डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या" स्थापनेला येत्या २० जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहे.या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीवर प्रकाश टाकण्याकरिता व आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याकरिता बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा शनिवार २० जुलै रोजी, सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
२० जुलै, १९२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर हॉल, परळ, मुंबई या ठिकाणी बैठक घेऊन "बहिष्कृत हितकारिणी सभा" ह्या संस्थेची स्थापना केली. हि संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनातील प्रथम संस्था. ह्या संस्थेच्या स्थापनेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय चळवळीला सुरवात झाली. "बहिष्कृत हितकारिणी सभेच्या" स्थापनेला २० जुलै, २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीवर विद्यमान परिस्थितीत प्रकाश टाकण्याकरिता व आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याकरिता बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सवाचे २० जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये छत्रपती शाहू महाराज ह्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे . त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती व प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवराज संभाजीराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर हे असतील. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आम आदमी पक्षाचे राजेंद्र पाल गौतम, विनोदकुमार तेज्यान, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून शाहिद सिद्दीकी, ख्रिश्चन समुदायाचे जॅक्सन जोसेफ, सुंदर नायडू, पोलीस उपायुक्त भारत शेळके, जगदीश गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
■ बहिष्कृत हितकारणी सभा स्थापना दिवस ■
(२० जुलै १९२४)
पिढीत, सामाजिक समतेपासून, आपल्या हक्क अधिकारापासून दूर असलेल्या अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचे आंदोलनं वेगवेगळ्या कार्यकृतींतून चालु ठेवण्याकरिता एखादी संस्था स्थापन करावी असे बाबासाहेबांचे मत होते. म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करुन २० जुलै १९२४ ला बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केली. आणि सर्वांच्या सहमतीने संस्थेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब झाले. शिकवा, चेतवा व संघटित करा (Educate, Agitate and Organise) हे बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परेल येथील दामोदर हॉलमध्ये ९ मार्च १९२४ साली 'बहिष्कृत हितकारणी सभा' स्थापनेसाठीच्या घेतलेल्या बैठकीत हे विधान केले होते. त्याचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नंतर चुकीचा अनुवाद करुन प्रसार झाला त्याचा मुळ अर्थ शिकवा, चेतवा व संघटन करा असा होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हीतकारणी सभेचे महत्व समजवून सांगण्यासाठी एक विनंती पत्र अस्पृश्य समाजाच्या लोकांना दिले. त्यांनी त्या विनंती पत्राच्या माध्यमातुन अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान जगविण्याचा आणि आपल्या उद्धारासाठी बहिष्कृत हितकारणी सभेचा सभासद होण्याचा संदेश दिला दिला. तसेच अस्पृश्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमतेच्या त्रासापासून मुक्त होण्याकरिता या सभेचा सदस्य होण्याचे आवाहन केले. ज्या कारणांमुळे बहिष्कृत वर्गाच्या बुध्दीचा, कर्तव्यशक्तीचा व परस्थितीचा ऱ्हास झाला आहे व ज्यामुळे देशाचे नुकसान झाले आहे त्या कारणांचे निर्मूलन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या बहिष्कृत हितकारणी सभेस शक्य ती मदत करावी अशी ही विनंतीही यावेळी करण्यात आली होती.
बहिष्कृत हितकारणी सभेने वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधीची मागणी केली होती. त्यात त्यांनी भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली होती. तसेच अस्पृश्यांच्या हितासाठी शिक्षण प्रसार करणे, वाचनालय सुरू करणे, विध्यार्थी वसतिगृह काढणे अश्या प्रकारची कर्तव्य स्वीकारली या सभेमार्फत स्वीकारली होती आणि पूढे त्याची अंमलबजावणीही केली. या माध्यमातूनच अस्पृश्य मुलांना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून सोलापूर येथे १९२५ साली एक वसतिगृह सुरू करण्यात आले होते. एकूणच अश्या पद्धतीचे बहिष्कृत हितकारणी सभेचे कार्य होते.
संदर्भ - डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र, चांगदेव खैरमोडे, खंड २
संकलन - करण मेश्राम
0 टिप्पण्या