ , ४६८, हरियाली पुनव सिंघवी रु .१,८७,३७१, तर कुणाल बागुल यांची रु .५,२१,४६१ इतकी थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांचे गाळे आज सील करण्यात आले आहेत. स्थावर मालमत्ता विभागाच्या उपायुक्त श्रीम.अश्विनी वाघमळे, कार्यालयीन अधिक्षक महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जीतेश सोलंकी, प्रविण वीर, तुषार जाधव,भुषण कोळी यांनी पोलिस बंदोबस्तात केली. सदरचे गाळे महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असुन उर्वरीत गाळ्यांची मुदत संपली आहे. ते सर्व गाळे ताब्यात घेऊन शासन निर्देशनुसार ई- निविदा पद्धतीने देण्यात येणार आहेत.
कोव्हिडं १९ काळात शासकीय निर्देशानुसार भाडे तत्वावरील व्यापारी गाळे व घरे संबंधीत मालकांना रिकामे करून घेण्यास मनाई असतानाही स्थावर मालमत्ता विभागाच्या उपायुक्त श्रीमती अश्विनी वाघमळे, कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर व इतर यांनी शासन निर्णयांची पायमल्ली करून कायद्याची भीती न बाळगता व भाडे भरण्यासाठी वेळ द्यावा या सहानुभूतीपूर्वक केलेल्या विनंती अर्जाचा विचारही न करता प्रचंड पोलिस बंदोबस्तात सदरचे गाळे सील करून ताब्यात घेतले. या कारवाई बाबत पत्रकार संघटनेचे प्रमोद इंगळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सध्या संपूर्ण जग अत्यंत गंभीर परिस्थितीतून जात असताना पत्रकारिता करणाऱ्यांची आर्थिक ओढाताण विचारात न घेता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला धक्का बसला याची जाणीव संबंधितांना नाही का? असा सवालही इंगळे यांनी उपस्थित केला आहे.
कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांच्या कामकाज पद्धती विषयी अनेक तक्रारी असून त्यांच्याकडे असलेली पदविका प्रकरण काही पत्रकारांनी उचलून धरले असून याची विविध वर्तमानपत्रांनी दखल घेतली होती. याचाच राग आहेर यांच्या मनात असल्यामुळे सूडबुद्धीने पत्रकारांच्या व्यावसायिक गाळ्यांवर भाडे थकीत असल्याचे कारण देऊन कोव्हिडं-१९ च्या काळात अत्यंत घाईघाईने ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. पत्रकाराचे शिष्टमंडळ ठाणे पालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांची भेट घेणार असून याप्रकरणी दाद मागणार असून प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असे प्रमोद इंगळे यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या