मोठ्या कोविड रुग्णालयांमध्ये पॉझिटीव्ह आणि संशयीत रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी - महापौर
ठाणे
खाजगी तसेच शासकीय दोन्ही प्रकारच्या ५० पेक्षा जास्त खाटा असलेली जी मोठी कोव्हिड रुग्णालये आहेत त्या रुग्णालयांमध्ये एक कक्ष स्वतंत्र जिना व प्रवेशद्वारा सह ,निगेटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध असावा. तसेच अत्यावस्थ कोव्हिड सदृश रुग्णांना तातडीने भरती करून शासन निर्णयानुसार उपचार करण्याची कार्यवाही करावी ,असे आदेश सर्व संबंधितांना निर्गमित करण्याचे विनंती पत्र ठाण्याचे महापौर नरेंश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहे.
महाराष्ट्र शासनाने मार्च 2020 मध्ये शासन निर्णय जारी करून कोव्हिड रुग्णालयांमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करून त्यांना वेगवेगळे प्रवेशद्वार ठेवणेबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत . तसेच कोव्हिड सदृश्य (पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह) सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या आजारांपैकी तीव्र स्वरूपाचे रुग्ण कोव्हिड रुग्णालयात अतिदक्षता विभागात तातडीने भरती करून घ्यावे व नंतर त्यांची तपासणी करून निगेटिव्ह आढळून आल्यास त्यांना नॉन कोव्हिड हॉस्पिटलमध्ये हलवावे असे स्पष्ट निर्देश आहेत.
तसेच दि.३/७/२० रोजी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण संचालनालया द्वारे काढलेल्या कोव्हिड १९ क्लिनिकल अपडेट गाईडलाईन्स मध्ये देखील अशा कोव्हिड सदृश्य निगेटिव्ह गंभीर रुग्णांना कोव्हिड रुग्णालयामध्ये भरती करून उपचार करणे बाबत निर्देश (फ्लो चार्ट पाहावा ) आहेत. सद्यस्थितीत इतर कोणत्याही आजाराच्या रुग्णास नॉन कोव्हिड इस्पितळात भरती होणे साठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरील शासन निर्णयात नमूद पद्धतीनुसार कार्यवाही झाल्यास अशा रुग्णांची फरफट कमी होण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
ठाणे शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 84 टक्क्यांवर आले असून ही नक्कीच ठाणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. ठाण्यातील कोरोना आटोक्यात यावा यासाठी प्रशासनातील सर्वच अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस हे गेल्या चार महिन्यांपासून अथक परिश्रम घेत आहेत, मागील जवळ-जवळ पाच महिन्याच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेचे मार्फत कोव्हिड साथ नियंत्रण मोहीम सुरू आहे. सदर कालावधीत अनेक अत्यावस्थ रुग्णांना नॉन कोव्हिड रुग्णालयांमध्ये भरती होणे भाग पडले. उच्चभ्रू अथवा मध्यमवर्गीय रुग्णांच्या कुटुंबीयांना देखील सुरुवातीच्या काळात हाती पैसा नसताना खाजगी रुग्णालयांमध्ये होणारा खर्च परवडणारा नव्हता.
अनेक गरीब व गरजू रुग्णांना अस्वस्थ झाल्यामुळे इस्पितळात भरती होणे गरजेचे असताना, कोव्हिड रुग्णालयामध्ये फक्त पॉझिटिव्ह रुग्णांना ॲडमिट करत असल्यामुळे आणि अभावानेच उपलब्ध असलेल्या नॉन कोव्हिड रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यामुळे अनवस्था प्रसंगास सामोरे जाणे भाग पडले. आज तात्काळ रिपोर्ट उपलब्ध होणारी अॅंटीजेन टेस्ट उपलब्ध आहे परंतु सदरचा अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा दोन दिवस rt-pcr टेस्टचा रिपोर्टसाठी थांबणे रुग्णास भाग पडते. कोव्हिड आजारामध्ये एका दिवसात पेशंटची परिस्थिती खालावू शकते. अशातऱ्हेने टेस्टचा रिपोर्ट नसल्यामुळे पेशंटला ऍडमिट करून घेतले जात नाही, त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना जीव धोक्यात घालून घरी राहणे भाग पडते. कारण खाजगी नॉन कोव्हिड रुग्णालयाचा खर्च त्यांना परवडण्याजोगा नसतो. तसेच सौम्य् लक्षणे असली तरी काही जण कोरोनाला घाबरुन चाचणी करुन न घेता दुखणे अंगावर काढतात परिणामी, अचानक तब्बेत खालावून उपचार वेळेत न मिळाल्याने अनेकांचे मृत्यू झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे यावर विचार करून यावर अलंबजवाणी व्हावी अशी विनंती महापौर यांनी पत्राद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या