मुंबई
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला आत्मनिर्भरतेकडे नेण्याचे आवाहन केले. लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश म्हणून आपण पंचाहत्तरीत असताना आपण आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, असं म्हणत आत्मनिर्भरचा नारा दिला. भारताला सशक्त व्हावं लागेल, आत्मनिर्भर व्हावं लागेल. आपल्याकडे प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. कधीपर्यंत जगाला कच्चा माल पाठवून, तयार माल विकत घेत राहणार? असं म्हणत मोदींनी 'आत्मनिर्भर भारत' हा 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनलेला असल्याचं म्हटलं. मात्र भारतीयांच्या आत्मनिर्भर व्हायला शासनाचाच पाठिंबा नसल्याचे कॅप्टन अमोल यादव यांच्या उदाहरणावरून दिसून येत आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कॅप्टन अमोल यादव यांनी अथक परिश्रमाने बनवलेल्या पहिल्या वाहिल्या भारतीय बनावटीच्या विमानाच्या टेक ऑफ, लॅण्डिंग, टर्न, स्पीड ऑफ अशा चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु पुढील कारवाईकरिता लागणारे आर्थिक सहकार्य आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या कामासाठी लागणारे आर्थिक सहकार्याबाबत अद्यापही शासन उदसिन आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याच्या मराठी माणसाच्या प्रयत्नांना येथे सुरुंग लावला जात आहे देशातील पहिल्या वहिल्या स्व-बनावटीच्या विमानाच्या आता आणखी दोन चाचण्या शिल्लक असून त्या झाल्या की विमान सेवेत रुजू होऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी प्रचंड आर्थिक चणचण भासत असून शासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी शासनाचे सहकार्यही अपेक्षित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
२००९ ला भारतीय बनावटीच्या या विमानाचा प्रवास अजूनही सुरूच आहे. २०१९ मध्ये चार वर्षांच्या कागदोपत्री खेळानंतर कॅटन अमोल यादव यांच्या विमानाची अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर पुन्हा त्याच्या चाचण्यां पूर्ण करण्यासाठी अमोल यादव याना २०२० ची वाट पहावी लागली आहे. यापुढील चाचण्या या विमान सर्किट पूर्ण करण्याची आणि एका विमानतळाहून दुसऱ्या विमानतळावर जाण्याची असणार आहे. मागील सरकारकडून आलेल्या कटू अनुभवानंतर अद्याप राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारशी त्यांचा संपर्क झालेला नसल्याची माहिती अमोल यादव यांनी दिली. नवीन राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची आणि त्यांच्या या आत्मनिर्भर प्रयत्नाला मदतीचीच अपेक्षा करत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात २०१८ साली झालेल्या पहिल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणुकदारांच्या परिषदेत १९ फेब्रुवारी रोजी यादव आणि राज्य सरकार यांच्या सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा हा करार झाला. या करारानुसार पालघर इथे १९ आसनी विमाननिर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी राज्य सरकार यादव यांना जमीन उपलब्ध करून देणार होती. मात्र पुढे या करारनाम्याचे काहीच झाले नाही.अमोल यांच्या १९ आसनी विमानाचे इंजिन कॅनडामध्ये तयार आहेत. मात्र भारतात आणण्यासाठीही अमोल यांच्यासमोर सध्या आर्थिक अडचण आहे. इतकेच काय पुढच्या टप्प्यातील शेवटच्या चाचण्या करण्यासाठीही त्यांना आर्थिक चणचण भासत आहे.
0 टिप्पण्या