पुढील पाच वर्षात आपणाला सत्तेत सहभागी व्हायचे आहे - डॉ.सुरेश माने
ठाणे
समोरच्या पक्षाने तेथील लोकांनी तुमची दखल घेतली पाहिजे, तुम्ही त्याला विचारण्यास जाऊ नका. त्याने तुम्हाला विचारले पाहिजे अशी ताकद आपआपल्या विभागात निर्माण करा तरच येणाऱ्या निवडणुकीत पक्ष सत्तेत भागीदार बनू शकेल अशा आशावाद अॅड.सुरेश माने यांनी ठाण्यात व्यक्त केला. बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश माने १८ ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यावर आले होते. यावेळी ठाणे, पालघर व रायगड जिल्यातील पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संभाषण केले, मागील पाच वर्षात आपला पक्ष दखलपात्र झाला आहे तर पुढील पाच वर्षात आपणाला सत्तेत सहभागी व्हायचे आहे. त्या दृष्टीने कामाला लागा असे स्पष्ट संकेत माने यांनी यावेळी दिले. तसेच पुढील पाच वर्षात राजकीय सत्तेतील प्रत्यक्ष सहभाग प्राप्त करण्यासाठी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष ललित हुमने, प्रदेश सचिव अॅड.सुशांत जगताप, प्रदेश सचिव सतिष बनसोडे, ठाणे जिल्हा प्रभारी चंद्रभान आझाद, ठाणे शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव, नवी मुंबई अध्यक्ष नविन प्रतापे, कल्याण अध्यक्ष अॅड. ललित तायडे, उल्हासनगर अध्यक्ष हरेश ब्राम्हणे, ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष अफजलभाई पठाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ.माने पुढे म्हणाले, आता प्रभाग पद्धती संपली आहे. प्रभाग पद्धती ही बिजेपीच्या राजकारणाचा भाग होती. ती आता संपली आहे आता वॉर्ड पद्धती असेल. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमधून संपूर्ण जिल्ह्याच्या किंवा शहराच्या जागांचा विचार करू नका. आपली ताकद अधिकाधिक कुठे निर्माण होईल. आणि आपण निवडून कसे येऊ याबाबत विचार करा. १०० जागावर निवडणुक लढण्यापेक्षा १० जागांवरच निर्णायक निवडणूक लढवा आणि जिंकण्याचे राजकारण करा तरच येणाऱ्या काळात आपला सत्तेत सहभाग होईल. त्या दृष्टीने कामाला लागण्याचे स्पष्ट आदेश माने यांनी या बैठकीत दिले. मागील पाच वर्षात पक्षाने जे ध्येय अंगिकारले होते त्याच क्रमानुसार पक्षाची राजकीय, सामाजिक, कृतिशिल भूमिका राहिली आहे. आजपर्यंत पक्षाने अनेक महत्वाच्या विषयावर आणि नागरिकांच्या मुलभूत समस्या निवारण्याकरिता आंदोलने केली. पक्षाच्या कार्याचा झंझावात तसाच तेवत ठेवून येणाऱ्या काळात राजकीय स्थितीत परिपूर्णतेने कार्यरत रहावे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात डॉ.सुरेश माने यांचा झंझावात सुरु आहे. ठाणे जिल्ह्यासह पालघर रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पुढील काळात पक्षाच्या ध्येय धोरणाची माहिती करून देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
0 टिप्पण्या