एक मिशनरी म्हणून सामाजिक कार्य करणाऱ्या पक्षाची आवश्यकता - अॅड..सुरेश माने
मुंबई
देश गंभीर स्थितीतून वाटचाल क रीत असताना पक्ष निर्मिती झाली. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार हे विषमतेने, सुडबुद्धीने देशाचे राजकारण, समाजकारण हाताळत होते. अशा स्थितीत ठरवल्याप्रमाणे पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे कार्यक्रम करून ते यशस्वी करून पक्षाला महत्त्व प्राप्त करून देण्यात आले. फुले-शाहू-आंबेडकर व कांशीराम यांच्या वैचारिक कृतीतून निर्माण झालेला हा पक्ष एक मिशनरी म्हणून सामाजिक कार्य करणारा पक्ष आहे. तेव्हा महाराष्ट्रातील बहुजनांचा हा पर्याची पक्ष ठरावा अशी कामगिरी सर्व कार्यकर्त्यांकडून झाली पाहिजे अशी अपेक्षा अॅड.(डॉ.) सुरेश माने यांनी व्यक्त केली
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीला १० ऑक्टोबर २०२० रोजी पाच वर्षे पुर्ण झाली. संस्थापक, अध्यक्ष अॅड.(डॉ.) सुरेश माने यांनी यावेळी फेसबुकद्वारे जाहीररित्या मागील पाच वर्षातील पक्षाच्या कार्याचे सिंहावलोकन केले. पक्षाच्या निर्मितीमागील कारण आणि त्याचा इतिहास अगदी विस्तृतपणे यावेळी सांगितला. तसेच मागील पाच वर्षात पक्षाने जे ध्येय अंगिकारले होते त्याच क्रमानुसार पक्षाची राजकीय, सामाजिक, कृतिशिल भूमिका राहिली आहे असे त्यानी स्पष्ट केले. याच कारणामुळे पक्षाला यश लाभले आहे आणि पुढेही यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने समाजाच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असताना अनेक आंदोलने करण्यात आली, ज्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगारांचे प्रश्न याचबरोबर आदीवासी बांधवांचे पुनर्वसन, शैक्षणिक बेरोजगारांचे प्रश्नासोबतच गोरगरीब, दलित जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली. याबाबत राज्यशासनासच नव्हे तर केंद्र शासनास देखील लेखी निवेदने पाठवून समस्या निवारण्याकडे लक्ष वेधण्याचे काम करण्यात आले. सत्तेच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी निवडणुका लढवणे हे महत्वाचे असे. म्हणूनच लोकसभा, विधानसभा सह अगदी भंडाऱ्याची पोटनिवडणूक लढवून एक घटक पक्ष म्हणून मान्यता मिळवली. निवडणूक कशा प्रकारे लढवायची हा राजकारणाच्या रणनितीचा हा भाग असतो. घटक पक्ष म्हणून स्वत:च्या अजेंड्याशी , ध्येय धोरणांशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आपले अस्तित्व अबाधित ठेवत जनतेच्या समस्या सोडविण्यास आजही सरकारला भाग पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. हे सर्व करीत असताना अनेकानी परतीचा प्रवास केला तर बऱ्याच अंशी नवीन लोकांचा भरणाही झाला. राजकीय पक्षामध्ये अशी ये-जा सुरूच असते. यामधून प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा दिसून येते. आज पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी येणाऱ्या काळामध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी गांभीर्यपूर्वक कार्य करणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या