*जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा*
*मुरबाडच्या मोहप गावातील कुटुंबाशी साधला संवाद**
ठाणे
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मुरबाड व शहापुर तालुक्यामध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला.यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते उपस्थित होत्या. तुम्ही सतत हात धुताय ना ? बाहेर जाताना तोंडाला मास्क, सोबत सॅनिटायझर ठेवताय ना? बाजारात जाताना सुरक्षित अंतरावर उभे राहता ना? कोरोना पासून स्वतःचे आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी तीन नियम पाळताय ना! कंटाळा करू नका, शासन सांगत असलेल्या नियमांचे पालन करा. आरोग्य विभागाची टीम सर्वेक्षण करून गेली का ? त्यांनी तुम्हाला योग्य माहिती दिली का? असे प्रश्न विचारुन मुरबाड तालुक्याच्या मोहप गावातील कुटुंबियांशी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या मोहप गावाला भेट देऊन गावोगाव मोहीम कसा प्रकारे सुरू आहे याचा आढावा घेतला.या दोन्ही प्रशासकीय प्रमुखांनी संयुक्त दौरा करून प्रत्येक्ष गावकऱ्यांच्या घरी जाऊन माहीती घेतली. तसेच आरोग्य सर्वेक्षण टीमशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.दरम्यान त्यांनी सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. याप्रसंगी मुरबाड पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, उप सभापती अरुणा खाकर, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, पंचायत समिती सदस्य दीपक पवार, विष्णू घुडे, गावाचे सरपंच, उप सरपंच ,सदस्य तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, मुरबाड तहसीलदार अमोल कदम, गट विकास अधिकारी रमेश अवचार, आरोग्य सर्वेक्षण टीम, अधिकारी-कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली " माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम राज्यात राबवली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात या मोहीमेची अंमलबजावणी यशस्वीपणे होत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर 2020 ते 10 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पूर्ण होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात आरोग्य पथकामार्फत घरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६५ टक्के नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पुर्ण झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करून नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे, त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून संदर्भ सेवा पुरविणे हा मुख्य उद्देश या मोहीमेचा असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोहीमेची यशस्वी अंमलबजावणी होत आहे.
0 टिप्पण्या