आदिवासी विकास महामंडळाकडून आदिम जमातींना निकृष्ट दर्जाचे तांदूळ वाटप ;
श्रमजीवी संघटनेचे भोजन आंदोलन
शहापूर
आदिवासी विकास महामंडळाकडून आदिम जमातींना निकृष्ट दर्जाचे तांदूळ वाटप करून महामंडळाने आदिवासी कातकरी समाजाची कुचेष्टा करून त्यांना अपमानित केल्याने गुरुवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी विकास महामंडळाचा निषेध करत आदिवासी विकास महामंडळ शहापूर यांच्या कार्यालयासमोर भोजन आंदोलन करत निकृष्ठ दर्जाचे धान्य वाटप करणाऱ्या सर्व जबाबदार अधिकारी, संचालक तसेच व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करावे आशा मागणीचे लेखी निवेदन शहापूरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सदानंद राजुरे यांना दिले.
कोरोना महामारीत महाराष्ट्र शासनाने ७ एप्रिल २०२० शासन निर्णय लागू करून आदिम जमातींच्या गरजू कुटुंबांना आदिवासी विकास महामंडळाकडून धान्य देण्याचा निर्णय घेतला. परंतु सहा महिने उलटून देखील या विभागाकडून भुकेलेल्या आदिवासी कातकरी कुटुंबांना धान्य पुरवठा केला नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी भिवंडी तालुक्यातील नांदा, कांबा, चिंबिपाडा तसेच जूनांदूरखी येथील आदिम जमातीच्या कुटुंबांना प्रतिकुटुंब २० किलो तांदूळ वाटप करण्यात आले मात्र हे तांदूळ सडके, आळ्या पडलेले निकृष्ठ दर्जाचे असल्याने शासनाने आदिवासी कुटुंबांची कुचेष्टा करत असल्याचे उघड झाले आहे.
या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी श्रमजीवी संघटनेकडून आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर कार्यालयाच्या आवारात हेच निकृष्ठ तांदूळ शिजवून ते व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांना भोजन चारणार असे भोजन आंदोलन करण्यात आले. हमी भावात खरेदी केलेला दर्जेदार तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असल्याचा आरोप देखील यावेळी श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला. तर सडका, भिजलेला निकृष्ठ दर्जाचा तांदूळ आदिवासी गरीब कुटुंबांना दिला जात असल्याने आदिवासी विकास महामंडळाकडून जीवनावश्यक वस्तू नियंत्रण अधिनियमाचा भंग होत आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाचे धान्य वाटप करणाऱ्या सर्व जबाबदार अधिकारी, संचालक तसेच व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करावे आशा प्रमुख मागणीचे लेखी निवेदन शहापूरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सदानंद राजुरे यांना दिले.
0 टिप्पण्या