*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा ठाणे ग्रामीणमध्ये शुभारंभ;
ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत क्षेत्रात कोव्हिडं नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी
*कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ तालुक्यात लोकप्रतिनिधीच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन*
ठाणे
माझे कुटुंब माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेचा ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात (ग्रामीण) १५ सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्याच्या मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या हस्ते मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. या मोहीमेमुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत क्षेत्रात कोव्हिडवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी होईल. ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
१५ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२० या कालावधीत मोहिमेचे पहिली फेरी पार पडेल तर १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत मोहिमेचा दुसरा टप्पा असणार आहे. राज्य शासनाने कोव्हिडं १९ चे उच्चाटन करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे संशयित कोव्हिडं तपासणी, व उपचार, अति जोखमीचें व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोव्हिडं १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, रुग्णांचे गृहभेटीद्वारे संरक्षण, कोव्हिडं तपासणी आणि उपचार, आरोग्य शिक्षण, हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य विभागा मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी ५४५ पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकात आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे. हे पथक थर्मल स्कॅनर, प्राणवायु मोजणार यंत्र आणि इतर अनुषंगिक साहित्य सामग्री घेऊन पथक घरोघरी सर्वेक्षण करत आहे.
शहापूर पंचायत समिती स्तरावर आमदार दौलत दरोडा यांच्या उपस्थितीत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद विषय समिती सभापती, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या मान्यवर लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात मोहिमेत सहभागी होत उदघाटन केले.
कोव्हिडं नियंत्रित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखील प्रत्येक तालुका स्तरावर जिल्ह्यातील खातेप्रमुखांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. हे संपर्क अधिकारी मोहीम यशस्वी करण्यासाठी नियंत्रण ठेवणार आहेत. तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्याचे गट विकास अधिकारी यांनी मोहिमेचे नियोजन केलें आहे.
0 टिप्पण्या