हा तर वाजपेयी यांचा अवमान....- सचिन सावंत
मुंबई
भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये गोळवलकर असतात आणि भाजपाची भुमिका दांभिकपणाची व दुटप्पी असते यात कोणतीही शंका नाही. देशातील संविधानावर यांचा विश्वास नाही परंतु आपल्या पक्षाच्या घटनेवरती देखील यांचा विश्वास नाही. पक्षाच्या घटनेतील सेक्युलॅरिझम हा शब्द त्यांनी काढून टाकला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. महाराष्ट्र भाजपाचे नेते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या नादात आपल्या वरिष्ठ नेत्यांनाही जुमानेसे झाले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, असे म्हणत महाराष्ट्रातील मदरसे बंद करा म्हणणाऱ्या अतुल भातखळकरांनी मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन मोदींचे ‘सब का विश्वास’ म्हणणे हे ढोंग आहे का? हा प्रश्न उपस्थित केला आहे.
अतुल भातखळकरांनी महाराष्ट्रातील मदरसे बंद करावे अशी मागणी करताना आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या भुमिका काय आहे हे तपासले असते तर बरे झाले असते. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना २० ऑगस्ट २००१ रोजी तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी पंतप्रधान वाजपेयी यांची मरदशांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याची कोणतीही इच्छा नाही हे स्पष्ट केले होते तसेच मदरशांचे आधुनिकीकरण करुन तेथील धार्मिक शिक्षणाच्या कामात हस्तक्षेप न करता विज्ञान, गणित, समाजशास्त्र व सामान्यज्ञान हे विषय तेथे शिकवले जावे हे स्पष्ट केले होते. फेब्रुवारी २००२ मध्ये जोशी यांनी जवळपास एक हजार मदरशांना केंद्र सरकार अनुदान देत आहे असेही सांगितले होते. वाजपेयी यांचाही भाजपा नेते अवमान करत आहेतच तसेच नरेंद्र मोदींच्या भूमिकेचेही तमा ते बाळगत नाहीत हे आश्चर्य आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१२ च्या निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यात मदरशांच्या आधुनिकीकरणाचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचबरोबर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जाहिरनाम्यातसुद्धा मदरशांच्या आधुनिकीकरणाचा दोनदा उल्लेख केलेला आहे. ११ जून २०१९ रोजी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मदरशांच्या आधुनिकरणासाठी पावलं उचलून तेथील शिक्षकांना अन्य संस्थांकडून हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व संगणक विषयाचे प्रशिक्षण देऊन मदरशांतील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ मिळेल याकरता योजना जाहीर केली होती. नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम युवकांकरता एका हातात कुराण व दुसऱ्या हातात संगणक हे व्हिजन असल्याचे सांगितले होते. आणि ‘सब का विश्वास’ ही घोषणा दिली होती. मोदींजीच्या कृती व कथनी यातील फरकातून ही घोषणा पूर्णपणे पोकळ आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे. तरी देखील आता भातखळकरांच्या वक्तव्यातून मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे अधोरेखीत होते.
भातखळकरांच्या भुमिकेशी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सहमत आहेत का? असल्यास मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे मान्य करावे अन्यथा भातखलकरांवर कारवाई करावी असे सावंत म्हणाले.
सत्ता गेल्यापासून भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. आपल्या भुमिकेतून आपण महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करत आहोत, मुंबई पोलिसांना बदनाम करत आहोत किंवा मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करताना, तिला झाशीची राणी संबोधित करताना, झाशीच्या राणीचा अपमान होत आहे याचीही चिंता त्यांना राहिली नाही. आता तर स्वतःच्या नेत्यांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, असे सावंत म्हणाले.
0 टिप्पण्या