Top Post Ad

... तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का नाही - आ.सरनाईक यांचा सवाल

ठाण्यात परमार आत्महत्या प्रकरणात 'सुसाईड नोट' ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती.  तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का नाही



मुंबई


 सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सत्य बाहेर येऊन त्याला न्याय मिळालाच पाहिजे. पण त्याला राजकीय वळण देऊन निव्वळ राजकीय फायदा व कोणाची तरी खोटी बदनामी करणे हे कदापि योग्य नाही.नियम आणि कायदा सगळ्यांना सारखा आहे. सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे यावर कोणाचेही दुमत नाही. पण त्याच पद्धतीने तत्परता दाखवून आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी योग्य तो तपास करून सत्य बाहेर यावे, जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करावी, अशी विनंती पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री देशमुख यांना लिहिले आहे. आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या 'सुसाईड नोट' मध्ये  अर्णब गोस्वामी आणि इतर दोन व्यक्तींची नावे असतानाही कोणताही तपास न करता त्यांच्यावर कारवाई झालेली नसल्याने या प्रकरणी दोषींवर कायद्याप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 


आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा ५ मे रोजी मौजे कावीर, ता. अलिबाग येथे त्यांच्या घरी मृत्यू झाला होता.त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबियांने FIR  केला ज्यात गुन्ह्याची पोलिसांनी नोंदही करून घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी 'सुसाईड नोट' लिहून ठेवली होती.त्यात कोणत्या कारणाने व कोणामुळे आत्महत्या केली त्यांची नावे आहेत त्या नोटमध्ये पहिले नाव अर्णब गोस्वामी यांचे व इतर २ नावे आहेत. पण त्या गुन्ह्याचा कोणताही तपास न करता आरोपीवर कारवाई झालेली नाही. नाईक कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी दाद मागूनही त्या प्रकरणात कोणाला अटक झाली नाही, असे या कुटुंबाचे म्हणणे आहे.


अलिबाग पोलिसात दाखल असलेल्या एफ.आय.आरनुसार, अर्णब गोस्वामी यांच्या मुंबईतील स्टुडिओचे काम आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कंपनीने घेतले होते. त्या कामापोटी उर्वरित रक्कम ८३ लाख रुपये गोस्वामी यांनी नाईक यांना काम पूर्ण झाल्यानंतरही दिली नाही. वारंवार मागणी करूनही कामाचे हे पैसे परत न मिळाल्याने आर्थिक व मानसिक दडपण आल्याने अखेर नाईक यांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले असेही नाईक कुटुंबियांने दिलेल्या माहितीच्या आधारे आ.सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. 


अन्वय यांच्या पत्नी न्याय मिळविण्यासाठी दारोदार जात आहेत.काही वर्षापूर्वी ठाण्यात बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात 'सुसाईड नोट' ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती. तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही ? त्यामुळे आता नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सुसाईड नोट व पत्नीने नोंदवलेला एफ.आय.आर ग्राह्य धरून आरोपीवर अटकेची पुढील कारवाई करायला हवी अशीही मागणी आ.सरनाईक यांनी केली आहे.  आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या पत्नीने न्याय मिळण्याची मागणी केली असून,अक्षता नाईक यांचा विनंती करणारा एक व्हिडिओ मला मिळाला आहे,त्यात 'अर्णब गोस्वामी माझ्या सासू आणि नवऱ्याच्या आत्महत्येला, मृत्यूला जबाबदार आहेत. गेल्या सरकारने आमची केस दाबून टाकली मला न्याय मिळाला नाही. अर्णब गोस्वामी माझ्या कुटुंबाचा गुन्हेगार आहे. त्याला अटक झाली पाहिजे.' असे नाईक यांचे म्हणणे आहे असे आ.सरनाईक यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com