Top Post Ad

धोकादायक इमारतीत दरवर्षी हजाराने वाढ, पालिका प्रशासनाची मात्र तकलादू कारवाई

धोकादायक इमारतीत दरवर्षी हजाराने वाढ, पालिका प्रशासनाची मात्र तकलादू कारवाई



ठाणे
पावसाळा आला की ठाणे महानगर पालिकेत धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. मग तकलादू कारवाईला सुरुवात होते. मात्र पावसाळा गेल्यानंतर याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला जात नाही. सात वर्षापूर्वी ठाण्यात महापालिकेच्या सर्वेक्षणात १ हजार ७५ इमारती धोकादायक होत्या. त्यात यावर्षी पाच पट भर पडली आहे. यंदा पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरात ४ हजार ५१ इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यंदा ठाण्यात इमारत दुर्घटना घडलेली नाही. परंतु पालिका प्रशासन याची वाट बघत असल्याचा आरोप ठाणेकर करत आहेत.


दरवर्षी धोकादायक इमारतींची संख्या हजाराने वाढत आहे. यामधून आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्यास असलेल्यांची  सुटका केव्हा होणार ? क्लस्टर योजना कार्यान्वित करण्यासाठी राजकीय मंडळींसह पालिका प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली होती. त्यानुसार मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पहिल्या क्लस्टरचा नारळही वाढविण्यात आला होता. परंतु त्यानंतर एकाही क्लस्टरची वीट अद्यापही रचली गेलेली नाही. एकूणच महापालिका आणखी किती काळ धोकादायक इमारतींची यादी जाहीर करणार, त्या इमारतींमधील रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन करणार त्यांना हक्काचे घर मिळणार का?  असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.


गेल्या काही वर्षाचा अनुभव पहाता, डोंगर परिसरात असलेल्या झोपड्या तसेच धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती राहणा-या नागरिकांना जीव मुठीत घेवून रहावे लागत आहे पावसाळ्यात दरड कोसळणे जमीन खचणे असे प्रकार वेळोवेळी घडत असतात यात ब-याचदा जिवितहानी होण्याचे प्रकारही घडले आहेत. कळवा मुंब्रा दरम्यानचा पारसिक डोंगराचा पूर्वेकडचा भाग मुंब्रा रेल्वेस्टेशन जवळच्या परिसरात बेकायदा इमारतींनी कळस गाठला आहे. कळवा, विटावा, खारेगाव आणि पारसिकनगर या पश्चिमेकडील भागा सह कळवा पूर्वेला न्यू शिवाजी नगर, आनंद नगर, गणपती पाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोणेश्वर नगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबा नगर या सर्वच परिसरात बेकायदा झोपडपट्ट्या आणि अनाधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात आहेत.


दुसरीकडे ठाणे शहरातील वागळे इस्टेट, इंदिरा नगर रूपादेवी पाडा लोकमान्य नगर, राम नगर या ठिकाणच्या डोंगरावर बेकायदा झोपड्याच नव्हे तर किसन नगर, लोकमान्यनगर, यशोधन नगर, सावरकर नगर या परिसरात अनधिकृत आणि धोकादायक इमारतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षात अशा परिसरात लहान मोठ्या ब-याच दुर्घटना घडल्या आहेत. आठ वर्षापूर्वी मुंब्रा परिसरात घरावर संरक्षक भिंत कोसळून सात जण ठार झाले होते. तर लकी कंपाऊंड इमारत कोसळून अनेकांचे बळी गेले होते. तसेच ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगर येथे चार घरांवर भिंत कोसळल्यामुळे आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. गेल्या पाच वर्षात ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती कोसळून शेकडो बळी गेले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com